Search in Google

Monday, December 31, 2018

करीअर - सोशल मीडिया मार्केटिंग

आपल्या राज्यघटनेमुळे प्रत्येक लिहिण्या-वाचण्याचा बोलण्याचा अधिकार मिळाला आहे. त्यासाठी  इंटरनेट एक माध्यमाचा वापर होत आहे. यातून आजचा तरुण वर्ग बोलका होतोय, हे आज काही वेगळे सांगायची गरज नाही. पुढेही ही परीस्थिती जोर धरणार आहे. सोशल मीडियामध्ये खूप विलक्षण  ताकद आहे. सोशल मिडियामुळे प्रत्येकाच्या अभिव्यक्ती स्वतंत्र्यास व्यासपीठ मिळते, आपले विचार लोकांपर्यंत पोहचवता येतात. समजा आपल्याला काही सामाजिक, सांस्कृतिक प्रश्न मांडायचे आहेत, पूर्वी यासाठी वर्तमानपत्रात जाहिराती द्याव्या लागत असत, आता मात्र आपण सोशल मिडीयाच्या माध्यमातून व्यक्त होतच असतो, अर्थात असे करणारा प्रत्येकजण पत्रकार ठरत आहे. 

सामाजिक संपर्काच्या साईटमुळे प्रत्येक व्यक्तीमधील अंतर कमी झाले आहे किंबहुना प्रत्येकाची संपर्क संख्या वाढत चाललेली आहे. त्याचप्रमाणे कॉर्पोरेटमध्ये कंपन्यानी सामाजिक माध्यमामध्ये प्रवेश केल्यामुळे ग्राहकांशी प्रत्यक्षपणे संपर्क करणे सहज साध्य झाले आहे. पारंपारिक जाहिरातींपेक्षा सामाजिक माध्यमामार्फत केलेली जाहिरात ही अधिक प्रभावी आणि व्यापक होत आहे.

याबरोबर यातून आपण आज स्वतःसाठी रोजगारसुद्धा उपलब्ध करू शकतो. सोशल नेटवर्किंग संकेतस्थळांची लोकप्रियता व विस्तार पाहता, अनेक व्यावसायिक कंपन्या व उद्योग धंदे ह्या संकेतस्थळांचा वापर जाहिरातींसाठी करतात. उदा. - इतर संकेतस्थळांच्या जाहिराती, बाजारातील नवीन वस्तूंच्या जाहिराती, नोकऱ्यांची जाहिरात इत्यादी. संकेतस्थळांना ह्या जाहिरातदारांकडून प्रचंड पैसा मिळतो. यासाठी युट्यूब चॅनल, न्यूज़ पोर्टल, ब्लॉगिंग, जाहिरात प्रमोशन असे अनेक पर्याय आहेत. 

यातूनच सोशल मीडिया मार्केटिंग संकल्पना उदयाला आली आहे. सामाजिक माध्यमाच्या साईटसमधून लक्ष वेधून घेण्याच्या कार्यपध्दतीला सामाजिक माध्यमातील विक्रीकला असे म्हणतात. या आज्ञावलीमध्ये लक्ष वेधून घेण्यायोग्य मजकूर तयार करण्याचा प्रयत्न करणे आणि तयार झालेला मजकूर जास्तीत जास्त लोकांपर्यंत / वाचकांपर्यंत पोहोचविण्यासाठी प्रयत्न करणे हे येथे केंद्रस्थानी आहे. एखादी घटना, वस्तू, सेवा, संस्था इ. विषयी मजकूर इंटरनेटच्या माध्यामातून उदा. वेबसाईटस, सामाजिक नेटवर्क, क्षणात संदेश, बातम्या इ. व्दारे लाखेा ग्राहकांपर्यंत झटक्यात पोहोचू शकते.

फेसबूकवर ऑफिशियल पेजेस बनवून फॉलोअर्स वाढवणे, आपल्या उत्पादनाची जाहिरात लोकांपर्यंत पोहचवणे, युट्युबवर सबस्क्रायबर वाढवणे, ब्लॉग लिहिणे, ते इंटरनेटवर व्हायरल करणे, यातून आपल्या उत्पादनाची माहिती लोकांपर्यंत पोहचवणे, तसेच इतरही सोशल मिडिया जसे की ट्वीटर, व्हाटस् अप, इन्स्टाग्राम अशा साईट्सवर पैसे भरून मार्केटिंग करता येते. अशा कामांसाठी सेवा पुरवणाऱ्या किंवा उत्पादन तयार करणाऱ्या कंपन्याकडे विशिष्ठ सोशल मिडिया टीम असते. त्यात सोशल मिडिया सेल्स एक्झेक्यूटीव, सोशल मिडिया सेल्स व्यवस्थापक असे जॉब्स असतात किंबहुना आपण स्वतः सोशल मिडिया सेल्स म्हणून स्वतंत्र व्यवसायही चालवू शकतो. याचे सर्व ट्रेनिंग आणि ट्रिक्स ऑनलाईन उपलब्ध आहेत. सोशल मोडीयाचा वापर सर्वच क्षेत्रात जोर धरत आहे उदा. राजकीय, सांस्कृतिक, धार्मिक व्यवसायिक, इ. त्यामुळे सोशल मिडिया मार्केटिंगची मागणी वाढत आहे.

Published in Dainik Pudhari in Edu-Disha supplement.
02 Apr 2019.

Thursday, December 27, 2018

सोशल मीडिया आणि राजकारण

सध्याच्या राजकारणाचा एकूणच, केंद्रबिंदू जुन्या घडामोडीपासून, मूल्यांपासून, प्रतीकांपासून व निष्ठांपासून दुसरीकडे सरकलेला आहे. त्या सरकण्याच्या मुळाशी सकारात्मक आणि नकारात्मक पैलूआहेत. त्या दोन्ही संदर्भातून सोशल मीडियाचा प्रभाव आणि परिणामकारकता आजच्या राजकारणात कशी दिसते, हे तपासनं निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर महत्त्वाचं आहे. जगभरात पार पडत असलेल्या निवडणुकीत फेसबुकचा एकाच वेळी एकाच यंत्रणाकडून दुहेरी वापर झालेला आहे. ज्यांनी दुसर्‍याच्या बदनामीच्या जाहिराती दिल्या, त्यांनीच स्वतःच्या कौतुकाच्या जाहिराती दिल्या. त्यामुळे आज सोशल मिडियावर नियंत्रण नसणं अन ते ठेवणं अतिशय कठीण आहे, ही या माध्यमाची उणीव आहे. आजचं राजकारण बेभरवशाचं होण्यातही याच माध्यमाचा मोठा वाटा आहे.
सोशल मीडियावरचा विस्कटलेला चेहरा हा आजच्या समाजमनाचा आरसा आहे. तरीही लोकशाही आणि व्यक्ती स्वातंत्र्य अशी दोन हत्यारं वापरून हे माध्यम राजकारणात यशस्वी ठरलेही आहे, असे मानण्यात शंका नाही. खरं तर, दिवसाप्रमाणे राजकारणाचं स्वरूप बदलत नाही, परंतु दिवसेंदिवस माध्यमं बदलत गेलेली आपण पाहिलेलं आहे. आज या माध्यमांमध्ये समाजाच्या समकालीन आकलनाचं प्रतिबिंबही आहे. अभीव्यक्ती स्वातंत्र्य आणि सामाजिक मूल्य घेऊन जन्माला आलेलं हे माध्यम आहे आणि या सात-आठ वर्षात याने जोर घेतला आहे. तरीही आजच्या घडीला यातून राजकीय क्षेत्रासंदर्भात विचार मांडण्याची तरुण वर्गाची भाषा भरकटत असते किंबहुना राजकीय किंवा सामाजिक व्यवहारांच्या संदर्भात सोशल मीडियाला प्रसारमाध्यमाइतके गांभीर्याने अजून घेतले जात नाही, असेही काहीसे आज जाणवत आहे.

हे माध्यम जेवढं शंकांचं निरसन करतं, तेवढंच नवीन शंका निर्माण करतं. जेव्हा आपण राजकारणाचा या माध्यमाशी सबंध जोडतो, तेव्हा अर्थातच त्याच्या सर्व बाजू समजून घ्याव्या लागतात. मुळात समाजातील जवळपास सर्वच घटक या माध्यमानं आपलेसे केले आहेत. अनेक देशांत तर राजकीय सत्तांतर केले आहे. तसं आज भारतातही बरेच राजकीय बदल घडून आलेले आहेत.  या माध्यमानं माणसांचं अस्तित्व अन चारित्र्य तपासण्याची पद्धतदेखील जन्माला घातलेली आहे. पूर्वी राजकीय पुढाऱ्यांना आपले समर्थक वेगवेगळ्या पद्धतीनं संपर्कात ठेवावे लागत असे. आता यासाठी हे माध्यम संपर्कात राहण्यासाठी फारच सोपं आहे. कुठेही बसून या माध्यमामुळे नेता आपल्या कार्यकर्त्यांशी सवांद साधू शकतो. सोशल मीडियावर असलेले मित्र आणि फॉलोअर्स आजच्या नेत्याची उंची मोजण्याचं साधन झालं आहे म्हणजेच जितके जास्त फॉलोवर्स तितकी जास्त लोकप्रियता असं काही लोकांचं मत जरी असलं तरी हे विधान मनात शंका निर्माण करणारं आहे. जसं राज ठाकरेंच्या सभेत गर्दी करणारे सगळेच मनसेला मतदान करत नाहीत. म्ह्णूनच सोशल मीडियावरचे सगळेच फॉलोअर्स गांभीर्यानं घ्यायची गरज नसते. कारण तिथं आभासीपणा जास्त असतो, परंतु त्या फॉलोवर्सकडून तेवढ्याच प्रमाणात त्या नेत्याचे विचार पसरवण्यात मदत होते. अर्थात आजच्या राजकारणाचा परीघ अन गांभीर्य  वाढवण्यात या माध्यमाचा मोठा वाटा आहे, हेही तितकेच खरे आहे.

सोशल मीडिया २०१९ च्या लोकसभा निवडणुकीच्या दृष्टीने पुन्हा गेम चेंजर असण्याची शक्यता आहे;  असे वातावरण खुद्द सोशल मीडियावर होताना दिसत आहे. प्रत्येक राजकीय पक्षाची सोशल मीडिया टीम कार्यरत आहे, किंबहुना कार्यकर्तेही आपला पक्ष, नेता कसा चांगला आहे याची माहिती व्हायरल करण्यात हल्ली मग्न असतात. याचे काही पडसाद ५ राज्यातील विधानसभेच्या निवडणुकीत पडलेही आहेत, असे म्हणता येईल. दुसऱ्या बाजूला, निवडणूक आयोगाने सोशल मीडिया कितीही गांभिर्याने घेतला आणि निवडणुकांपूर्वी कितीही आचारसहिंता अंमलात आणली तरीही सोशल मीडियाने होणारा राजकीय प्रचार थांबवणे जवळ जवळ अशक्य आहे. आणि देशातील फक्त १६ टक्के जनता इंटरनेट वापरत जरी असली तरी सोशल मीडियामधून मिळालेल्या माहितीचा प्रसार चर्चेतून ऑफलाईनसुद्धा होत असतो. हे माध्यम गतिमान असल्यानं त्याचा होणारा परिणामसुद्धा तितकाच गतिमान आहे. ज्या गतीनं ते एखाद्याची प्रसिद्धी करतं, त्याच गतीनं बदनामीही करतं. हे माध्यम एकेकाळी ज्यांना खुलं पाहिजे होतं, त्यांना आता त्याच्यावर बंधन घालावीशी वाटत आहेत. कारण एकच आहे - नियंत्रणाची कमतरता. त्यामुळे ते आज ज्याच्या फायद्याचं असतं, उद्या त्याच्या तोट्याचंही ठरू शकतं, असं काहीसं चित्र आज आपण पाहत आहोत.

आणखी पुढे जाऊन विचार केला तर... सध्याचे सरकार सोशल मिडीयाच्या जोरावर निवडून आले हे आपल्याला माहीत आहे. यावरून  सोशल मीडियाची ताकद विलक्षण आहे हे येथे स्पष्ट होतं. सोशल मीडियाचा उपयोग केवळ राजकारणातील प्रचारासाठीच नव्हे तर सगळ्याच प्रकारच्या प्रचारासाठी आपण करू शकतो. प्रोग्रामिंगमध्ये तसे अल्गोरिदमच लिहिलेले असतात. सॉफ्टवेअर कंपन्यांकडून आपल्या मागणीनुसार आपल्याला पाहिजे तसे सॉफ्टवेअर बनवून घेता येते, हेही आपल्याला ठावूक आहे. त्यात तसे बदलही घडवून आणू शकतो. आपल्याला पाहिजे तशा कंडीशन त्यात ऍड करू शकतो. हे फेसबुक, ट्विटर सारख्या जग व्यापणारया सॉफ्टवेअरलाही लागू होते. या कंपन्या त्याना पाहिजे तसा वेळोवेळी अल्गोरिदम अपडेट करत असतात आणि सुरक्षतेसाठी प्रोग्रामिंग लॉजिक, कोड शेअर करू शकत नसतात.

पोस्टमध्ये एखादा शब्द आला की पोस्ट ऑटोमेटिक बूस्ट झाली पाहिजे आणि नको असलेला शब्द आला की, पाहिजे असूनही पोस्ट बूस्ट झाली नाही पाहिजे असेही लॉजिक त्यात टाकता येते. आणि आजच्या सत्तेतले  लोक तर मार्क जुकरबर्गची गळाभेट घेवून आले आहेत. अर्थात आजचे राजकीय क्षेत्र सोशल मीडियाच्या बुडातच हात घालून, सोशल मीडिया आपल्या अधिपत्याखाली सामावून घेण्याचा प्रयत्न करत असेल काय? आणि तेव्हा खरी चर्चा काय झाली असेल ? असा प्रश्न आपल्यासारख्या जागरूक नागरिकांना पडणे स्वाभाविक आहे.


Published in Dainik Pudhari on 03 Jan 19.
Published in Masik Adhunik Sarthi, Solapur. April-2019. 

Friday, November 23, 2018

करिअर - आर्टिफिशियल इंटीलिजन्समधील संधी

दिवसाबरोबर बदलत जाणाऱ्या जगाबरोबर आपण स्वतःला बदलले पाहिजे. जुना अभ्यासक्रम बाजूला सारून नवीन तंत्रज्ञान आत्मसात केला पाहिजे. आज विज्ञान-तंत्रज्ञान क्षेत्रात बरेच संशोधन होत आहे, हे आपल्याला ठावूक आहे. त्यातच आर्टिफिशियल इंटीलिजन्स हेही एक क्षेत्र आहे.  'आर्टिफिशियल इंटीलिजन्स' म्हणजे कृत्रिम बुद्धीमत्ता.  अर्थात कसलाही मानवी हस्तक्षेप न करता संगणकाला, मोबाईलला किंबहुना एखाद्या मशीनला स्वत:चे नियोजन आणि समोर आलेल्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता उपलब्ध करून देणे म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत असते अर्थात ती आज आपण अनेक सिनेमांमध्ये बघतही आहोत. आज सध्या ही संगणक अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाची शाखा बनली आहे. 

संगणक आणि यांत्रिकी क्षेत्रात आर्टिफिशियल इंटेलिजेंस हा करिअर घडवण्याचा अजून एक उत्तम मार्ग आहे. कृत्रिम बुद्धिमत्ता आता एक विशिष्ट मुख्यप्रवाह म्हणून संगणक, विज्ञान व अभियांत्रिकी उपशाखेमध्ये बदलली आहे. मशीन लर्निंग, प्रोसेस आटोमेशन संकल्पना वापरून  बुद्धिमान मानवाप्रमाणे विचार करण्याचे हे तंत्रज्ञान जोर घेत आहे. अशी अपेक्षा आहे की आर्टिफिशियल इंटेलिजन्समधील करियर ऑटोमेशनसारख्या भागात नवीन आयटी विकासाच्या केंद्रस्थानी असेल. यामुळे आज सिलिकॉन व्हॅलीमध्ये एक प्रकारची स्पर्धाच निर्माण झाली आहे आणि गुगल, फेसबूक, लिंक्डइन, मायक्रोसॉफ्ट यांसारख्या दिग्गज आयटी कंपन्या आणि इतर बरेचजण 'करिअर इन आर्टिफिशियल इंटेलिजन्स'साठी मोठ्या प्रमाणावर गुंतवणूक करीत आहेत. भविष्यात हे तंत्रज्ञान आणखी भरभराटीला येणार आहे, यात शंका नाही.

सॉफ्टवेअर इंजिनीरिंगनंतर आईटीमध्ये  करिअर करण्यासाठी बरेच पर्याय असतात, त्यात आर्टिफिशियल इंटेलिजेंस जर करिअरमार्ग निवडला तर त्यातही पुन्हा आपल्याला अनेक उपशाखा पाहाव्या लागतात. आर्टिफिशियल इंटेलिजेंसच्या मशीन लर्निंग, प्रोसेस अटोमेशन, कोग्निटीव्ह रोबोटिक्स असे अनेक पर्याय आपल्यासमोर आहेत. यामध्ये रोबोटिक्स अटोमेशन इंजिनीअर, अल्गोरिदम स्पेशालीस्ट, रिसर्च सायंटिस्ट म्हणून काम पाहावे लागते.  खाजगी कंपन्या, विमा कंपन्या, सार्वजनिक संस्था, शिक्षण, कला, आरोग्य सुविधा, सरकारी एजन्सी आणि लष्करी ई. या सर्व सेवामधले होताने करावे लागणारे काम कॉम्पुटर प्रोग्रामिंगद्वारे स्वयंचलित करून द्यावे लागते आहे . डेटा एन्ट्री, डेटा मेन्यूपुलेशन अशी कामे रोबोटद्वारे आटोमेट करावी लागतात. यामुळे कंपन्यांचा वेळ, पैसा, मनुष्यबळ वाचत आहे. त्यामुळेच कंपन्या आर्टिफिशियल इंटेलिजेंसला प्राधान्य देत आहेत. डेटा एन्ट्री यांसारख्या नोकऱ्यांचे काम आता रोबोट करत आहे आणि त्यामुळेच डेटा ऑपरेटर, डेटा एन्ट्री अनॅलिस्ट अशा नोकऱ्या धोक्यात आल्या आहेत. त्यामुळे असे जुने तंत्रज्ञान शिकून काही फायदा होणार नाही आणि हे अभ्यासक्रमातूनही बरखास्त होत आहे, त्यामुळेच आपण नेहमीच नवीन तंत्रज्ञानाकडे वळले पाहिजे. 

आर्टिफिशियल इंटेलिजेंसमध्ये करियर करण्यासाठी आपल्याकडे कमीत कमी इंजिनीरिंग पदवी आणि एखाद्या कॉम्पुटर प्रोग्रामिंग भाषा अशी मूलभूत तत्वे असणे आवश्यक आहे आणि रिसर्चसाठीचा तर्क, दार्शनिक आणि संज्ञानात्मक पायांबद्दल आपण दृढ असणे गरजेचे आहे. याच आधारवर बहुराष्ट्रीय कंपन्यांमधल्या मुलाखती असतात, या मुलाखतीतून पास होणे अनिवार्य असते.  आपल्याला या क्षेत्रात अनुभव असेल तर चांगले पॅकेज मिळते. काही दिवसापूर्वीच टी. सी. एस., कोग्नीजंट अशा कंपन्या या आर्टिफिशियल इंटेलिजेंसवरील अनुभवी लोकांना इतर कौशल्याच्या तुलनेत दुप्पट वेतन देण्याचे घोषित केले आहे. पुढील काही वर्षांमध्ये आर्टिफिशियल इंटेलिजेंसचा जागतिक श्रमिक बाजारपेठेवर मूलभूत प्रभाव असेल, हे यावरून स्पष्ट होते. 

महाविद्यालयातून नुकतीच पदवी घेवून बाहेर पडलेल्या विद्यार्थ्यांसाठी याचे ट्रेंनिंग पुणे, हैद्राबाद, बंगळूरू, चेन्नई, नोईडा अशा शहरांमध्ये खाजगी इन्स्टिटयूड मध्ये उपलब्ध आहे. यामध्ये काम करण्यासाठी यु-आय पाथ, ब्ल्यू-प्रीजम, अटोमेशन एनीव्हेअर असे अनेक टूल आहेत. आपण याच्या ऑनलाईन परीक्षा पास होवून कौशल्यधारक बनू शकतो. यामधल्या काही परीक्षांसाठी शुल्क आकारण्यात आलेले आहे तर काही ऑनलाईन ट्रेनिंग मोफत आहे. आणि यानंतर बहुराष्ट्रीय कंपन्यांमध्ये चांगल्या पकेजसह नोकरी मिळते.  आज आर्टिफिशियल इंटेलिजेंस कौशल्यधारकांची मागणी वाढत आहे. आर्टिफिशियल इंटेलिजेंसमधील करियर हे एक वेगवान आणि आव्हानात्मक क्षेत्र जरी असले, तरी आपल्या दररोजच्या आयुष्यामध्ये दृश्यमान मार्ग तयार करत आहे त्यामुळेच हे तंत्रज्ञान अवगत असलेल्या नोकरदारांची मागणी वाढत आहे.

Published in Dainik Sakaal on 20-12-2018

Wednesday, November 7, 2018

भारतीय आईटी विश्व

दुसऱ्या महायुद्धाच्या आसपास खऱ्या अर्थाने कॉम्पुटरच्या गरजेने जोर धरला. वेगवेगळ्या क्षेत्रात विस्कटलेली बरीच माहीती सुस्थीतीत ठेवण्याची गरज भासू लागली आणि यातूनच सॉफ्टवेअर या संकल्पनेने जन्म घेतला. अमेरिकेत हा उद्योग भरभराटीला येवू लागला आणि भारतात १९८५-९०च्या आसपास आईटी कंपन्या स्थापन होऊ लागल्या.  या दोन दशकात भारत आईटी विश्वात एक सुपर पॉवर म्हणून आपली ओळख निर्माण करण्यात यशस्वी झाला आहे. इतर कंपन्यांप्रमाणे भारतीय आईटी कंपन्यांनी शेअर मार्केट हदरवून सोडले. जागतिक बाजारपेठेत सॉफ्टवेअर निर्मितीचे काम उल्लेखनीय ठरले. खूप सारा रोजगार उपलब्ध झाला. भारतीय आईटी कंपन्यांचे ग्राहक जगभर आहेत, परंतु भारतीय कंपन्या अमेरिका, अरब अमीरात, यूरोपीयन  अशा कंपन्यांना ग्राहक म्हणून जास्त पसंती देतात. कारण होणारा फायदाही तसाच असतो. उलट आज तर दिवसेंदिवस भारतीय रूपया अमेरीकन डॉलरच्या तुलनेत घसरत आहे. याचाच अर्थ म्हणजे भारतीय अर्थव्यवस्था संकटात आहे. भारतीय प्रोजेक्ट्स भारतीय कंपन्यांना परवडणारे नसतात. त्रुटिहीन सॉफ्टवेअर बनवण्यासाठी, त्याच्या टेस्टिंगसाठी जास्त वेळ लागतो आणि जास्त वेळेत आणि कमी खर्चात  सॉफ्टवेअर प्रोजेक्ट्स परवडणारे नसतात. भारतीय कंपन्यांपैकी  मोजक्याच कंपन्या आपली पारंपरिक क्षेत्रातील ओळख घेवून उतरल्या, तसा पाठबळ म्हणून  त्यांचा उद्योगांचा ग्रुपच असतो. टाटा ग्रुपची टी. सी. एस. , महिंद्रा ग्रुपची टेकमहींद्रा, विप्रो ग्रुपची विप्रो सॉफ्टवेअर, इत्यादी.

परंतु ज्या उद्योजकांनी शुण्यातून सुरुवात करून सी. एम. एम. लेवल 5 पर्यंत मजल मारली आहे, अशा उद्योजकांचा आदर्श कायमच आमच्यासारख्यांनी डोळ्यासमोर ठेवला पाहिजे. कारण के. पी. आई.टी., इंफोसिस, परसिटंट अशा कंपन्यांचा इतिहास कायमच आईटीतील नविन उद्योजकांना प्रेरणा देणारा ठरतो. भारतात तयार होणाऱ्या एकूण कॉम्पुटर इंजिनीअरपैकी निम्म्याहून अधिक इंजिनीअर्सला रोजगार वरती उल्लेख केलेल्या कंपन्याच मिळवून देतात. 

परंतु गूगल, फेसबुक, अमेजॉन, ट्विटर, मायक्रोसॉफ्ट अशा जग व्यापनाऱ्या कंपन्या भारतात सुरु न होण्याची कारणेही आपण शोधली पाहिजेत. अशा प्रश्नांची उत्तरे शोधली तर कॉम्पुटर विश्वातले सर्व संशोधन परदेशातच झालेले आपल्याला दिसते. आजही आपल्याला ठावूक आहे की मायक्रोसॉफ्टमध्ये काम करणारे   40% कर्मचारी भारतीय आहेत. परंतु संशोधनात आणि जे काही झालेल्या संशोधनाला जगव्यापी व्यवसायात रूपांतरीत करण्यात आपण पिछाडीवर आहोत, असं आजची वस्तुस्थीतीच सांगत आहे. आईटी क्षेत्रातील व्यवसाय खूप संवेदनशील आहे किंबहुना तितकाच असुरक्षीतही हे प्रथमतः आपण लक्षात घेतले पाहीजे, असे असतानाही अमेरिकेत आईटी कंपन्यांनी जोर कसा धरला? याचे इथे एक उदाहरण देता येईल. अमेरिकेत स्टॅनफर्ड नावाचे एक विद्यापीठ आहे. या विद्यापीठाचं वैशिष्ट्य म्हणजे इथं संशोधन करण्यासाठी, तसंच विद्यार्थ्यांनी शिक्षण घेत असतानाच उद्योजक व्हावं यासाठी खूप प्रयत्न  केले जातात, याच दृष्टीने शिकवले जाते. त्यामुळे सिलिकॉन व्हॅली या माहिती तंत्रज्ञानाशी संबधित कंपन्यांमधल्या बऱ्याच कंपन्या काढणारे लोक हे स्टॅनफर्ड विद्यापीठातून बाहेर पडलेले आहेत.

असे संशोधक, उद्योजक बनवण्याचे प्रयत्न भारतीय शिक्षणपद्धती करते का ? आज किती भारतीय संशोधकांच्या प्रोग्रामिंग करण्यासाठीच्या कॉम्पुटर भाषा आहेत ? याचेही उत्तर बहुतांशी नकारार्थीच येते. भारतीय आईटी कंपन्या मुख्यत्वे सर्विस लेवल अर्थात सॉफ्टवेअरच्या सेवा पुरवण्याचे काम करतात. आई. बी. एम., मायक्रोसॉफ्ट, ऍपल  अशा कंपन्या सिस्टम लेवल काम करतात अर्थात तशा सेवाही पुरवतात. उदाहरणार्थ. ऑपरेटिंग सिस्टम, एम्बेडेड प्रोग्रामिंग ई. आणि हेच मिळलेलं व्यासपीठ वापरून सॉफ्टवेअर, मोबाईल ऍप बनवणे अशी कामे भारतीय उद्योजक करतात. हेही तसे अव्हानात्मक असते खरे परंतु सिस्टम लेवलचे सॉफ्टवेअर निर्माण करण्यासाखीच कठीण आव्हाने पेलली गेली तरच भारतीय उद्योजक जागतिक पातळीवर आपला ठसा उमठवेल. 

खरे तर, आईटी कंपन्या सर्विस म्हणजेच सेवा विकणारी किंवा प्रोडक्ट विकणारी अशा दोन प्रकारच्या असतात. किंवा सध्या काही कंपन्या सेवा आणि  प्रोडक्ट दोन्हीही पुरवणाऱ्या आहेत. भारतीय कंपन्यांनी आजपर्यंत सिस्टम पातळीचे प्रोडक्टची निर्मिती खूप कमी प्रमाणात केली आहे.  मागच्या काही महिन्यात टी. सी. एस. ही कंपनी 100 अब्ज डॉलर्स इतकी किंमत असलेली पहिली भारतीय कंपनी बनली. मात्र इतर छोट्या कंपन्याबाबत बोलायचे झाले तर, जेव्हा अशा छोट्या कंपन्या जागतिक मार्केटमध्ये भरारी घेवू पहात असतात तेव्हा मोठ्या कंपन्या अशा कंपन्यांना विकत घेतात.
मग त्या मोठ्या कंपन्या भारतीय  किंवा परदेशीही असू शकतात. परंतु एखादी भारतीय कंपनी एखाद्या परदेशी कंपनीमध्ये विलीन होत असते तेव्हा आपला एक भारतीय व्यवसाय पारदेशातच पाठवत असतो, याचाच अर्थ आपणच आपला एक भारतीय व्यवसाय मोठा होण्यापासून रोखत असतो असे म्हणता येईल. आईटी विश्वात भारतीय कर्मचाऱ्याबरोबर भारतीय संशोधकही निर्माण झाला पाहिजे आणि त्यातूनच व्यावसायिकदेखील. 

Published in Saptahik Chaprak - 12 Nov -18 Nov 2018.

Monday, November 5, 2018

झीडकारले मी कविता शिकवणाऱ्याला

सदाशिव पेठेतल्या
एका कवीकडं गेलो,
म्हणालो मीही अधीमधी
कविता लिहितो कधी कधी,
ते म्हणाले, चल वाचून तर दाखवशील
एखादी कविता तुझी..

मी एक चुरगाळलेला
कागद काढला खिशातून,
हरेक ओळ वाचू लागलो मग
थोडा ताल देवून,
ते म्हणाले, आरे इथं ऱ्हस्व आहे
आणि तिथं दीर्घ आहे,
मागच्या अंतऱ्यामध्ये होता आरे उकार पहिला,
अन या शब्दांत आहे दुसरा,
इथं पहिली वेलांटी अन तिथं दुसरी...
मी थोडा शांत जाहलो, चेहरा त्यांचा पाहू लागलो
अन पुन्हा मी कविता माझी वाचू लागलो..
सूर धरला धृवपदाचा अन एकेका कडव्याचा
मग पुन्हा ते महाशय म्हणाले..
आरे इथं उकार पहिला, या शब्दांत आहे दुसरा
तरीही हाताला त्यांच्या झटका
देत गप्प केले त्यांना...
अन मग गाठले मी पुढच्या कडव्याला..
एकेक कडवे सांगत होतो
धृवपदाने साद देत होतो
पुन्हा ते महाशय म्हणाले..
आरे इथं उकार पहिला, या शब्दांत आहे दुसरा
आता मात्र कहर झाला, सहनतेचा माझ्या अंत आला,
मग मी म्हणालो या कवितेसाठी
चळवळीतल्या विद्रोह्यांनी
पाठ थोपटली आहे माझी ,
आश्चर्य त्याच्या चेहऱ्यावरच मग मी पाहू लागलो ,
मी कवितेतल्या ओळी मग साऱ्या
तशाच त्यांना ऐकवू लागलो,
शेवट कवितेचा दणक्यात आता मी गावू लागलो,
असाच गड्या...
हादरा देणारा आशय सारा मांडून गेलो,
अन
सदाशीव पेठेत व्याकरणाला चुना मी लावून आलो...

- गणेश.

Sunday, October 28, 2018

करिअर - बिगडेटामधील संधी...

आपल्या जीवणात आकडेवारीपासून आपण कधीही दूर जाऊ शकत नाही. बँकांना, खाजगी कंपन्यांना, सरकारी संस्थांना, प्रशासनाला आणि इतर बऱ्याच ठिकाणी आवश्यक माहिती आणि त्याची आकडेवारी मोठ्या प्रमाणात लागत असते. अर्थात तो एक प्रकारचा डेटाच आहे. डेटा संग्रहित करणे आणि तो जतन करणे गरजेचे असते. म्हणुन आय. टी.मध्ये बिग डेटावर काम जोरात चालत असते, चालत आहे. व्यवसाय सुधारणे, निर्णय घेणे आणि स्पर्धकांवरील माहिती आधार-प्रदान करणे, आकडेवारी आणि इतर  व्यावहारिक माहिती संग्रहित ठेवणे, जतन करणे या सर्व पक्रिया बिग डेटामध्ये मोडतात. 

आय. टी. इंजिनीरिंगनंतर करिअरच्या दृष्टीकोनातून बिगडेटा हा एक चांगला पर्याय आहे. कारण अनेक बहुराष्ट्रीय आणि भारतीय कंपन्यांमध्ये अनॅलिटीक्स प्रोफेशनल्स, डेटा सायंटिस्टची मागणी वाढत आहे. डेटा अनॅलिटीक्समध्ये काम करत असताना त्यासाठीचे अनेक टूल्स वापरावे लागतात. यासाठी आपल्याजवळ त्याचे कौशल्य असणे गरजेचे असते. टॅबल्यू पब्लिक, ओपनरिफाइन, रॅपिडमायनर, गुगल फ्यूजन टेबल्स असे अनेक टूल वापरून डेटा अनॅलिटीक्समध्ये काम करता येते. हडूप हे एक मुक्त स्त्रोत वितरित बिग डेटाचे फ्रेमवर्क आहे, जे क्लस्टर केलेल्या सिस्टम्समध्ये चालणाऱ्या  मोठ्या डेटा अनुप्रयोगांसाठी डेटा प्रोसेसिंग, गुंतागुतीच्या डेटाचे  व्यवस्थापण आणि त्याचे स्टोरेज व्यवस्थापण करते. यामध्ये मुख्यत्वे माहिती प्रोसेस होते.  

बिगडेटाच्या कामामध्ये रोबोटिक्स अर्थात मशीन लर्निंग, अमेझॉन वेबसर्विसेस या तंत्रज्ञानाचीही जोड आहे.  आर्टिफिशियल इंटीलिजन्स, मशीन लर्निंग अशा संकल्पनांना  माहिती व्यवस्थापणसाठी बिगडेटाशिवाय पर्याय  नाही. आणि आपल्याला ठावूक आहे  की आज आर्टिफिशियल इंटीलिजन्स तंत्रज्ञान जोर घेत आहे, त्यामुळेच बिगडेटाचे कौशल्यधारकांचीही मागणी वाढत आहे.  

म्हणून बिगडेटामध्ये करिअर घडवण्यासाठीचा हा खुला मार्ग आहे. यासाठी या वरील नमूद केलेल्या टूल्सची कौशल्य आत्मसात करणे गरजेचे ठरते. पुणे, चैन्नई, हैद्राबाद, बंगळूरू अशा शहरांमध्ये खाजगी इन्स्टिट्यूडमध्ये याचे  कोर्सेसही उपलब्ध आहेत. बिगडेटाचे कौशल्यधारक होताच बिगडेटा अनॅलिटीक्स कंसलटन्ट, अनॅलिटीक्स  असोसिएट, बिजिनेस इंटीलिजन्स  अनॅलिटीक्स कंसलटन्ट तर अनुभवी लोकांना बिगडेटा अनॅलिटीक्स अर्कीटेक्ट, मेट्रिक्स किंवा अनॅलिटीक्स स्पेशालीस्ट म्हणून नोकरी मिळते. यासाठी कंपन्या चांगले पकेजही  देत आहेत.

Published in Dainik Sakaal on 13-Dec-2018.

Sunday, October 14, 2018

शिक्षणाचे वैदिकीकरण होतेय !

या ४-५ वर्षात जे सामाजीक, राजकीय आणि शैक्षणीय वातावरण ढवळून निघत आहे, ते लक्षणीय आहे. शैक्षणीय बाबतीत बोलायचे झाले तर, आवडीचं शिक्षण घेत असताना प्रत्येक्षिकं करावीत आणि त्यातून अनुभव घ्यावा, मग त्यावरच काम करत दांडगा अनुभव घेत जावा आणि असा दांडगा अनुभव जेव्हा येतो आणि जगाला याचे फायदे दिसू लागतात तेव्हाच ते शिक्षण सार्थ ठरते, असे जर होत नसेल तर ते शिक्षण व्यर्थ गेलेले असते म्हणजे तोपर्यंत आपण अडाणीच असतो.  शिक्षणातून आपले ज्ञान, तर्कशुद्धता आणि अनुभव आणखी वाढत जात असतो. संगणकक्रांतीने आज तर जगाचे दरवाजे कधी नव्हे एवढे खुले झाले. यामुळे तरी भारतीयांची विचारपद्धती व्यापक, वैश्विक बनायला हवी होती. परंतू चित्र उलटेच दिसत आहे. खरं तर, ज्ञान हे जसं निरंतर पवित्र आहे, इतकंच राज्याच्या आणि देशाच्या शिक्षण विभागानेही त्याचं पावित्र्य राखायला हवे. परंतू आज शिक्षण विभागाकडून कामातून जे चित्र पाहायला मिळत आहे, ते निंदनीय आहे. काही दिवसापूर्वी पुण्यातील एका प्रसिद्ध असलेल्या इंजिनीरिंग कॉलेजमध्ये सत्यनारायण महापूजेचा कार्यक्रम पार पडला, जिथं असा कार्यक्रम अपेक्षित होता कि ज्यामध्ये अंधश्रधा निर्मूलानाचा प्रसार होऊन विद्यार्थी कसे विज्ञानात संशोधक बनतील आणि राष्ट्रीय-अंतरराष्ट्रीय पातळीवर आपले नाव लौकिक करतील. 

सरकारने शिक्षण महासंचालयाच्या माध्यमातून काही दिवसापूर्वी पुण्याच्या शाळा-कॉलेजामधून भगवतगीता हा हिंदू ग्रंथ विद्यार्थ्यांना भेट देण्याची मोहीम हाती घेत असल्याचे सांगितले होते. विरोधकांकडून जोरदार टीका झाल्यानंतरही सरकारने हा निर्णय मागे घेतलेला नाही. प्राथमिक-माध्यमिक शाळेच्या अभ्यासाच्या  पुस्तकातील आज ज्या चुका समोर येत आहेत, त्याही चुका एखाद्या विशिष्ठ वर्गाला उच्च ठरवण्यासाठी होत्या कि काय असा प्रश्न निर्माण करणाऱ्याच आहेत. आजचा विद्यार्थी उद्याचा मतदार असतो. असे चुकीचे शिक्षण लादून स्वतःचे सरकार निरंतर टिकण्याचा हा प्रयत्न आहे काय? असाही प्रश्न पुढे उभा राहतो.  

चार-पाच वर्षात  शिक्षणातूनच विज्ञानवाद डावलला जात असून धर्मवाद कसा श्रेष्ठ आहे, हे सांगण्याचा प्रयत्न होत आहे. एवढेच नव्हे तर AICTE (All India Council for Technical Education) अंतर्गत असेलेल्या इंजिनीरिंगच्या अभ्यासात पर्यावरणाबरोबर पुराणाचा, वेदांचा अभ्यासक्रमही असेल, २०१८च्या सुरुवातीला अशी धक्कादायक घोषणा खुद्द प्रकाश जावडेकरांनी केलेली आहे. जग तंत्रज्ञानाने बदलत आहे. जगभरात खूप वैज्ञानिक संशोधन झालेले आहे आणि ते आजही होत आहे , परंतू त्यात भारतीय संशोधक किती आहेत? अगदी बोटावर मोजण्या इतकेच! खरे तर, हे प्रमाण शिक्षण विभागानेच वाढवले पाहिजे, तशी रणनीती आखली पाहिजे. आज 'इंटरनेट ऑफ दी थिंग्ज', बिग डेटा, रोबोटिक्स अशा तंत्रज्ञानाच्या गोष्टीमधून दुनिया बदलत आहे. परंतू भारतात शासकीय खर्चाने गोमुत्रावर संशोधन करणे असे हास्यस्पद प्रकार या काही वर्षापासून सुरु आहेत आणि आजचे सरकार मात्र शिक्षणातूनच धर्मवाद आणखी कट्टर करू पाहत आहे. अर्थात शिक्षणाचे वैदकीकरण होत आहे,असे म्हणायला हरकत नाही आणि हे सर्व प्रकार देशाला जातीवादाकडे घेवून जात आहे.

AICTE च्या आकडेवारीनुसार भारतात सुमारे ३००० इंजिनीरिंग कॉलेजेस मधून ७०००० इंजिनिअर्स बाहेर बडतात, परंतू त्यातल्या साधारणतः निम्म्याच  इंजिनिअर्सन्ना नोकऱ्या मिळतात.  बेरोजगारी प्रश्न सोडवण्याचा सोडून सरकार विद्यार्थ्यांची आहे ती बुद्धी धर्मवादाकडे वळवत आहे. मुळात शिक्षण विभागाने कोणताही धर्म अथवा विशिष्ट सांप्रदायिक विचारसरणीचा शिक्षणांतर्गत आणि शिक्षण बाह्य प्रसार करणे हे सर्वथा चुकीचे आणि  अनैतिक आहे याचे भानही सरकारला राहिलेले नाही. आणि यातूनच भविष्यात आणखी संकटं निर्माण होतील, अंतरराष्ट्रीय स्तरावर  देशाच्या शिक्षण पद्धतीचे हसे होईल, अशी चिंता जागृक नागरिकांना वाटणे साहजिक आहे.

आपल्या शिक्षण पद्धतीतून कसे संशोधक तयार होतील? कसे नवनवीन  व्यवसाय तयार होतील? नोकारदार तयार करताना नव्या नोकऱ्या कश्या निर्माण होतील? शिक्षण महासंचालयाने कोणताही धार्मिक स्पर्श न करता ज्ञानाचे पावित्र्य राखत अशा प्रश्नांचे निरसन करण्याची वादळे घडवून आणावीत. तेव्हाच देशाची शिक्षणपद्धती सदृढ आणि त्रुटीहीन झालेली असेल.

Wednesday, October 10, 2018

The role of artificial intelligence and machine learning in the military.

Almost every aspect of human life is influenced by science and technology. From the smartphone, there are always two sides of technology. As the field of science and technology has advanced, it has fundamentally changed our perspectives of life. Among those advancements, robotics is the most significant development that is trying to get closer to human life. Although it has managed to do make our daily lives easier, they can still create problems.

As we undoubtedly aware, machine learning algorithms build a mathematical model based on sample data, known as “training data”, in order to make predictions or decisions without being explicitly programmed to perform the task.

Let’s assume, for now, there are some errors in the training data, what will happen? When machine learning systems fail, it’s rarely because of problems with the machine learning algorithm. It’s more likely, you’ve introduced human error into the training data, creating bias or some other systematic error. Therefore it is better to always be skeptical, and approach machine learning with the discipline you apply to software engineering.

"It is better to always be skeptical, and approach machine learning with the discipline you apply to software engineering"


Use in Defense

If you want to know about any country’s innovative technology, then you should look at the weaponry that is being used by the defense forces of that country. Although many of these technologies are sensitive and secret, it would be appropriate to understand some of the issues related to Artificial Intelligence in the defense forces. According to Elon Musk, the founder of Tesla and SpaceX, if the third world war happens then the robotics will be in the main role. Like the ban on human creation from DNA-cloning, more and more individuals are asking for curbs on the use of AI in military.


Elon Musk, Stephen Hawking and Steve Wozniak on AI

AI and robotics are playing an increasingly prominent role in the field of weapon design. An open letter signed by Elon Musk, Stephen Hawking and Steve Wozniak, among others, made the case that weaponized robots could lead to “a global AI arms race” that turns self-directed drones into “the Kalashnikovs of tomorrow.”

“We believe that AI has great potential to benefit humanity in many ways and that the goal of the field should be to do so,” the open letter reads. “Starting a military AI arms race is a bad idea and should be prevented by a ban on offensive autonomous weapons beyond meaningful human control.”

This isn’t the first time these technologists have warned of the dangers of artificial intelligence. Musk has warned before that there “needs to be a lot more work on AI safety,” and a previous open letter from Musk, Hawking, Wozniak, and others spoke of the “pitfalls” that lay in wait, if the research wasn’t done carefully. The solution, according to Musk and others, is a ban on autonomous weapons, similar to the kind that governs chemical weapons.

History suggests that such a ban could be hard to approve, let alone enforce: Despite many major powers signing the 1925 Geneva Protocol banning the use of chemical and biological weapons, countries such as Japan and the United States did not become signatories until as late as the 1970s, according to the Arms Control Association. And even then, claims are still made about the use of such weapons in violation of the ban.

Today we mostly rely on the fear of mutual destruction and voluntary commitments by countries such as China and India on a “no-first-use” policy that only permits the firing of nuclear weapons in response to a nuclear attack.
In addition, once humans perfect artificial intelligence, the AI thus created might be tempted to improve upon its perceived flaws. Can humans with limited biological evolution compete with robotics? The question we all face is, Do we use new research to save mankind or to destroy it? The decision rests in the hands of researchers and governments. It is up to us to make sure that technology saves us, and not destroy everything we hold dear.


Published in Aspioneer Digital Magazine, PUNE. 
The role of artificial intelligence and machine learning in the military.
https://aspioneer.com/the-10-disruptive-rpa-companies-to-watch-2019/
https://aspioneer.com/the-role-of-artificial-intelligence-and-machine-learning-for-military-use/


Tuesday, October 9, 2018

तुमच्या तिजोरीच्या चाव्या सुरक्षित आहेत काय ?

आपण आपले पैसे, महत्वाचे कागदपत्र इत्यादी आपल्या तिजोरीत ठेवतो आणि त्या तिजोरीला लॉक लावतो आणि तिजोरीची चावी अशा ठिकाणी लपवून ठेवतो जिथं सहसा कोणीही पोहचणार नाही. परंतु या टेक्नॉलॉजीच्या युगात आपले महत्वाचे कागदपत्र, आपला सारा ऐवज हे सर्व तर तंत्रज्ञानाने उघडलेल्या खात्यामध्ये आहे. त्याच्या चाव्या कुठं आणि कशा सुरक्षित आहेत ? याचा विचार आपण केला आहे का ? केवळ इंटरनेट बँकिंगच नव्हे तर दैनंदिन जीवनात वापरली जाणारी बाकीची इतर खाती किती सुरक्षित आहेत हेही जरा तपासण्याची गरज आहे. आपला पासवर्ड किती जणांना माहित आहे? तो किती सुरक्षित आहे? बँकेकडे कोणत्या पातळीपर्यंत सुरक्षित राहू शकतो ? परवाचा कॉसमॉस बँकेवर जो हल्ला झाला त्यात तुमचे तर खाते नव्हते ना? आणि जर असते तर? तुमच्या पासवर्डची ताकत किती आहे ? तुमचा पासवर्ड चोरण्यासाठी हॅकर्स काय करतात ? आपण या लेखात अशा अनेक प्रशांवर नजर टाकणार आहोत.

काही दिवसापूर्वी सर्वोच्च न्यायालयात 'व्यक्तिगत माहिती संरक्षण विधेयक २०१८'  सादर करण्यात आले. विधेयक आल्यानंतर व्यक्तिगत माहिती संरक्षणासाठी असा कायदाही काही दिवसांनी अस्तित्वात येईल. या कायद्याने देशातील प्रत्येकाला माहितीच्या खाजगीपणाचा अधिकार मिळाला आहे असे वाटत जरी असले, तरी सर्वाधिक माहिती ज्याच्याकडे आहे, त्या सरकारला मात्र या कायद्याच्या कचाट्यातून मुभा देण्याचे काम मात्र या कायद्याने केले आहे आणि ते न्यायालयाने दिलेल्या निवाड्याच्या विरोधातही आहे. एखाद्या व्यक्तीची सर्व संवेदनशील माहिती घेण्यापूर्वी तिचा सुस्पष्ट होकार असावा. या संवेदनक्षम माहितीमध्ये पासवर्ड, आर्थिक माहिती, आरोग्याशी संबधित माहिती, लैंगिक आयुष्य, बायोमेट्रिक माहिती त्याचप्रमाणे जात, धर्म, पंथ, जमाती किंवा राजकीय विचारधारा यांचा समावेश होतो. आजपर्यंत माहितीसाठी मग ती खाजगी कंपन्यांनी किंवा सरकारने गोळा केलेली असो, याबाबत कोणतीही चौकट अस्तित्वात नव्हती. आता या कायद्यानिमित्ताने ती चौकट तयार होत आहे.  कंपन्या व सरकार अगदी सहजरीत्या आपल्याकडून माहिती गोळा करतात. कधी सेवा पुरवण्याच्या निमित्ताने तर कधी एखादी सुविधा देण्याच्या निमित्ताने. नंतर याच माहितीचा वापर सामग्री म्हणून केला जातो. हीच माहिती नंतर इतर खाजगी कंपन्यांना विकली जाते. इथून पुढे माहिती विकण्याअगोदर किंवा त्यात बदल करण्याअगोदर माहितीपूर्ण, स्वच्छ, स्पष्ट आणि नेमक्या शब्दात, ज्या व्यक्तीची माहिती आहे व्यक्तीची परवानगी घेणे आवश्यक आहे. त्याचवेळी माहितीचा वापर करण्याचा, बदलण्याचा  किंवा काढून टाकण्याचा अधिकारही ज्या व्यक्तीची माहिती आहे त्याच व्यक्तीला असेल. अर्थात ही सर्व माहिती डेटाबेसमध्ये इन्क्रीपटेड स्वरुपात असते. म्हणजेच मनुष्याला सहसा वाचता न येणारी. त्याच्या परवानगी नंतरच ती वाचता येवू शकेल. आणि ज्या कारणासाठी ही माहिती गोळा केली आहे केवळ त्याच कामासाठी तिचा वापर केला जाईल. इतर कोणत्याही कामासाठी त्या माहितीचा वापर करता येणार नाही. हेही हा कायदा सांगतो.

याबरोबरच आपण आपल्याबाजूनेही कशाप्रकारे आपल्या माहितीबद्दलची सुरक्षा ठेवू शकतो ते पाहूयात. पासवर्ड चोरण्यासाठी हॅकर्स डिक्शनरी अटॅक, हायब्रीड अटॅक , बूट फोर्स अटॅक अशा अनेक हल्ल्यांचा वापर करतात. डिक्शनरी अटॅकमध्ये हॅकर्स युवझर्सचा पासवर्ड इंग्लिश शब्दकोशानुसार तपासत जातो. अनेक लोक इंग्रजी भाषेतला कोणताही एखादा शब्द पासवर्ड म्हणून वापरतात उदा. success, inspire, awesome, happy, वगैरे. हॅकर्स डिक्शनरीमधले सगळे सर्व शब्द कॉम्पुटरच्या एका फाईलमध्ये भरतात. या फाईलला डिक्शनरी म्हणून ओळखलं जातं. आता ज्या वेबसाईटवर एखाद्या माणसाचा पासवर्ड चोरायचा असेल त्या वेबसाईटवर हॅकर त्या माणसाचा युझर आयडी भरतो. पासवर्डच्या ठिकाणी हॅकर डिक्शनरीमधला पुढचा शब्द वापरण्याच तंत्र वापरतो. यासाठी त्याला माहिती हाताने भरण्याची अजिबात गरज नसते, त्याच्यासाठी डिक्शनरी फाईल तयारच असते. या डिक्शनरीमधला पुढचा शब्द पासवर्ड म्हणून वापरत रहा आणि तो शब्द पासवर्ड म्हणून चालला नाही तर त्याच्या पुढचा शब्द पासवर्ड म्हणून वापरत रहा, याच्यासाठी त्याच्याकडे एक छोटासा प्रोग्राम लिहून तयार असतो. ज्या वेळी डिक्शनरीमधला एखादा शब्द मॅच होतो तेव्हा ते खाते हॅक झालेले असते. अशा पद्धतीने हॅकर्स डिक्शनरी अटॅकचा वापर करून खाती हॅक करतात.

लोकांना जेव्हा डिक्शनरी अटॅकबद्दल समजतं तेव्हा ते कटाक्षाने आपला पासवर्ड एखादा अवघड शब्द वापरण्याविषयीची काळजी घेतात. असं असूनही त्यांच्या पासवर्डवर यशस्वी हल्ला होतोच. आपला पासवर्ड कुठलाही इंग्लिशमधला शब्द नसावा त्यासाठी पासवर्डमध्ये बारीकसा बदल करतात. समजा एखाद्या व्यक्तीचा पासवर्ड apple असेल, तर तो apple1 किंवा apple123 असा करतो. परंतु यात इंग्लिशमधला शब्द आलेलाच असतो. काही विशिष्ट शब्दानंतर अंक आहेत आणि अंकावर लूप (वारंवारता) लावता येते. हॅकर्स अशा रीतीने असे सोपे पासवर्डही हॅक करू शकतात. यालाच हायब्रीड अटॅक म्हणतात. मूळ इंग्लिश शब्दांमध्ये काही अंकाची किंवा चिन्हांची भर टाकून तयार केलेले हायब्रीड पासवर्ड म्हणजेच जोड पासवर्ड मूळ इंग्रजी शब्दांच्या पासवर्ड म्हणून केल्या जाणाऱ्या वापराहून निश्चितच जास्त सुरक्षित असतात म्हणून ते पूर्णतः सुरक्षित असतातच असं नाही. आता बहुतांशी इंटरनेट बँकिंग साईट्सनी केवळ तीन अयशस्वी प्रयत्नानंतर इंटरनेट बँकिंग खाते लॉक करतात. सुरक्षेच्या दृष्टीने ही एक निश्चितच चांगली गोष्ट आहे.

दुसऱ्या बाजूला ब्रूट फोर्स अटॅकमध्ये हॅकर्स त्याला शक्य तितक्या सर्व शब्दांचा किंवा शब्द्श्रुखलांचा पासवर्ड म्हणून वापर करून बघतात. उदा. A, B, C, D,.... ही अक्षरं एकापाठोपाठ एक पासवर्ड म्हणून वापरून बघेल त्यातून पासवर्ड फुटला नाही तर हॅकर a, b, c, d,.... ही अक्षरं एकापाठोपाठ एक पासवर्ड म्हणून वापरून बघेल. त्यानंतर aa, bb, cc, dd, .... ही अक्षरं एकापाठोपाठ एक पासवर्ड म्हणून वापरून बघेल. असं करत करत हॅकर शक्य तितक्या शब्दांचा पासवर्ड म्हणून वापर करून बघेल. अर्थात हे खूप कष्टाच आणि वेळखाऊ काम आहे. म्हणून यासाठी त्याच्याकडे प्रोग्राम तयार असतो. प्रोग्राम हॅकरसाठी हे सारं काम आपोआप सोपं करून देतो. यातून खरा पासवर्ड हॅकरच्या हाती लागेलच याची खात्री नसली तरी बरेचदा असाही हल्ला यशस्वी होतो. अगदीच सोपं करून सांगायचं झालं तर आपल्या पासवर्डची लांबी पाच अक्षरं किंवा त्याहून कमी असेल तर असा पासवर्ड हॅक करण्यासाठी हॅकरला फक्त पाच सेकंद पुरेशे असतात. ही लांबी सात अक्षरांहून कमी असेल तर हॅकर असा पासवर्ड एका दिवसात फोडू शकतो. ही लांबी नऊवर गेली तर पासवर्ड फोडण्यासाठी त्याला शेकडो वर्ष लागू शकतात. समजा आपण दहा अक्षरी पासवर्ड निवडला आणि त्यात कॅपिटल लेटर, स्मॉल लेटर, अंक, विशेष चिन्ह या सर्वांचा समावेश असेल तर असा पासवर्ड फोडण्यासाठी हॅकरला ९१८०० वर्षे लागतात. म्हणूनच तर आपल्या पासवर्डमध्ये कोणताही डिक्शनरी शब्द नसावा, त्यात किमान एक कॅपिटल लेटर, एक स्मॉल लेटर एक अंक आणि एक विशेष चिन्ह अशी रचना असावी. सुरक्षित पासवर्ड कसा तयार करायचा आणि लक्षात ठेवायचा यावर आपण एकदा नजर टाकुयात. आता समजा मला दोन मुलं आहेत. एकाच नाव राम आहे आणि एकाच नाव श्याम आहे. हेच मी जर इंग्लिशमध्ये लिहिलं, तर हे वाक्य असं बनेल I am having 2 kids, Ram & Shyam. आणि या वाक्यामधल्या शब्दामधलं मी जर पहिलं अक्षर घेतलं तर तो शब्द असा बनेल Iah2kR&S. तोच मी पासवर्ड म्हणून वापरू शकतो जेणे करून माझ्यासाठी हे लक्षात ठेवण्यासाठीही सोपा असेल. अशी अनेक वाक्य बनवून आपले सुरक्षित पासवर्ड बनवू शकतो आणि लक्षातही ठेवू शकतो.

Published in Saptahik Chaprak 10 Sept.-16 Sept. 2018.

Monday, October 1, 2018

जागेपणीच पडतात!


आज तीन वर्षे होतील औंधमधल्या त्या जुन्या ऑफिसला! एम्पलॉयी वाढायला लागलेत म्हणून मागच्याच महिन्यात मी मगरपट्ट्यात हजार स्क्वेअर फुटच ऑफिस घेतलं. माझी ओनर आणि मॅनेजिंग डायरेक्टर म्हणून खूप धावपळ होतेय. ही धावपळ कंपनी चालू केल्यापासूनच आहे! सध्याच्या घडीला हेडकाउंट सत्तरच्या आसपास आहे. वेगवेगळ्या टेक्नॉलॉजीवर बारा प्रोजेक्ट्स चालू आहेत. मागच्या सोमवारीच ऐंशी हजार डॉलर्सचा एक नवीन प्रोजेक्ट आला, खरं म्हणजे आज येणार आहे. आज मी ऑफिसमध्ये जरा नेहमीपेक्षा लवकरच आलोय. आमचा एक बी.ए. आणि सेल्स मॅनेजर क्लाईंटला रिसीव्ह करायला एअर पोर्टवर गेलेत. सी.एम.एम. लेवल फाइव्ह अमेरिकन कंपनी टेक्नोहटशी नवीन प्रोजेक्टबद्दल चर्चा झाली होती. टेक्नोहटकडून आलेले मॅनेजिंग डिरेक्टर डंकन आणि रॉजर यांना आमचे बीए आणि सेल्स मॅनेजर कंपनीच्या गाडीत घेवून आले. ते आल्यावर अगदी भारतीय पद्धतीने दोघांचे ऑफिसमधल्या कर्मचाऱ्यांनी स्वागत केले. ऑफिस पाहून दोघेही जाम खुष झाले. त्यांची एडमिन टीमने आजच्या रात्रीची रहायची सोय जे डब्ल्यू मेरिओट हॉटेलमध्ये केली होती. दोघे ऑफिसमध्ये आल्यानंतर काही वेळातच कॉन्फरन्स रूममध्ये प्रोजेक्टच्या रिक्वायरमेन्टबद्द्ल पुन्हा एकदा बराच वेळ चर्चा झाली, इस्टिमेशन काढले, ते मंजूरही झाले. काही अटी मान्य झाल्या, काही झाल्या नाहीत. आमच्या मॅनेजरकडून प्रोजेक्ट डिलिव्हरीची डेट दिली. डंकन आणि रॉजरने प्रपोजल पुन्हा वाचून पाहिले. आमची लीगल टीम स्टॅम्पपेपर घेवून तयारच होती. बहात्तर हजार अमेरिकन डॉलर्सला डील फाइनल झाली. सह्या झाल्यानंतर एमओएमबरोबरच स्टॅम्पपेपर आणि प्रपोजल मेलवर पाठवायचे ठरले. डंकनची स्टॅम्पपेपरवर सही झाली. सही करण्यासाठी रॉजरने पेन आणि स्टॅम्पपेपर हातात घेतला आणि ... ...
... आणि मला पलंगावरच डोळा लागला आणि मी कधी झोपी गेलो मला आठवत नाही. 


Wednesday, September 26, 2018

डिजिटलपणाचे दुष्परिणामही भोगणारा इंडिया

देशात नरेंद्र मोदींचे सरकार येताच एका वर्षातच मोदींनी डिजिटल इंडियाची घोषणा केली आणि त्यासंदर्भात उच्च पातळीवर अनेक बदल घडून यायला सुरुवात झाली. भीम ऍप, नोटबंदी आणि इतर ऑनलाईन आर्थिक व्यवहाराला प्रोत्साहन देणारे बदल हे डिजिटल इंडियाला धरूनच झाले आहेत, होत आहेत. यातूनच ई-लॉकर , ई -संपर्क , ई- साईन, डिजिटल अटेन्डन्स अशा अनेक संकल्पना पुढे आल्या किंबहुना गावा-गावातही शेतीचा सात-बारा ऑनलाईन उपलब्ध होण्यास सुरुवात झाली आहे . अनेक किराणा मालाच्या दुकानात पे-टीएम, भीम, मोबिक्विक अशा अनेक मोबाईल ऍपवरून आर्थिक व्यवहार होत आहेत.  परंतु हे व्यवहार करनारा सामान्य माणूस किती सुज्ञ आहे, याबद्दल  किती जागरूक आहे हेही वारंवार तपासण्याची गरज आहे. अर्थात प्रत्येकाला तांत्रिकदृष्टया यासंदर्भाचे ज्ञान असणे गरजेचं आहे. मागच्या महिन्यात बालसिंग राजपूत (महाराष्ट्र राज्य, मुख्य  पोलीस अधीक्षक सायबर विभाग ) यांच्याशी माझी भेट झाली.  आपल्याकडे  तंत्रज्ञानाबद्दल जागरूकता कमी पडत असल्याचे  त्यांचेही साफ मत होते.  सायबर विभागातले गुन्ह्यांचे प्रमाण प्रचंड वाढले आहे.  इंटरनेट हे जगाला जोडणारे माध्यम आहे, त्यासाठी अनेक अंतरराष्ट्रीय कायद्याची गरज आहे किंबहुना भारतातील राष्ट्रीय कायदे सक्षम असूनसुद्धा गुन्हेगार पकडण्यासाठी, तशी यंत्रणा नाही, तसे तज्ञ नाहीत हेही त्यांनी सांगितले.  भारतात या दशकात कुठे लिहिण्या-वाचण्याच्या साक्षरतेचे प्रमाण वाढले आहे. त्यात डिजिटल साक्षरतेचे प्रमाण वाढवणे हे भारतासाठी मोठे आव्हान आहे, नाहीतर डिजिटल इंडिया ही केवळ आश्वासनात्मक योजना राहून बसेल आणि गुन्हेगारीचे प्रमाण वाढतच राहील. डिजिटल इंडिया आणि  इंटरनेट वापराचे वाढते प्रमाण पाहता आपल्याला माहिती तंत्रज्ञान शिक्षणाचा प्रसार आणि प्रचार वाढवावा लागेल.

नोकरीसाठी धडपणारे अनेक विद्यार्थी फेक जॉब ऑफर लेटर्सला बळी पडतात, अर्थात मी स्वतःच एकदा फेक ई-मेल्सला बळी गेलो होतो.  ४-५ वर्षांपूर्वी मी काही फेक मेल्सला बळी पडून काही रक्कम घालवून बसलो आहे. काही बोगस कंपंन्या किंवा नोकरी पुरवण्यासाठी काम करणाऱ्या  एजेंट कंपंन्याही बोगस असतात, याची मला कल्पना नव्हती. अशा अनेक कंपंन्याचे आणि लोकांचे प्रमाण वाढले आहे. त्याकाळी  मी जेव्हा याबाबत तक्रार नोंदवण्यासाठी पोलीस स्टेशनला गेलो, तेव्हा तिथं ना धड चालणारा संगणक होता आणि ना त्याला इंटरनेट होते.  पोलीस स्टेशनमध्ये  अशी दयनीय अवस्था पाहून मला आपल्या व्यवस्थेची कीव आली. त्यानंतर मी पुणे सायबर क्राईम मुख्य कार्यालयाला भेट दिली. तिथं गेल्यानंतर मी काही पोलीस कार्मचाऱ्यांशी सवांद साधला, त्यावरून माझ्या लक्ष्यात आलं कि त्यांना माहिती-तंत्रज्ञानाचे जितकं ज्ञान पाहिजे आहे तितकं ज्ञान त्यांच्याकडे नाहीय. माझ्यासारखेच अनेक लोक अशा सायबर फसवणुकीच्या गोष्टींना तोंड देत असतील.  अशीच दुसरी घटना म्हणजे, काही दिवसापूर्वी माझ्या मित्राचे डेबिट कार्ड एका दुकानात विसरलं,   आणि ते कोणाला तरी मिळाले, काही वेळेनंतर त्याच्या खात्यावरून पहिला आर्थिक घडला, हे  समजताच कार्ड ब्लॉक करण्यासाठी मित्राने  बँकेच्या कस्टमर केअरला फोन केला परंतु फोनवरून १-२-३ असे पर्याय  दाबून योग्य बँकेच्या कर्मचाऱ्यापर्यंत फोन कनेक्ट होण्याअगोदर अनेक आर्थिक व्यवहार होऊन, त्याच्या खात्यावरची सर्व रक्कम गायब झाली होती.  वेळ न घालवता त्याने याबद्दल ऑनलाईन पोलिसात तक्रार करण्याचे ठरवले परंतु सायबर क्राईमची साईटसुद्धा ओपन होण्यासाठी वेळ घेत होती. त्यावरून एक अर्ज डाऊनलोड करून, तो भरून, नंतर अपलोड करायचा होता. परंतु हाई-स्पीड इंटरनेट वापरूनही तो अर्ज  डाऊनलोड झाला नाही. अशीच दळभद्री अवस्था बाकीच्या सरकारी वेब साईट बद्दल मी वारंवार ऐकली आहे. 

दुसऱ्या बाजूला गुन्हेगारांकडून केवळ फसवून पैसे कमवण्यासाठी फेक वेब-साईट बनवल्या जातात. याबरोबरच क्विकर, ओएलएक्स, अमेझॉन, फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा अनेक ऑनलाईन शॉपिंगच्या साईटवरून ग्राहकांना फसवल्याचेही आपण ऐकले असेल. तंत्रज्ञानाबरोबरच आपल्या मानसिकतेचाही फायदा फसवणारे लोक घेत असतात, त्यांच्याकडून फोन कॉल करून, आपले एक प्रकारचे ब्रेन-वॉशच होत असते आणि आपण फसवणुकीचे पीडित बनत असतो. आणि त्यांनतर आपल्याकडे पश्चातापाशिवाय हाती काही उरतही नाही. अशा तपासातले खूप कमी गुन्हेगार पोलिसांना पकडण्यात यश आले आहे. किंबहुना नायजेरियन, उत्तर प्रदेश, बिहारी  गुन्हेगार खूप सावधगिरीच्या पद्धतीने फसवणुकीचे जाळे पसरत असतात आणि ऑनलाईन फसवणुकीच्या गुन्हेगारीमधे नायजेरियन उत्तर प्रदेश, बिहारी लोकांचे प्रमाण जास्त असते. हे लोक ऑनलाईन शॉपिंग, टूर्स अँड ट्रॅव्हल्सचे ऑनलाईन तिकीट, नोकरीचे आमिष अशा अनेक गुन्ह्याच्या प्रकारातून पैसे कमवत असतात.  आणि अशा गुन्हेगारांना पकडण्यासाठी राष्ट्रिय-आंतरराष्ट्रिय कायद्यांची गरज असते आणि या प्रक्रियेतून जाताना पोलिसांची खूप दमछाक होते आणि या गुन्ह्यांचा निकाल लागत नाही. हेही सायबर  पोलीस मान्य करतात. त्यासाठी आपणच अभ्यासिकदृष्ट्या, मानसिकदृष्ट्या प्रबळ असणे गरजेचं आहे. नायजेरियन गुन्हेगार खात्यावर फसवणुकीची रक्कम येण्यासाठी दुसऱ्या खातेधारकांचे खाते वापरत असतात. त्यांनी अगोदरच परकीय नागरिक म्हणून नायजेरियन लोकांचे खाते भारतात निघत नाही असे कारण खातेधारकाला सांगितलेले असते. आणि दोघांच्या संमतीने ती रक्कम काढून नायजेरिन नागरिक वापरत असतो.  परंतु खातेधारकाला खात्यावर  येणारी रक्कम फसवणुकीची आहे याची कल्पना नसते. जेव्हा गुन्हा उघडकीस येतो, तेव्हा तो नायजेरियन व्यक्ती पैसे घेऊन पाळलेला असतो आणि खातेधारक आरोपीच्या पिंजऱ्यात उभा असतो. असे महाभयंकर डिजिटल गुन्हे आज घडत आहेत. सोशल मीडियावरूनही मैत्री करून फसवणुकीचे गुन्हे वाढले आहेत आणि बहुतांश गुन्हे आर्थिक फसवणुकीचेच आहेत. सातारा जिल्ह्यातील काही ग्रामीण लोकांना पे-टीएम बद्दल आणि सरकारी स्कीमबद्दल चुकीची माहिती करून देऊन आर्थिक व्यवहारासाठी सरकार प्रोत्साहन देत आहे असे सांगून पे-टीएम खात्यावरची काही प्रमाणात रक्कम काढून घेतली होती. काही दिवसानंतर अशी कोणतीही स्कीम नव्हती हे लोकांच्या लक्षात आले.

डिजिटल इंडियाच्या पूर्णत्वाकडे जात असताना वरती दिलेल्या, अशा  अनेक सायबर गुन्हेगारीमध्ये सरकारी यंत्रणा किती गांभीर्य बाळगते, त्यावर भविष्यात कश्याप्रकारे काम करते हे पाहणे महत्वाचे आहे. काही दिवसापूर्वी कॉसमॉस बँकेतून ९८ करोड रुपये हॉंककाँगच्या काही खात्यामध्ये ट्रान्सफर झाले, आणि  अशी अनेक उदाहरणं समोर येत असतील आणि त्यात  जर सायबर पोलिसांची तपास यंत्रणा ढसाळ असेल तर साकार होणारा इंडिया हा त्रासदायक आणि आभासी डिजिटल असेल हे आपल्याला मान्य करावे लागेल अर्थात स्वतःला अडकण्यासाठी आपणच एक जाळं अंतरलेलं ठरेल आणि महासत्तेकडे वाटचाल करणाऱ्या भारतासाठी सायबर क्राईमसारख्या मोठ्या संकटांना तोंड देत बसावे लागेल. 

जेव्हा असे गुन्हेगार पोलिसांच्या हाती लागतात तेव्हा पीडितांचे तंत्रज्ञानाबद्दलचे अपुरे ज्ञान कारणीभूत असल्याचे समोर येते म्हणजेच पीडितांच्या मानसिकतेचासुद्धा येथे गुन्हेगारांनी आधार घेतल्याचे समोर येते. असेच इंटरनेट बँकिंग पासवर्ड मिळवणे, ओटीपी, पिन, क्रेडिट कार्ड, डेबिट कार्ड नंबर मिळवणे सहज शक्य होत असते त्यासाठी त्यांना कसल्या प्रकारचं हॅकिंगसुद्धा करायची गरज नसते. कार्डद्वारे किंवा नेट बँकिंग, क्रेडिट कार्डवरून खरेदी करताना कॅश ऑन डिलिव्हरीसारखे पर्याय उपलब्ध असतात. ऑनलाइन खरेदी सोपी असली, तरी त्यातून होणाऱ्या फसवणुकीमुळे तोटा होण्याचाही धोका संभवतो. त्यामुळे ऑनलाइन खरेदी करताना खबरदारी घेणे आवश्यक आहे. याबद्दलची अफाट जागरूकता सरकारकडून, बँकेकडून आवश्यक आहे. हॉटेलमध्ये, मॉलमध्ये , पेट्रोलपंपावर कधीच कोणत्या कर्मचाऱ्याला पिन, पासवर्ड, सीव्हीव्ही सांगू नये, कारण आपले लक्ष नसताना त्यांनी क्रेडिट किंवा डेबिट कार्डचे झेरॉक्स काढलेले क्लोनिंग क्लोन केलेले असू शकते. फोनवरून येणाऱ्या, मेल वरून येणाऱ्या कोणत्याही बोगस ऑफर्स स्वीकारू नये. ऑनलाइन शॉपिंगला सध्या मोठ्या प्रमाणावर पसंती दिली जाते आहे. ऑनलाइन शॉपिंग करण्यासाठी देण्यात येत असलेल्या ऑफर आणि मार्केटमध्ये मिळणाऱ्या वस्तूच्या रकमेपेक्षा कमी किंमत असल्यामुळे ऑनलाइन शॉपिंगला आता पहिली पसंती दिली जाते; मात्र त्यासाठी आवश्यक ती काळजी घेणे गरजेचे आहे. त्यामुळे ग्राहक म्हणून आपल्या वाट्याला येणारी संभाव्य फसवणूक टाळली जाऊ शकते. आपल्याला डिजिटल इंडिया साकारायचा आहे, डिजिटलपणाचे दुष्परिणामही भोगणारा इंडिया नव्हे.

Published in Dainik Surajya, Solapur. on 25 April 219.
 

Sunday, September 9, 2018

खरं तर! असं घडलं!

        होस्टेलवर नुस्ता धिंगाणा असायचा. मेसमधून जेवण करून आलो कि रात्रभर आम्ही गप्पा मारत, कुणाचीतरी मजा घेत हसत-खिदळत बसायचो. आमचा ग्रुप उशिरा जेवायला जायचा, उशीराच झोपायचा. होस्टेलवरही लोडशेडींगमुळं लाईट जायची. लाईट जाऊ नये म्हणून आम्ही होस्टेलच्या रेक्टरकडे वेळोवेळी तक्रारही केली होती. लाईट गेल्यावर आम्ही गाण्याच्या भेंड्या खेळायचो, मोठ्या आवाजात गाणी म्हणायचो, पंजा फाईट खेळायचो. एकदा असंच पंजा फाईट खेळताना जास्त गोंधळ झाला होता, गोंधळावरून होस्टेलमागे राहणाऱ्या तिथल्या लोकल मुलांनी महाराष्ट्राबाहेरील मुलांची रॅगिंगही घेतली होती.  रात्रीचे दोन-तीन वाजल्याचे भानसुद्धा आम्हाला राहत नसत. मी आणि अभिजित वांढेकर एका रूममध्ये राहत होतो. तर एका बाजूच्या रुममध्ये अजिंक्य स्वामी आणि विल्यम फर्नांडीस हे दोघेही कोल्हापूरचे. आणि दुसऱ्या बाजूच्या रुममध्ये साताऱ्याचा मयूर केंजळे आणि पुण्याचा विक्रांत पिटके. वरच्या मजल्यावरून सातारचा अमरजित यवतकर अधून-मधून आमच्या ग्रुपमध्ये यायचा. आम्ही अभिजित वांढेकरला वांड्या म्हणायचो, विक्रांत पिटकेला पिटक्या, विल्यमला विल्ल्या, अमरजीतला आमऱ्या आणि मयूरला मयऱ्या! अशी अजब नावं आमच्या मुखी असायची. माझं बारावीपर्यंत सगळ शिक्षण पंढरपूरला झालं होत. इंजिनीअरिंगसाठी कोल्हापूरला ऍडमिशन घेतलं. नवीन कॉलेज, नवीन मित्र, नवा परिसर अगदी मजेचे दिवस चालले होते. कॉलेज सुटल्यावर आम्ही क्रिकेट खेळायचो तर शनिवार-रविवार गाठून कधी कोल्हापूरचा परिवार फिरायला जायचो. कधी रंकाळा, कधी ज्योतिबा, पन्हाळा तर कधी कोल्हापूरला महालक्ष्मीच्या दर्शनाला. बाकीच्या मुलांचेही ग्रुप बनले होते. कुणाचे ग्रुप ज्यांच्या-त्यांच्या गावांप्रमाणे तर कुणाचे इंजिनीअरिंगच्या ब्रांचप्रमाणे. पण आमच्या ग्रुपमध्ये असं काहीही नव्हतं. ग्रुप कसला! वेड्यांचा बाजार नुस्ता! माझ्या कॉलेजलाईफमधला एकही दिवस असा गेला नाही कि मी वांड्याची अक्कल काढली नाही. बरोबर अजिंक्य, विल्ल्या , मयऱ्या, पिटक्या मजा घ्यायला असतच. पण वांड्या कधी चिडायचा नाही, कारण वांड्या चिडला की आमच्या चेहऱ्यावर भलताच राक्षसी आंनंद चढायचा. मग कधी आम्ही पुण्याचे पिटके महाशय, तर कधी मयऱ्याकडे वळायचो, असा एकामागून एकाचा पोपट करायचा आणि खिदळत बसायचं. अधूनमधून कुणी आपले किस्से सांगत असत. आमची पहिली सेमिश्टर अशीच मजा करत संपली होती. बऱ्याच जणांचे विषय राहिले होते. कुणाचा मॅथ्स-एक, कुणाचा ग्राफिक्स, कुणाचा फिजिक्स वगैरे, वगैरे. कॉलेजच सबमिशन जवळ आलं होतं. होस्टेलवर सगळी पोरं एकमेंकांच जर्नल्स घेवून सबमिशन पूर्ण करत होती. ड्रॉईंगचा आभ्यास करत असताना मयऱ्याने वांड्याला टोमणा मारला "प्लँचेटवर वाटी जशी फिरते तसं ड्रॉईंग काढतोयस रे...." "असू दे, काढू डे कसं तरी... ग्राफिक्समध्ये पास होणं महत्वाचं आहे." म्हणत वांड्याने स्वभावाप्रमाणे दुर्लक्ष करत ड्रॉईंग चालू ठेवलं. माझ्या शीटवर मारलेली रेघ मी अर्ध्यावर सोडत वरती पाहिलं आणि मयऱ्याला विचारलं "हा काय प्रकार असतो?" "आ...रे तो आत्म्याचा प्रकार आहे, भविष्यात काय होणार आहे ते समजतं त्याने...! जावू दे, तू आभ्यास कर."
"खरं की काय?" मी कुतूहलतेने विचारलं. इतक्यात  "हो आम्ही अकरावी-बारावीला करायचो प्लँचेट!" असं म्हणत दारात जर्नल मागायला अजिंक्य आला.
"म्हणजे तुम्हाला तुम्हाला भविष्यात काय होणार आहे ते कळायचं?"
"हो, आणि आत्मा सांगतो ते."
"आता मी हसू कि रडू काय कळेना यार, काहीही फेक ह.. साफ खोटं!" मी हसत हाताला हिसका देत म्हणालो. अजिंक्य म्हणाला "आरे माझ्याबद्दलच्या गोष्टी खऱ्या झाल्या आहेत! मला याचा अनुभव आहे. आणि मीही प्लँचेट करायचं शिकतोयसुद्धा. मला जमायलाही लागलंय."
"आरं तर मग चल कि लेकाच्या आपण पास होतो कि नाही ते बघुयात."
"आसं नाही करता येत ते, त्याला शांतता लागते, अंधार लागतो, मेणबत्त्या लागतात, त्याला आमवश्या किंवा पौर्णिमा लागते आणि त्याचे आणखी बरेच नियमपण आहेत." आता मात्र वांड्याने मान वर केली आणि म्हणाला "हे असलं काही करायचं नाही ह... हे सगळं थोथांड असतं. अंधश्रद्धा आहे ही! आरे सायन्स कुठं पोहचलं आहे आणि तुम्ही असले-कसले प्रकार करताहात."
"तुझ्या घरावरून न्यूटन-आईनस्टाईनचं विमान गेलंय कि काय रे? करून तर बघुयात न. आपण पास होतोय का नाही ते समजेल तरी!"
"काही नाही रे, वांड्या. सब झुठ है!" विल्ल्याने वांड्याला कोरस दिली.
"आता हे ब..घा... दि ग्रेट सायंटिस्ट मिस्टर विलियम फर्नांडीस!" मी विल्ल्याला टोमणा मारला.
"अरे माझं मत काही नाहीरे, पण तुम्हाला करायचं आहे तर करा..." पुन्हा विल्ल्या म्हणाला.
"ठरलं तर प्लँचेट करायचं!" मी प्रॅक्टिसची शीट गुंडाळून ठेवली आणि आणि आमवश्या किंवा पौर्णिमा कधी आहे ते पाहिलं. त्याच रात्रीच्या अडीचपासूनच आमवश्या सुरु होणार होती. अजिंक्यने प्लँचेटची तयारी करायला सुरुवात केली. रात्रीचे दीड-दोन वाजले असतील. त्याने एक मोठे शीट घेतले त्यावर त्याने एका बाजूला मोठ्या अक्षरात इंग्लिशमध्ये 'येस' आणि दुसऱ्या बाजूला 'नो' लिहिले, शीटच्यामध्ये ए टू झेड लेटर्स, शून्य ते नऊ अंक काढले. लोड शेडींगमुळं लाईट जायची त्यामुळं आमच्याकडं मेणबत्त्याही होत्या, त्याने ती शीट पसरून त्यावर तीन-चार मेणबत्त्या प्रेत्येक कोपऱ्यात लावल्या. आम्ही हे सगळं डोळे वटारून पाहत होतो. अजिंक्यने सगळ्यांचे मोबाईल बंद करायला सांगितले, ज्यांना बाहेर जायचे आहे त्यांना बाहेर जाण्यास सांगितले आणि दरवाजा बंद करणार इतक्यात वरच्या मजल्यावरचा आमऱ्या फिजिक्सच जर्नल मागण्यासाठी आला. दरवाजा लावणाऱ्यापूर्वी त्यानेही आत येण्याचा हट्ट धरला, हे सगळं काय चालू आहे हे पाहण्याची त्याची कुतुहलता होती. घाईत मी अमऱ्याला रूममध्ये ओढला आणि अजिंक्यने दरवाजा बंद केला.

             मी, विल्ल्या, मयऱ्या, अजिंक्य, वांड्या आणि आमऱ्या असे एका रूममध्ये होतो. पुन्हा एकदा नियम समजावून सांगितले. अजिंक्यने पुन्हा एकदा अतिशय शांतता राखण्यास विनंती केली. त्याने खिडकीवर चादर टाकली. लाईट बंद केली. आणि सर्व मेणबत्त्या पेटवल्या. शीटवर एक वाटी पालथी करून ठेवली. चौघांना वाटीवर बोट ठेवण्यास सांगितले आणि म्हणाला "वाटी हलायला सुरु झाली की समजायचं आपल्या प्रश्नांची उत्तर दयायला आत्मा आला आहे." मी, अजिंक्य, वांड्या आणि आमऱ्या आम्ही वाटीला बोटाने स्पर्श करून पाहू लागलो. परंतु त्याने सगळ्यांना डोळे मीटण्यास सांगितले. आणि तो स्वतः संस्कृतमध्ये काहीतरी पुटपुटू लागला. मंत्राचा आवाज ऐकताच वांड्या ओरडला "ए..... बंद करा हे सगळं... काय चालवलय हे...? मला भीती वाटायला लागलीय.. अजिंक्य, आमऱ्याच्या आधी मला फिजिक्सच जर्नल दे, मला सबमिशन पूर्ण करायचं आहे!  लाईट ऑन करा पहिलं!" आणि त्यान उठून लाईट चालू केली. त्याच्या चेहऱ्यावर भीती स्पष्ट दिसत होती. "अरे वांड्या, हे अर्धा तास तर करायचं आहे आपल्याला! बघुयात रे आपण, अजिंक्य कसा आत्मा  बोलावतो ते, आजून ते आलेलाही नाही." मी वांड्याला समजावण्याचा, त्याची भीती दूर करण्याचा प्रयत्न केला. परंतु विल्ल्याच्याही अंगात पुन्हा विज्ञानाच भूत नाचू लागलं. तो म्हणाला "लेकाच्यानो, विज्ञानाने आजवर किती शोध लावले, तेच शिकायला आपण इंजिनीरिंगला एडमिशन घेतलंय न? राईटबंधूच्या विमानाचा शोध, एडिसनचा दिवा, ग्राहम बेलचा फोन असे काहीतरी संशोधन करा रे.. ही काय फालतुगिरी लावली आहे. विज्ञानामुळे माणूस वेगवेगळ्या ग्रहावर जावून आला, समोर कोणतीही क्नेक्टीविटी दिसत नसताना हजारो मैलावर असणाऱ्या माणसाला आपण बोलू शकतो, पाहू शकतो." हे ऐकत आमऱ्या पुढं आला आणि म्हणाला "वांडया म्हणतो ते खरंय.. मी वेगवेगळ्या ग्रहावर जाणारय, खगोलशास्त्रज्ञाप्रमाणे चंद्र, तारे पाहणारय. हे असल्या फालतू उद्योगांसाठी आमवशेची, पौर्णिमेची वाट नाही पाहणार, संशोधनासाठी वाट पाहणार.! चला रे आभ्यास करू, माझही फिजिक्सच सबमिशन बाकी आहे."  मी म्हणालो "येह... बस कर आता! मलाही माहितीय हे विज्ञान वगैरे, मीही तुमच्यातलाच एक आहे.. बाहेर काढा रे या बटाट्याला.... आत कोणी आणलं रे याला? आज आमवश्या आहे, आणि पुन्हा संधी दोन अडवडयाने किंवा महिन्याने येणार आहे. आपण फक्त प्लँचेटचा प्रयोग करून बघतोय याच्या आहारी थोडी जात आहोत." अजूनही यावर आमच्यात खूप चर्चा झाली. शेवटी प्लँचेट करण्यास वांड्या आणि सर्व तयार झाले.

            थोडावेळ मयऱ्याने आणि आमऱ्याने वांड्याला दाबून धरला. त्याला अजून थोडं समजावून जरा शांत केला. दुसरं भूत बोलवण्याच्या अगोदर त्याच्या अंगातल विज्ञानाचं भूत बाहेर काढणं गरजेच होतं. विल्ल्याचाही विरोध मावळला. विल्ल्या आणि वांड्याला आता शांत बसण्याशिवाय दुसरा पर्याय नव्हता. पुन्हा अजिंक्यने लाईट बंद केली, दरवाजा बंद केला. "आरे दरवाजा बंद केला तर आत्मा येणार कसा? त्याला दिसणार कसं?" आमऱ्याने मध्येच अजून खुसपट काढलं. अजिंक्य आता पुरता वैतागला होता, "यार...प्लँचेट राहू दे.. माझा मूड गेला आता...  असं करताना याला कडक नियमांचे पालन करावे लागते ... तुम्ही राव सगळी येडयाची जत्रा...!"
"नको नको... आता सगळे शांत बसतील, आपण सुरु करूयात प्लँचेट!" म्हणत मी सगळ्यांना एक शांततेची शपथ घालून लाईट बंद केली.  मी, वांडया, अजिंक्य आणि आमऱ्या पुन्हा आम्ही चौघांनी पालथ्या वाटीवर बोट ठेवलं. अजिंक्यने पुन्हा संस्कृतमध्ये मंत्र म्हणायला सुरुवात केली. पेटलेल्या मेणबत्त्याच्या उजेडात आमची तोंडंच फक्त दिसत होती. वाटी हळू-हळू हलायला लागली आणि वेगवेगळ्या अक्षरावर जावून थांबत होती. अजिंक्यच वाटी हलवत असल्याचे माझ्या लक्षात आलं. अजिंक्यने आत्मा आल्याच सांगितलं. कसला आत्मा? आता मला कळून चुकलं होतं, परीक्षेचा आभ्यास करायचा सोडून, सबमिशन करायचं सोडून आम्हाला कुठून असली दुर्बुद्धी सुचली देव जाणे. वांड्या, विल्ल्या खरा होता हे मलाही माहिती होतं पण आता जे चाललंय ते चालू द्यावं वाटलं. अजिंक्यने आत्म्यास प्रश्न विचारायला सुरुवात केली. तू कोणाचा आत्मा आहे वगैरे वगैरे... दादा कोंडके, नथुराम गोडसे, चार्ली चापलीन अशा वेगवेगळ्या नावावर वाटी फिरून यायची. आमचे विषय निघतील काय? आम्ही पास होवू का? नोकरी लागणार का? याची गर्लफ्रेंड आहे काय? त्याची गर्लफ्रेंड आहे काय? गर्लफ्रेंड कोण? लग्न कधी होणार? आम्ही परदेशात कधी जाणार? असे ठरलेले टिपिकल प्रश्न आम्ही विचारत होतो. वांड्याचा ड्रॉईंग विषय निघेल का? मीही माझ्या मॅथ्स विषयावर प्रश्न विचारला, वाटी 'नो'कडे सरकली. आमऱ्याचा मॅथ्स विषय सुटणार का? विचारले असता वाटी  पुन्हा 'नो'कडे जाऊन थांबली. त्याच्या नोकरीबद्दल विचारल्यास वाटी सूसाईड या शब्दावर सरकत राहिली. सगळीच उत्तरं विचित्र येत होती, हे सगळं अजिंक्यच करत होता हे माझ्या लक्षात आलं होतच पण मी आता बाकीच्यांच्या प्रतिक्रियेसाठी प्लँचेटमध्ये सहभागी होतो. आमचा सगळा मूर्खाचा बाजार संपल्यानंतर आम्ही अजिंक्यला जाम शिव्या दिल्या, त्याची होती नव्हती, तेवढी सगळी अक्कल काढली. मी, विल्ल्या, वांड्या आम्ही सगळे अजिंक्यवर जाम चिडलो. वांड्या पुन्हा पेटला "हे असले उद्योग करण्यापेक्षा अभ्यास करा, राहिलेले विषय तरी निघतील." पुन्हा एकदा त्याने विज्ञानावर आणि अंधश्रद्धेवर भलं मोठ लेक्चर झाडून दिलं आणि सगळे आपापल्या रूममध्ये झोपायला गेले. काही दिवसांनी हा प्रसंग आम्ही सगळेच कधीच विसरून गेलो होतो. आता होस्टेलवर सबमिशन आणि परीक्षेचे वारे जोरात वाहू लागले होते. पीएलच्या सुट्टी अगोदर सबमिशन संपवयाचे होते. नंतर सुट्टीत जोमाने अभ्यास करायचा होता.

            परीक्षा जवळ आली होती. राहिलेले विषय सोडवायचे होते. अभ्यासासाठी कोण लायब्ररीत, तर कोण कुठल्या झाडाखाली, कोण रूममध्येच तर कोण होस्टेलच्या गच्चीवर जात असे. आम्ही सगळे मित्र जेवढ्या जोशात क्रिकेट खेळायचो, कँटीनमध्ये गप्पा मारत बसायचो, फिरायला जायचो, पिक्चरला जायचो, होस्टेलमध्ये गाणी म्हणायचो तेवढ्याच जोमाने आभ्यासही करायचो. मे महिन्यात आमची परीक्षा असायची, सगळ्यांनी पेपर दिले, परीक्षा देवून झाली. ग्रुपमधल्या सगळ्यांना दुसऱ्या सेमिष्टरचे पेपर सोपे गले. ज्याचे पहिल्या सेमिष्टरचे विषय राहिले होते त्यांनाही पेपर सोपे गेले. परीक्षा संपली कि आम्ही चालत ज्योतीबाला जायचो, उन्हाळ्याचे दिवस असल्याने गप्पा गोष्टी करत फिरत, डोंगर-दऱ्यातल्या झाडावर चढून आंबे-जांभळ चाखायचो, होस्टेलच्या दिवसांची मजा कुछ औरच असते. जोतिबाच्याही पाया पडताना अगदी लहाण मुलासारखं आमचे सगळे विषय निघू दे असं निर्लज्जासारखं मागणं मागायचो. परीक्षेनंतरचे दोन-तीन दिवस असे घालवल्यानंतर सुट्टीला प्रत्येकजण आपआपल्या गावी गेला. काही दिवसांनी पहिल्या वर्षाचा निकाल लागला सगळे पास झाले होते. प्रत्येकानं आपापल्या गावावरून ग्रुपमधल्या प्रत्येकाला फोन करून निकाल विचारला. माझा आणि आमऱ्याचा मॅथ्स विषय पुन्हा राहिला होता तरीही आम्हाला दुसऱ्या वर्षाला अडमिशन मिळणार होते, परंतु आम्हाला दुसऱ्या वर्षात हा विषय काढणे गरजेच होतं तेव्हाच आम्हाला तिसऱ्या वर्षाला अडमिशन भेटणार होतं. दुसऱ्या वर्षाच अडमिशन झाल्यानंतर आम्ही दोघांनी पुन्हा मॅथ्स विषयाचा अभ्यास जोमाने चालू ठेवला. पहिल्या वर्षापेक्षा दुसर वर्ष लवकर संपल्यासारखं वाटलं, मॅथ्सच जसंच्या तसं टेन्सन होतं, दुसऱ्या वर्षाच्या पहिल्या सेमिष्टरलाही पुन्हा आमचा मॅथ्स गेला. आम्ही पुन्हा त्यात पास होऊ शकलो नाही. कधी कधी असं वाटायचं कि "काय पाप केलं आणि या गणिताच्या जाळ्यात अडकलो." बऱ्याच जणांनी गणित आणि ग्राफिक्स या सारख्या महाभयंकर विषयांनाला म्हणजेच ड्रॉईंगला वैतागून पहिल्या वर्षातच इंगीनीअरिंगच अडमिशन कॅन्सल केलं होतं. आता आमच्या पुढं मॅथ्स पास होण्यासाठी एकच परीक्षा उरली होती. ती म्हणजे दुसऱ्या वर्षाची दुसरी सेमिष्टर. आमच्यासारखीच वांड्याचीही अवस्था होती, त्याला ड्रॉईंगमध्ये पास होणे आवश्यक होतं. तो ड्रॉईंगमध्ये फारच कच्चा होता आणि आम्ही गणितामध्ये. मी आणि आमऱ्याने रेटून अभ्यास चालू केला. मी वांडयाबरोबर लायब्ररीत अभ्यासाला जायचो. त्याला थोडे मोठ्याने वाचायची सवय होती, प्रश्न वाचला कि तो दोन वेळा पुटपूटायची सवय होती. तोंडी परेक्षेला परीक्षकाने प्रश्न विचारला की उत्तर आठवण्यासाठी वांडया तोच प्रश्न पुन्हा पुटपुटायचा, त्याला अशी गजब सवय होती. एकदा तर परीक्षक म्हणाले "डोंट आस्क टू मी, आय एम अस्किंग टू यु!"

           असंच एके दिवशी रात्री लोडशेडिंगमुळे लाईट गेली होती, पिटक्या त्या दिवशी लवकर झोपला होता, उघडा होवून अगदी कुंभकर्णासारखा घोरत होता. तो दुसऱ्या दिवशी लवकर उठून अभ्यासाला लायब्ररीत जाणार होता. वरच्या मजल्यावरून आमऱ्या आला त्यानं पिटक्याच्या रूममध्ये घुसून मेणबत्ती मागितली. त्यादिवशी माझ्या आणि इतर मित्रांच्या रूममध्ये, कोणाकडच मेणबत्ती मेणबत्ती मिळाली नाही. त्याला कसाही दोन-तीन वाजेपर्यंत अभ्यास सुरु ठेवायचा होता, गणिताचा सराव करायचा होता. शेवटी त्यानं छोट्या मशालीच्या उजेडात अभ्यास करायचं ठरवलं. मशाल बनवण्यासाठी छोटी काटकी आणली, अंधारात कापड शोधू लागला, होस्टेलच्या पॅसेज्यमध्ये  त्याला एक मळके कापड सापडलं, त्यातले अर्धे कापड त्याने फाडून काटकीच्या एका टोकाला गुंडाळलं आणि त्यावर पिटक्याच्या रूममधले खोबरेल तेल ओतून ती दिवटी पेटवून पुन्हा वरती अभ्यासाला गेला. दुसऱ्या दिवशी खालच्या मजल्यावरचे आम्ही सगळे लवकर उठलो. अंघोळीसाठी रांगा लागल्या. पिटक्या बाथरूममधून लेडीजचा आखूड टॉप किंवा ब्लाऊज पिसचा जम्पर घालून आल्याचं  चित्र पाहून आम्ही खिदळून खिद्ळून हसलो. त्याचा अर्ध्यातून खालचा बनियन आमऱ्याच्या दिवटीला वापरला गेला होता. 
  
               काहीही करून आमचा अभ्यास चालू असायचा. त्यावेळीही इंजिनीअरिंगच्या फीज महाभयंकर होत्या त्यामुळं याचाही तणाव असायचा. बऱ्याच मित्रांचा हा विषय पहिल्या, दुसऱ्याच प्रयत्नात सुटला होता, त्यांचा पुढचा अभ्यास चालू असायचा. त्यामुळ बाकीच्या मित्रांची आम्हाला आता जास्त मदत होत नव्हती, तरीही आम्ही एकमेकांच्या मदतीन गणितं सोडायचो, सराव करायचो. दुसऱ्या वर्षाचा एखादा विषय राहिला तरी चालेल पण पहिल्या वर्षाचे सगळे विषय सुटले पाहिजेत तरच आम्हाला तिसऱ्या वर्षाला अडमिशन भेटणार होतं . त्यादिशेनेच आमचा प्रयत्न चालू होता. आता आमचं दुसऱ्या वर्षाचं सबमिशन संपून परीक्षा सुरु होणार होती. परीक्षेच्या सुरुवातीला मागच्या वर्षीच्या विषयांचे पहिले पेपर होते. माझा आणि आमऱ्याचा मॅथ्सचा आभ्यास चांगला झाला होता. आम्ही पेपर देवून आलो, दोघांनाही पेपर सोपा गेला. माझा विषय निघेल कि नाही याबद्दल माझ्या मनात जरा शंकाच होती. आमऱ्या पूर्ण आत्मविश्वासाने सांगत होता कि त्याचा विषय निघणार, तो पास होणार म्हणून! त्याच्या चेहऱ्यावरचा आनंद सगळं सांगत होता. वांड्याही त्याच्या जोडीला होता, तो ड्रॉईंगमध्ये स्कोरिंग घेवून पास होणार असल्याची खात्री देत होता. माझा मात्र चेहरा पडला होता. त्यात आम्ही बाकीचे सर्व पेपर दिले. ग्रुपमधल्या सगळ्यांना पेपर सोपे गेले. मला आणि आमऱ्याला दुसऱ्या वर्षाच्या पेपरच जास्त टेन्शन नव्हतं पण त्याहीपेक्षा पहिल्या वर्षाच्या मॅथ्सचं जास्त होतं. दुसऱ्या वर्षाची परीक्षा संपल्यानंतर आम्ही पुन्हा ज्योतीबाला गेलो, कोल्हापूरच्या महालक्ष्मीला गेलो. एक-दोन दिवसांनी सगळे आपआपल्या गावी गेले. मी जेव्हा जेव्हा पंढरपूरला येत असे नव्हे मी कॉलेजचं सगळं टेन्शन डोक्यातून काढून सुट्टीचा पुरेपूर आनंद घेत असत, परंतु या वेळेला चित्र वेगळं होत. थोडं टेन्शन होतं. दहावी-बारावीला जितकी वाट पाहिली नाही त्यापेक्षा कितीतरी जास्त पटीने मी निकालाची वाट पाहत होतो. जून महिन्याच्या पहिल्या आठवड्यात आमचा निकाल होता. चार जूनला माझ्या घरी मला वांड्याचा फोन आला. माझ्या भावाने फोन घेतला होता, नगरहून अभिजित बोलत असल्याचे सांगितले. मी फोन घेतला, "हं बोल वांडया!"
"आरे तुझा मॅथ्स निघाला.."
"काय सांगतो?" माझ्या चेहऱ्यावर बारीकसे हसू खुलले. "... आणि तुझा ड्रॉईंग रे?"
"हो मी जरा जास्तच स्कोर केला आहे, मलाच समजत नाहीय कसं काय ते... आमऱ्याचं कळलं का ?"
"हं त्याचा मॅथ्स निघाला का..?"
"त्यानं आत्महत्या केली, आता तो आपल्यात नाहीय.."

मी सुन्न झालो. काय बोलावे मला कळेना. माझ्या डोळ्यासमोर फक्त आमऱ्या दिसत होता. काही वेळ मी स्वप्नात असल्यासारख वाटलं. तो असं-कसं करू शकतो यावर माझा विश्वास बसत नव्हता. पुढचं बोलणं सोडून दिलं आणि मी फोन तसाच ठेवून दिला. अर्धाभर तास तिथंच गुडघ्यावर बसलो. माझे डोळे भरून आले होते. माझ्या डोळ्यासमोर आम्ही आभ्यास करतानाच चित्र दिसत होतं. माझे बाबा माझ्या जवळ होते. "आरे नापासच झाला, मग काय झालं आपण पुन्हा परीक्षा देवू, इतकं  भयंकर असं का खचून जातोय? आपण गेलेला विषय पुन्हा सोडवू." मला धरून उठवत म्हणाले.

"माझा मित्र हे  जग सोडून गेला, त्यानं आत्महत्या केली." हे ऐकताच आमच्या घरातील सगळ्यांनाच वाईट वाटले. मी डोळ्यातील अश्रूंना मोकळी  वाट करून दिली.

         होऊ शकेल की आत्तापर्यंत आमऱ्या चुकला, जगाला समजायला. प्रेम, वेदना, जगणं आणि मरणं समजायला. अशी काही घाई गडबड देखील नव्हती. फक्त एक वर्ष वाया गेलं होतं. आमच्या होस्टेलवर नापास झालेली पोरं होतीच ना आमच्याबरोबर मजा-मस्ती करायला. पण तोही नेहमीच मजा-मस्ती जगण्याच्या घाईत दिसायचा. या सगळ्या कालावधीत कधी इतका अस्वस्थ दिसला नाही. तो असं काही करेन असं काही वाटलं नव्हतं. आमऱ्या त्याच्या बालपणाच्या एकटेपणातून कधी बाहेरच येऊ शकला नव्हता. लहानपणी त्याला कोणाकडूनच प्रेम मिळालं नसल्याचं कानावर पडलं होतं. त्यानं इतक्या टोकाचा निर्णय घेतला यावर विश्वास बसत नव्हता. आत्महत्या या कधीच साध्या सरळ नसतात. फार गुंतागुंतीच्या असतात. म्हणजे माणसाने आत्महत्या केली ही गौण गोष्ट नसते. त्याबरोबरच होजारो प्रश्न उभे राहतात. कोणालाही जबाबदार धरू नये म्हणून त्यानं स्वतःला संपवण्यापूर्वी चिट्टी लिहिली होती. लोक त्याला पळपुटा घोषित करतील, स्वार्थी देखील, मूर्ख देखील म्हणतील जेव्हा तो निघून गेला होता. आता त्याला काही फरक नाही पडत लोक त्याला काय म्हणतील. आता तो या दुनियेत नव्हता. तो मृत्यूनंतरच्या कथा, भूतप्रेतांमध्ये विश्वास ठेवत नव्हता. जर कोणत्या गोष्टीवर त्याचा विश्वास असेल तर ती ही की मी ताऱ्यांपर्यंत प्रवास करू शकेन आणि समजू शकेन की त्याची दुसरी दुनिया कशी आहे?

इंजिनीअरिंगच्या तिसऱ्या वर्षाला आम्ही अडमिशन घेतलं. पुन्हा दुसऱ्या वर्षाचेही राहिलेले विषय बरोबर होतेच. आमचा ग्रुप आमऱ्याला खूप मिस करत होता. कारण सह्याद्रीच्या डोंगर-दऱ्या फिरायला तो आमच्या बरोबर नव्हता. राहिलेल्या विषयांचा अभ्यास करायला नव्हता. आमऱ्याचा निकाल आणायला मयऱ्या आणि पिटक्या गेले होते, त्यानं निकाला अगोदरच हे टोकाचे पाऊल उचलले होते. त्याला मॅथ्समध्ये चांगले मार्क्स मिळाले होते तो पासही झाला होता. माझाही अंधश्रद्धेवर काडीमात्र विश्वास नाही आणि अंधश्रद्धेच समर्थन मी कधी केलंही नाही. त्याच्या घरचा, काहीतरी कौटुंबिक प्रोब्लेम असल्याचे समजले होते. प्लँचेट ती गोष्ट खरी झाली होती की त्यानं कौटुंबिक तणावातून आत्महत्या केली? आजही आम्हा सर्वांना हा प्रश्न पडतो आणि आम्ही पुन्हा हादरून जातो. प्लँचेटची ही गोष्ट आम्हा सर्वांना थक्क करणारी होती. तेव्हापासून आम्ही प्लँचेट करण बंद केले.

Wednesday, August 22, 2018

रोबोटिक्सची दुसरी बाजू

           संगणक, इंटरनेट, वेगवेगळी सोफ्टवेअर्स, मोबाईल ऍप्स, रोबोट आणि इतर इलेक्ट्रोनिक्स उपकरणांचा होणारा वापर त्यामुळेच तंत्रज्ञानामध्ये एक प्रकारची उत्क्रांती होत आहे. 'चपराक'ने प्रकशित केलेल्या माझ्या मागच्या काही लेखांमध्ये मी रोबोटिक्स अटोमेशन आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स (ए. आई.) बद्दल बरीचशी सकारात्मक बाजू मांडली होती. आज रोबोटिक्स आणि ए. आई. विषयीच्या जरा नकारत्मक बाबींबद्दल बोलूयात. रोबोटिक्स या तंत्रज्ञानाचे जितके फायदे आहेत तसेच तोटेही आहेत. यात शंका येणे अगदी स्वाभाविक आहे. मग असं सगळ होत असताना मानवाने आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या कितपत आहारी जाणं योग्य ठरेल याचाही कुठंतरी विचार व्हायला हवा. 

           कोणत्याही देशाचं नवनिर्माण तंत्रज्ञान माहिती करून घ्यायच असेल तर त्या देशाच्या संरक्षण दलात वापरल्या जाणाऱ्या शस्त्र-अस्त्रांकडं नजर टाकली पाहिजे, त्या देशाच्या संरक्षण दलाचा पाठपुरावा घेतला पाहिजे. यातील बऱ्याचशा गोष्टी संवेदनशील आणि गुपित असल्या तरी ज्या काही समोर येतात, त्या निश्चितच आश्चर्यकारक असतात. अगदी विचार करायला लावणाऱ्या असतात. प्रत्येक राष्ट्र आपल्या शत्रूराष्ट्राचा अधिकृतरित्या किंवा छुप्या पद्धतीने याबाबतचा पाठपुरावा घेतं असत. म्हणूनच इथं संरक्षक दलातील आर्टिफिशियल इंटीलिजन्ससंबधित काही बाबी समजावून घेणं योग्य ठरेल. आर्टिफिशियल इंटीलिजन्स(ए. आई.)च्या वाढत्या वापरामुळे आर्थिक व औद्योगिक क्षेत्रात खूप मोठे बदल घडून येत आहेत. ते आपल्या देशापर्यंत पोहचलेसुद्धा आहेत किंबहुना मोबाईल आणि कॉम्पुटरद्वारे ते आपल्यापर्यंत देखील पोहचले आहेत. संरक्षण दलातदेखील ए. आई.चा वापर होत असताना आपल्याला दिसेल. आताच्याच एका उदाहरणावर आपण प्रकाश टाकू. अर्थात मागच्या काही दिवसात काही परीक्षणासाठी भारतीय संरक्षण दलात आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर केल्याचे संरक्षण मंत्रालयाने स्पष्ट केले होते. याच्याविषयी अजून बरेच संशोधन करण्यासाठी एका उच्च स्तरीय गटाची किंवा समितीची स्थापना करणार असल्याचे स्पष्ट केले आहे आणि आपली संरक्षण ताकत वाढवण्यासाठीही याची गरज होती हेदेखील यावरून स्पष्ट होते. यासाठी लागणारे तज्ञ सायबर ते अंतरीक्ष क्षेत्रातील निवडले जातील. भारतातील टाटा ग्रुपच्या एका कंपनीकडे याचे नेतृत्व असणार आहे.

               कोग्निटीव्ह रोबोटिक्स, बिग डेटा, आर्टिफिशियल इंटीलिजन्स (ए. आई.), मशीन लर्निंग यासांरख्या संकलपनेमुळे कॉम्पुटर सोफ्टवेअर्स आणि इतर यांत्रिकी उपकरणे सक्षम बनत आहेत. खरे तर, अशा यंत्रणा मानवाच्या बुद्धीपेक्षा अधिक जलद विचार करून त्या पटपट निर्णय घेवून आणखी स्वयंभू बनत असतात. झटपट पुरवले गेलेल्या कॉम्पुटराईज्ड सिग्नल्समुळेच बरेचशी वळणं घेणाऱ्या विमानामागे क्षेपनास्त्र हजारो किलोमीटर अंतरावरदेखील अगदी अचूक निशाणा घेतं. आता इथं आपल्या डोक्यात आणखी काही प्रश्न निर्माण झाले असतील. या प्रणालीमध्ये काही पुरवलेली माहिती कमी असेल किंवा किंचीतशी जरी चुकीची असेल तर ? त्या संवेदनशील परीस्थितीत त्या यंत्रामध्ये करत असलेल्या काही गोष्टी परत घेण्याची क्षमता नसली तर? या यंत्रांच टेस्टिंगच जर चुकीच्या पद्धतीने झाले असेल तर? हो अगदी खरं आहे, असे प्रश्न डोक्यात नाचू लागणं अपेक्षित आहे. आपल्या शिक्षणपद्धतीप्रमाणेच सोफ्टवेअर्स आणि रोबोटमधेही बौद्धिक पातळीवर वर्गीकरण केले जाते. आर्टिफिशियल इंटीलिजन्समध्ये देखील विविध पातळ्या असतात. त्यापैकी नॅरो आणि जनरल या दोन आहेत. सोप्या शब्दांत सांगायचं झालं तर, स्पॅम ई-मेल फिल्टर्स, अटो सर्च, स्वयंचलीत वाहनं किंवा स्वतः गेम खेळणारा कॉम्पुटर ही नॅरो संकल्पनेशी निगीडीत उदाहरणे आहेत. वरती सांगितलेली संरक्षण क्षेत्रातील उदाहरणे जनरल आर्टिफिशियल इंटीलिजन्समध्ये मोडतात. हे सर्व रोबोट अगदी मनुष्याप्रमाणे भावना प्रगट करतील अशा लेव्हलपर्यंत बनवलेले असतात. जसे की ते रोबोट स्वतः आपली ज्ञान ग्रहण करत असतात. अनुभवामधून शिकत असतात. मग यात जर एखादी त्रुटी असेल तर मनुष्याने स्वतःच आपल्यासाठी संकट निर्माण केल्याचे चित्र तयार होईल आणि त्याला पळता भुई कमी पडेल. याचीच भीती अनेक संशोधकांना आहे. असं घडण्याच्या शक्यता प्रत्येक्षात यायला अजून २०-२५ जाऊ द्यावे लागतील. आता सध्यातरी तसे घाबरण्याचे कारण नाही. परंतु आपण त्याच दिशेने वाटचाल करत आहोत असे आपण समजू शकतो. तोपर्यंत काही वर्षात यावर संशोधन होवून बरेच तोडगे निघतील असा विश्वास ठेवायला हरकत नाही. नॅरो आणि जनरल या दोन्ही कृत्रिम बुद्धिमत्तेचा वापर संरक्षण दलात अगदी खुबीनं केला जाऊ शकतो हे सिद्ध झाले आहे. जसे की ड्रोन्स म्हणजेच चित्रफिती दाखवणारी छोटी विमानं. त्यांची संख्याच जास्त ठेवायची कि त्यांना नष्ट करेपर्यंत संरक्षण दलाच अपेक्षित असलेलं काम पूर्ण झालं असलं पाहिजे. यालाच स्वार्मिंग असे म्हणतात. लष्करात स्वार्मिंग पद्धत अतिशय प्रचलित आणि प्रभावी होत आहे कारण रोबोटची संख्या, लक्ष्य गाठण्यातील नेमेकेपणा, कसल्याही धोक्याच्या परीस्थितीत पुढे जाण्याची क्षमता यामुळे शत्रूवर विजय मिळवता येवू शकतो. अशी ड्रोनसारखी छोटी रोबोट्स बनवण्यासाठी तसा जास्त खर्च येत नाही. ही संरक्षण दलासाठी महत्वाची बाब आहे.

             संरक्षण दलातील आधुनिक शस्त्रास्त्र म्हंटल की अमेरिका, रशिया, कोरिया अशा अनेक देशांची नावे समोर येतात. इथं मात्र आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या बाबतीत चीनसारखा देश आघाडीवर असल्याची चिन्ह आहेत. ढेस्ला आणि स्पेसेक्स या नावाच्या संस्थाचा मुख्य अधिकारी एलोन मस्क याच्या मते, जर तिसरं महायुध्द घडलं तर रोबोटिक्स त्यामध्ये अग्रभागात असेल. होणाऱ्या हल्ल्यांमध्ये रोबोटिक्सचा मोठा वाटा असेल. कदाचित या कारणामुळे अंतरराष्ट्रीय कायद्याअंतर्गत मनुष्याच्या डीएनए पासून नवीन मनुष्य तयार करण्यावर अर्थात क्लोनिंग करण्यावर जशी बंदी आणली गेली तशीच बंदी आर्टिफिशियल इंटीलिजन्सवर देखील आणावी लागेल. परंतु रोबोटिक्समधील संशोधकांच्या मते, बंदी आणण्यासारखे सर्व प्रकार अति होत असून याचा विरोधही केला गेला आहे आणि हे विधान हास्यास्पददेखील ठरवले गेले आहे. आण्विक शास्त्रांवर काही कायद्यांतर्गत जशी नियमावली आखली, काही करार केले गेले तशेच आंतरराष्ट्रीय कायदे रोबोटिक्ससाठी बनवावे लागणार आहेत, यात शंका नाही. या युगात ए. आई. हे तंत्र एक प्रकारची दुधारी तलवार आहे. ए. आई.ची जशी सकारात्मक बाजू आहे तशी नकारात्मक बाजू देखील आहे.

      मागच्या काही दिवसापूर्वी आपल्यातून निघून गेलेळे जेष्ठ वैज्ञानिक स्टीफन हॉकिंग यांनी सांगितले होते की संपूर्ण कृत्रिम बुद्धीचा विकास मानवीवंश संपवेल आणि एकदा मनुष्य कृत्रिम बुद्धीमत्ता विकसित करतो तसा तो रोबोट स्वतःच वेगाने पुढे जाईल आणि सतत वाढत जाणाऱ्या दराने स्वत: ला पुन्हा डिझाइन करेल. हळूहळू जैविक उत्क्रांतीमुळे मर्यादित असलेला मानव प्रतिस्पर्धा करू शकेल का? आणि त्यांचे स्थान पुढे ढकलण्यात येईल का? ए. आई.बद्दल अशी गंभीर प्रमेयं त्यांनी मांडून ठेवली गेली आहेत. नवनवीन संशोधनाचा वापर मनुष्याच्या उद्धारासाठी करायचा कि संहारासाठी? शेवटी याचा निर्णय माणसानेच घ्यायचा आहे. आज बेरोजगारीचा प्रश्न सोडवत असताना त्यात आणखी भर पडण्याची भीती अनेक देशांना आहेच. २००१ साली ओसामा-बिन-लादेनने अमेरिकेवर केलेला हल्ला, केवळ विमानं वापरून केला होता, मग हे जर शस्त्र काही दहशतवादी संघटनांच्या हाती लागलं तर तुम्हीच विचार करा काय होईल ?

Published in Saptahik Chaprak, Pune and Dainik Surajya Solapur.

Monday, August 13, 2018

केवळ स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून कसं चालेल ?

               देश स्वातंत्र्य होऊन ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. नेहमीप्रामणे याही वर्षी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला, राष्ट्रगान झाले, सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आपल्या राष्ट्रध्वजाचे स्टीकर आपल्या खिश्याला लावले. आणि भाषणे देवून तीन रंगाचे फुगेही आकाशात सोडले. होय, आनंद आहे! भारताचा प्रत्येक स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण 'चिरायु होवो' म्हणत आपल्या स्वार्थापोटी आपण आपल्या स्वातंत्र्यचा, लोकशाहीचा घात तर करत नाही ना हेसुद्धा तपासण्याची गरज आहे. स्वातंत्र्य मिळाले, राज्यघटना आली त्यानुसार ७१ वर्षे प्रशासनही चालले. तरीही आपल्यासमोर स्वातंत्र्याच्या निगडीत बरीच संकटं आहेत, म्हणजेच आपण राज्यघटना स्वत:हून अर्पण करतो याचाच अर्थ असा असतो की आम्ही एक नागरिक म्हणून घटनात्मक मुल्यांना जोपासण्याचे जबाबदारी घेत आहोत. जी जबाबदारी खूप मोठी असते, जी आम्ही देवावर किंवा कोणा अचिंत्य शक्तीवर सोपवत नाही आहोत. त्यात जे नमूद असेल त्या घटकांनाच धरून आम्ही आपण आपले स्वातंत्र्य आत्मसात करत असतो आणि जगत असतो. आज आपण पाहत आहोत  स्वातंत्र्यदिनी फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो आणि एक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा होत असतो. स्वातंत्र्य होवून जी वर्षे सरली आहेत त्याचा आपण स्वतःहून मागोवा घेतो का? आपली घटना आपल्याला समता, बंधुता देते किंबहुना या समतेच्या तत्वाचे सरकारलाही भान असते काय? याचेही उत्तर नकारार्थी येते. भलेही आज आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असलो तरी या स्थितीतल्या शिखविरोधी हिंसक दंगली असोत अथवा गुजरातमधील मुस्लिमांचा संहार असो, कारण काहीही असले तरीही, ते शासकीय प्रेरणांनी केल्या जावेत, हे कोणत्या स्वातंत्र्याचे किंवा प्रजासत्ताकचे लक्षण आहे? दलित गोहत्या करतात म्हणून त्यांना अमानुष मारहाण झाली, मूलं पळवण्याच्या टोळी समजून लोकांचा जीव घेण्यात आला? कोरेगांव-भीमा मध्ये झालेली दगडफेक? हेच आपल्या घटनेनं आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे का? आंबेडकर म्हणाले होते, जातीभेद नष्ट झाल्याशिवाय देशाचा सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य नाही, परंतु आजचे चित्र स्वातंत्र्यपूर्व जसे होते त्यापेक्षाही विचित्र दिसत आहे. जातिभेद नष्ट होण्याऐवजी आणखी घट्ट होताना दिसत आहे. आपण या महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या जेवढ्या नाचत-वाजत साजऱ्या करतो त्याऐवजी त्यांचे विचार अमलात आणले तर तेच खऱ्या जयंत्या-पुण्यतिथ्याच साजरीकरण ठरेल. आपल्या महापुरुषांना आपण डोक्यावर घेतो परंतु आपण त्यांना कितपत डोक्यात घेतो ? ७१ वर्षानंतरही अनेक जातीसमुहाला  आरक्षण, कर्जमाफी मागण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना पिकाच्या  हमीभावासाठी भांडावं लागतं, या सगळ्या कारणासाठी वेळोवेळी मूक किंवा हिंसक आंदोलनेही होतात. खरचं आपण महासत्तेच्याच वाटेवर चालत आहोत  कि विनाशाच्या असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.  
             "यह आझादी झुठी है, देश कि जनता भुकी है!" १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबईतील मोर्चात आण्णाभाऊ साठे गर्जले होते, हे आपल्याला आजही तितकेच सत्य विधान दिसेल. कारण एकविसावे शतक आणि भारत जे सामतोलात्मक चित्र दिसायला पाहिजे होते, आज ते चित्र दिसत नाही. ७१ वर्षानंतरही आमच्या देशासमोर स्त्री-भ्रुण हत्या, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, स्त्री अत्याचार, जातीवाद, दहशतवाद, प्रांतवाद, भाषावाद असे भले भले प्रश्न तोंड आ असून उभे आहेत. आज हा भारतीय भारतीयत्वाचीच व्याख्या विसरला आहे,  यासाठी आज शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर पुन्हा येणार नाहीत, आमच्या खांद्यावरचा भार हलका करायला याचेही भान आम्हा असले पाहिजे.
                आम्ही क्रिकेट नेहमीच जिंकत असतो खरे, परंतु ओलम्पिकमध्ये भारताचे स्थान काय?  काश्मीरचा प्रश्न कसा सुटणार? सैनिक शहीद होण्याचे कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबणार? आपल्या देशाला विज्ञानवादी लोकांनी ग्रासायला हवे होते, तिथे आज धर्मवादी लोकांनी ग्रासले आहे. यातूनच कट्टरता वाढत जात आहे. अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत विज्ञान क्षेत्रातील संशोधनात किती भारतीय आहेत? यावरही विचार करून हे प्रमाण आपण ७१ वर्षात वाढवलं काय? असे अनेक प्रश्न आजही आहेत. देशाचा जितका पैसा भ्रष्टाचाराखाली गुंतला आहे, तितकाच पैसा दैववादाखालीही गुंतला आहे. धार्मिक द्वेष  आणि इतर भरकटलेल्या मार्गावरच आपले तरुण मनुष्यबळ आपण आज वाया घालवत आहोत. आम्ही गुलामगिरीतून बाहेर  पडलेल्या, भारतासारख्या बलाढ्य आणि स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून प्रतिनिधित्व करत आहोत. खालच्या पातळीपासून ते अगदी अंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपली दखल घेण्याइतपत आपण स्वतः देशासाठी सकारात्मक धडपडत राहिलं पाहिजे, त्यासाठी आपण कायमच झपाटून गेलेलं असलं पाहिजे. जसे कि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू चंद्रशेखर आझाद यांना वेड लागले होते स्वातंत्र्याचे, तसेच आपणही वेडे होवूयात या स्वातंत्र्यला सार्थी करण्यासाठी. यातूनच खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्याचे सार्थक होईल. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत-घेत असता प्रत्येक नागरिकाने स्वत:प्रत अर्पण केलेल्या संविधानाबाबत जागरुक रहायला हवे. आपल्या आचरणात तसेच राष्ट्रीयत्व आणायल हवे! अन्यथा आभासी स्वातंत्र्याचा आरोप आम्हीच सिद्ध करु आणि मग आमच्या राष्ट्रप्रेमालाही केवळ भावनिक सोडला तर वास्तवातही काहीच अर्थ राहणार नाही. स्वतःच्या समाधानास्तव आजून किती दिवस तीच खोटी गाणी रेटून गाणार? कारण सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा!' म्हणण्याऐवजी 'सारे जहाँ से सच्चा हिन्दोस्ताँ हमारा!' असे म्हणणे मला योग्य वाटते!

Wednesday, August 8, 2018

धोके तंत्रज्ञानाच्या वाटेवर

विज्ञानाने मानवी जीवनात खूप बदल घडवून आणले आहेत. 'विज्ञान शाप कि वरदान'  हे वाक्य आपण यापूर्वी बऱ्याच वेळा ऐकलं असेल. खरेतर, आजच्या तंत्रज्ञानाच्या युगात आपण स्वतःला योग्य दिशेने घेऊन जात आहोत काय? याच वेळोवेळी आत्मपरीक्षण करणे गरजेचं आहे. आपण जे मोबाईल, कॉम्पुटर किंवा इतर जी प्रोग्रामिंगद्वारे चालणारी उपकरणे वापरात आहोत त्यातून जे आत्मसात करत आहोत याचा वेळोवेळी विचार करण्याची गरज आहे. या उपकरणांचा आपल्याला आजच्या डिजिटल युगात जगत असल्याचा भलताच  कैफ चढला आहे. जवळ असणाऱ्या कुटुंबीय, नातेवाइकांपेक्षाही मोबाईल आपल्या आवडीचा  होऊन बसला आहे. उदाहरणार्थ. मानसतज्ज्ञांच्या मते, केवळ टाईमपास म्हणून व्यक्‍ती या गेम खेळायला सुरुवात करते. परंतु, याचे सवयीत रूपांतर कधी झाले आणि गेम हा जीवनाचा अविभाज्य भाग कधी बनला, हे खेळणार्‍याला कळतसुद्धा नाही. गेम खेळण्याचे व्यसन काहीसे वेगळ्या स्वरूपाचे असते. हे गेम कधी व्हिडीओ गेम स्वरूपात असतात, तर कधी डिजिटल गेमच्या स्वरूपात.

आजचा तरुणवर्ग  सोशल मीडियाच्या प्रचंड आहारी गेलेला दिसत आहे. लोकांना  फेसबुक, ट्विटर, इन्स्टाग्राम अशा अनेक  साईट्सचे वेड लागलेले आहे. खरे म्हणजे, प्रत्येकाला व्यक्तीस्वातंत्र्य आहे. कोणीही उठतो आणि काहीही लिहितो. यात अनेकांच्या भावना दुखावल्या जातात. तर काही समाजकंठकांच्या भावना भडकल्याही जातात. पण काहीही शेअर करत असताना आपल्या सत्सक विवेकबुद्धीला असे करणे पटते का? आपण भारतीय म्हणून योग्य करत आहोत का ?  या शंभरवेळा विचार करूनच असे पाऊल उचलावे, शब्द हे धार असलेल्या शास्त्रापेक्षा भयानक हत्यार आहे. बरेच लोक चॅटिंगच्याही नको तेवढे आहारी गेलेले दिसतात. यामध्येच फेक प्रोफाईलचा सुळसुळाट समोर आला आहे. आपली खरी ओळख लपवून कोणी तरी दुसऱ्याच्या नावाने प्रोफाइल बनवायचे आणि समाज भडकवणारे काही तरी शेअर करायचे किंवा ज्याचे फेक प्रोफाइल बनवले आहे, त्याची अश्लील फोटो शेअर करून बदनामी करायची. असे महाभयानक अनेक गुन्हे आज पोलीस स्टेशनमधल्या फाईल्समध्ये बंद आहेत.

हे झाले सोशल नेट्वर्किंग साईट्स वापराबद्दलचे, परंतु आपल्या इतर दैनंदिन व्यवहारासाठी आपण इंटरनेटचा वापर करत असतो. जसे की इंटरनेट बँकिंग, ओनलीन शॉपिंग, बिल भरणे इ. हे करत असताना आपण पायरेटेड सोफ्टवेअर न वापरणे, वेळोवेळी ऑपरेटिंग सिस्टिम अपडेट करणे, यूजर आय-डी आणि पासवर्ड कधीही कोणाला न सांगणे, फेक ई-मेल्सला बळी न पडणे, आपल्या वैयक्‍तिक कॉम्प्युटरसाठी, मोबाईलसाठी अँटिव्हायरस वापरणे याकडेही प्रामुख्याने लक्ष्य दिले पाहिजे. एक्सकोड घोस्ट, यूमी, मोबिसेज, वॉनाक्राय, अर्व्हिलाच, बूटनेट, रॅनसमवेअर अ‍ॅडव्हायजरी, कोअर बूट, डोर्कबूट, मेलिसा, झीअस, मायडूम अशा महाभयानक व्हायरसेसमुळे आपल्याला आर्थिक फटका बसू शकतो, आपला कॉम्पुटर, मोबाईल हॅक शकतो कालांतराने आपले बँक खाते हॅक होऊ शकते. हॅकिंगसाठी फेक ई-मेलचा वापर भयंकर वाढला आहे. ओळखीच्या नावाचा वापर करून काही आकर्षक लिंक्स पाठवल्या जातात आणि डमी वेबसाईटवर लॉगीन करायला भाग पाडून यूजर आय-डी आणि पासवर्ड चोरले जातात. मोबाईल क्लोनिंग हा एक भयंकर प्रकार पुढे येत आहे, यात तुमचा मोबाईल नंबर क्लोन केला जातो. तुमच्या मोबाईलवर येणारे सर्व मेसेज, कॉल हे हॅकर्सकडे वळवले जातात आणि तुम्हाला येणारा बँकेचा ओटीपी किंवा अ‍ॅक्सेस कोड चोरीला जाऊ शकतो आणि तुम्हाला माहीत न पडता तुमच्या खात्यावरून आर्थिक व्यवहार होऊ शकतात.

इंटरनेट गेमच्या माध्यमातून ‘गेमिंग डिसऑर्डर’ नावाचा महाभयानक मानसिक आजार जडत असतो, हे गेम खेळणाऱ्यापैकी  बर्‍याच जणांना माहीत नाहीय; पण अलीकडच्या काही दिवसातच या आजाराचा समावेश जागतिक आरोग्य संघटनेने गंभीर स्वरूपाच्या मानसिक आजारांच्या यादीत केला आहे. गेमिंगमुळे आपल्या दिनचर्येत होणार्‍या बदलांकडे आपणच डोळसपणे पाहिले नाही, तर धोका अटळ आहे.  ‘डब्ल्यूएचओ’ आणि अन्य काही तज्ज्ञांच्या मते, सध्या गेमिंगच्या आजाराने ग्रस्त झालेल्यांचे प्रमाण अत्यल्प असून, सुमारे 3 टक्के गेमर्सना या व्याधीने ग्रासले आहे. परंतु, भविष्यात ही संख्या प्रचंड वाढणार आहे. जगभरातील लाखो गेमर्सना ‘गेमिंग डिसऑर्डर’ने ग्रस्त रुग्ण असे संबोधणे चुकीचे ठरेल. अगदी त्यांना गेमिंगचे अत्याधिक व्यसन असले तरी! काही व्यक्‍ती अगदी इच्छेविरुद्धही गेम खेळत राहतात. अशा व्यक्‍तींना ही अवस्था प्राप्‍त झाली आहे, असे मानायला हवे. या लक्षणावरूनच कुशल डॉक्टर या आजाराची ओळख पटवू शकतील. गेम खेळण्याचे व्यसन केवळ लहान मुलांमध्येच असते, असे नाही. मोठ-मोठ्या कार्यालयांमध्येही कर्मचारी अँग्री बर्ड, टेम्पल रन, कँडी क्रश, कॉन्ट्रा यासारखे मोबाईल गेम खेळत बसलेले दिसतात. डिजिटल दुनियेत राहत असल्याबद्दल आज आपण स्वतःची पाठ थोपटून घेतो आहोत. परंतु, या दुनियेत असणारी विविध गेमिंग अ‍ॅप्स व्यसन जडावे अशी महाभयंकर आहेत. या व्यसनाचा परिणाम म्हणून आवेग नियंत्रणाची यंत्रणा म्हणजे ‘इम्पल्स कन्ट्रोल मेकॅनिझम’वर परिणाम होतो. जेव्हा एखादी व्यक्‍ती गेम खेळत असते, तेव्हा मेंदूचा काही हिस्सा उद्दीपित होतो. ज्याप्रमाणे अमली पदार्थांच्या सेवनामुळे ही उद्दीपनाची प्रक्रिया घडते, तशीच हीसुद्धा प्रक्रिया असते. त्यामुळे कॉम्पुटरच्या, मोबाईल गेमच्या जास्त आहारी जानेही धोकादायक ठरू शकते.

अर्थात इंटरनेट हे वापरताना आपला हवारेपणा, आपली मानसिकता नडत असते हे इथं आवर्जून सांगावेसे वाटते. एखाद्या लोटरीच्या मेलच्या बळी पडणे, गेम खेळून जास्त स्कोर करण्याची आपली मानसिकता, स्वस्त दारात खरेदी करण्याची मानसिकता, इ. याबरोबरच सेफ पासवर्ड कसा तयार करावा, व्हायरसचे हल्ले, इंटरनेट बँकिंग, क्रेडिट कार्डचा सुरक्षित वापर, ऑनलाईन फसवणूक म्हणजे काय, सोशल नेट्वर्किंग साईट्सचा वापर करताना घ्यावयाची काळजी, सॉफ्टवेअर पायरसी, आयडेंटिटी थेफ्ट, ऑनलाईन छळ, एथिकल हॅकिंग, मोबाईलची सुरक्षितता या सर्व बाबींबद्दल आपण जागरूक राहिले पाहिजे.

Pubished in Saptaik Chaprak , Pune. 6 to 12 Aug 2018 .
Pubished in Dainik Surajya, Solapur. 11 Aug 2018 .
Pubished in Masik Adhunik Sarthi, Solapur. Jan 2019

Thursday, July 5, 2018

इंटरनेटच्या जन्माची गोष्ट...

       आज आपण जे इंटरनेट वापरतो, चॅटींग करतो, नेट बँकिंग वापरतो, ऑनलाईन शॉपिंग करतो आणि बऱ्याच कारणांसाठी आपण इंटरनेटवरून माहिती पाहतो, याची सुरुवात कशी झाली हे मात्र आपल्यामधल्या बऱ्याच लोकांना माहित नाही. इंटरनेटचे वय तसे फार वर्ष नाही. परंतु इंटरनेटच्या स्वरुपात जी उत्क्रांति होत गेली, ती विलक्षण आहे. काही दिवसांपूर्वी भाजपाच्या एका नेत्याने इंटरनेट महाभारताच्या काळात असल्याचे तारे तोडले होते. सुरुवातीला आपण इंटरनेट म्हणजे नेमके काय हे समजावून घेऊया. संवादासाठी कंप्यूटरने जोडले गेलेले जाळं म्हणजेच इंटरनेट. इंटरनेटचा शोध अगदी योगयोगाने लागला असे आपण म्हणू शकतो. जागतिक पातळीवर संवाद साधण्याकरता म्हणून खूप विचार करुन किंवा खूप संशोधन करून इंटरनेटला जन्म दिला असेही नाही. त्याला कारणीभूत ठरली ती दुसऱ्या महायुद्धाची पार्श्वभूमी आणि त्यावेळीची गरज.  

         १९४६ साली अमेरिकेच्या लष्करासाठी संदेशवहनाच काम करणाऱ्या लोकांना चंद्राच्या पृष्टभागावर बीनतारी लहरी अर्थात सिग्नल्स आदळून वॉशिंगटन ते हवाई बेट यांच्यामध्ये संदेश पाठवणे शक्य झाले होते. या सिग्नल्सचा वापर नेहमीच्या संदेशवहनासाठी अनेक अडचणी आल्यामुळे त्याचा व्यापारासाठी वापर शक्य होत नव्हता. याला आणखी एक संदर्भ होता तो म्हणजे  जॉन पीयर्सने लष्करासाठी कामाला पडणारे  सॅटेलाईटस् आणि त्यांचे सिग्नल्स यांवर लिहिलेल्या शोधनिबंधाचा. १९२६ साली  रॉबर्ट गोगार्ड या शास्त्रज्ञाने संशोधन करुन आपल्या आत्त्याच्या शेतातुन एक रॉकेट आकाशात सोडलं होतं,  त्यामुळे गोगार्डला 'आधुनिक रॉकेट तंत्रज्ञानाचा जनक' म्हणून ओळखले जाऊ लागले होते. या उपग्रहाच्या संशोधनाच्या शीतयुद्धात सोव्हिएत यूनियनन 'स्पुटनिक' नावाचा उपग्रह सोडला.  यात अमेरिका पराभूत झाल्याचे चित्र अमेरिकेचे राष्ट्रपती डवाईट आयसेनहॉवर यांनी मनावर घेतले. त्यातून त्यांनी अर्पा  (ARPA- Advance Research Project Agency) या संस्थेची स्थापना केली. अर्पाच मुख्य उद्दिष्ट होते संरक्षणासाठी दूरसंचार आणि संगणक यावर भर देणे. सुरुवातीच्या काळात अर्पाकडे अमेरिकेच्या अंतराळ मोहिमा, अत्याधुनिक क्षेपणास्त्रांच्या नवनव्या घडामोडी असलेल्या संशोधनाची कामे होती.  १९९३ मध्ये 'स्पुटनिक'ला आव्हान समजून अमेरिकेने 'नॅशनल एरोनॉटिक्स एंड स्पेस अड्मिनीस्ट्रेशन' (NASA) नावाची आणखी एक संस्था स्थापन केली आणि त्यावेळी बंद पडत आलेल्या अर्पाही स्थीर झाली. त्यात ऑस्टिन बेट्स या लष्करी अधिकाऱ्याचा मोलाचा वाटा होता. अमेरिकेच्या हवाईदलाला मदत करण्यासाठी अर्पाच्या संगणकचा मोठा फायदा होत असे. त्यासाठी त्यावेळचे अर्पाचे संचालक जॅक रूईना यांनी जोसेफ लिकलायडर याची नियुक्ती केली. १ ओक्टोबर १९६२ साली अर्पात रुजू झाला. जोसेफ लिकलायडर लहानपणापासूनच खूप खोडकर आणि विचारी होता. कोणतंही यंत्र खोलून जोडण्याच त्याला वेड होतं. लीकलायडरने मानसशास्त्र, भौतिकशास्त्र आणि गणित या विषयात वॉशिंग्टन विद्यापीठातून पदव्या मिळवल्या होत्या. लीकलायडरचा नेहमीच मानव आणि संगणक याचा अभ्यास चालू असत. तो बीबीएन या कंपनीत काम करू लागला आणि काही करारानंतर १९६२ साली बीबीएन कंपनी अर्पात विलीनी झाली. पूर्वीच्या काळी एका संगणकावर एका वेळी एकच व्यक्ती काम करू शके. त्यावेळी लीकलायडरने 'टाइम शेअरिंग' नावाच्या तंत्रज्ञानावर काम सुरु केलं. एक संगणक खूप मोठा असल्यानं तो घेऊन फिरणंही शक्य नव्हतं. अर्पामध्ये खूप संगणक असूनसुद्धा एकमेकांशी संपर्क साधू शकत नसत. यासाठी लिकलायडरने बॉब टेलर या नासामधल्या  व्यक्तीला तंत्रज्ञान प्रमुख केलं. 

        अर्पामधले एकमेकांना कसे जोडायचे या प्रश्नाने बॉबला भेडसावून सोडलं. त्यानं त्या ऑफिसमधले काही संगणक आणि काही कॅलिफोर्नियामधले संगणक जोडले. दुर्दैव म्हणजे काही संगणक मेनफ्रेमभाषेचे तर काही वेगवेगळ्या रचनेचे असल्यामुळे ते संपर्क साधू शकले नाहीत. त्या संगणकांना त्याने टर्मिनल असे नाव दिले होते. बॉबने हे सारे मुद्दे आपला सहकारी हर्जफेल्डसमोर मांडले, संगणकाच्या गरजा वाढत आहेत असा त्याने सूर धरला, हर्जफेल्डने मदत म्हणून बॉबला आणखी निधी मिळवून दिला. त्यावेळेचे संगणक खूप मोठे आणि महागडेही होते. प्रत्येकाला स्वतंत्र संगणक असावा असे वाटत असे. बॉबने आणि नवीन रुजू झालेल्या लॅरी रॉबर्टने  जोडलेल्या संगणकाच्या जाळ्याला अर्पा नेटवर्क (ARPA Network) असे नाव देण्यात आलं. या जाळ्यात डेटा कसा पाठवायचा हा यक्षप्रश्न पुढे उभा होता. यावर बरीच चर्चा झाली. त्यातून 'पॅकेट स्विचिंग'ची कल्पना पुढे आली. एखादं फर्निचरच सामान एका घरातून दुसऱ्या घरात नेण्यासाठी आपण त्याचे छोटे तुकडे करतो आणि नवीन घरात आपण ते पुन्हा जोडतो, असेम्बल करतो. अगदी अशीच ही कल्पना होती. याचप्रमाणे एका संगणकाकडून पाठवलेला मजकूर तुकड्या-तुकड्यात पाठवून योग्य क्रमाने दुसऱ्या संगणकाला पाठवला जाईल, तेव्हा दुसऱ्या संगणकाला मिळताच त्याने त्याच क्रमाने तो जोडावा अशी युक्ती आखली गेली. या संशोधनात काही पॅकेट्स हरवले जात होते तर काही योग्य क्रमाने पोहचत नव्हते. त्यासाठी वेस्ली क्लार्क, लिओनार्ड क्लेईनरॉक या सहकाऱ्यानी कॉम्पुटरमध्ये मेसेज प्रोसेसर बसवण्याचे सुचवले. यातूनच कॉम्पुटर नेटवर्क संकल्पनेचा जन्म झाला. यात बीबीएन कम्पनीचाही मोठा वाटा होता.  ७० च्या दशकात अर्पाने अमेरिकेच्या लष्करासाठी सीमेवर कॉम्पुटर जोडण्यास सुरुवात केली. गरजेच्या चाचण्या होऊ लागल्या. १९७३ साली इंग्लंड आणि नॉर्वेने प्रत्येकी एक कॉम्प्टर घेऊन नेटवर्कमध्ये सामील झाले. १९८२ लिओनार्ड क्लेईनरॉकने डेटा पॅकेट्स पाठवण्यासाठी काही नियम आखले, त्यालाच आपण आज इन्टरनेट प्रोटोकॉल म्हणतो, त्याच्याच नियमावरून कॉम्पुटरचा पत्ता कळतो, त्यालाच आपण आय. पी. ऍड्रेस म्हणतो. ट्रान्समिशन कंट्रोल प्रोटोकॉल आणि इंटरनेट प्रोटोकॉल ही थेअरी आल्यानंतर नेटवर्कमध्ये कॉम्युटरची संख्या वाढू लागली. सहभागी झालेल्या वेगवेगळ्या देशातील संगणकाला आय. पी. ऍड्रेसने ओळखले जाऊ लागले. पीएसआय नेट, नेटकॉम, पोर्टल सॉफ्टवेअर, अल्टरनेट  या कम्पन्या ईंटरनेट सेवा देऊ लागल्या. ९० च्या दशकात संदेश पाठवण्यासाठी ई-मेल सारख्या कल्पनेचा जन्म झाला. हा संदेश पाठवण्यासाठीही आयपी ऍड्रेसचाच वापर होत असे. याबरोबरच एका मुख्य संगणकवरचा मजकूर मिळवण्यासाठी www हे शब्द वापरून  आणि आय. पी. ऍड्रेस वापरून मजकूर मिळवला जात असत. यात टीम बेरनर्स ली या संशोधकाचा मोलाचाही मोठा वाटा होता. 

      आज आपण जी इंटरनेटची उत्क्रांती बघत आहे याच अर्पानेटच हे बदलेलं रूप आहे. वेगवेळ्या ऑपरेटिंग सिस्टिम्स, ब्राऊझर्स, सोफ्टवेअर्स यांनी जोर धरला आहे. बहुदा सर्वच काम इंटरनेटवर होतात. सर्वच इंटरनेट पुरवणाऱ्या कंपन्यामध्ये स्पर्धेच वातावरण आहे. इंटरनेटच्या स्पीडच्या जोरावर 4G, 5G ई. जनरेशनने इंटरनेट डेटा पुरवला जात आहे. 'इंटरनेट ऑफ दी थिंग्ज' या संकल्पनेखाली स्वयंचलित वाहणे चालवण्यासाठी सेन्सर बरोबरच, शहराचे सध्याच चित्र पाहण्यासाठी जास्त स्पीडसह इंटरनेट वापरले जाते. त्यामुळेच सगळी यंत्रणा एकमेकाशी संलगणित राहते. हवामानचा योग्य अंदाज, उपग्रहावरील बातम्या, बँकातील कामे, खेळाचे प्रेक्षेपण, शेअर मार्केट सर्वच क्षेत्रात आज इंटरनेट शिवाय काम शक्य नाही. कॉम्पुटर, मोबाईलच नव्हे तर इंटरनेटमुळे इतर उपकरणातून डेटा देवाणघेवाण करता येतो. इंटरनेटच्या वापरामुळे बुध्दीमान व्यक्तीना या प्रगतीचा उपयोग करणे शक्य झाले आहे. व्यापाराच्या दृष्टीने इंटरनेटमुळे दुहेरी परिणाम होणार आहेत. जागतिक व्यापरपेठ इंटरनेटमुळे खुली झाल्याने आपला माल सर्व जगभर पाठविण्याची शक्यता निर्माण झाली आहे. त्याचवेळी स्थानिक उद्योजकांना बहुराष्ट्नीय कंपन्यांशी स्पर्धा करावी लागत आहे. पर्यावरण क्षेत्रामध्ये इंटरनेट फार उपयुक्त ठरत आहे. इंटरनेट हे ज्ञानाचे भांडार ठरत आहे. थोडक्यात इंटरनेट रूपाने मानवाने प्रगतीचे एक पाऊल पुढे टाकले असून ते उज्वल भविष्याकडे नेईल अशी आशा आहे. वेगवेगळ्या सोफ्टवेअरमुळे, ऍपमुळे, उपकरणांमुळे बरेच मानवी जीवन सोयीस्कर बनत आहे. इंटरनेट हे शैक्षणिक प्रगतीचे अत्युत्तम  साधन बनले आहे . इंटरनेटची गरज व फायदे यांतील मुद्द्यांवरूनही शिक्षणातील इंटरनेटचे महत्त्व  स्पष्ट होते. जगात औद्योगिक, शैक्षणिक वाढ झाली आहे. माहिती देण्यासाठी किंवा घेण्यासाठी इंटरनेटची क्षमता अफाट आहे आणि यात भविष्यातही आणखी आमूलाग्र बदल होत राहतील. म्हणुन आजच्या माहिती तंत्र ज्ञानाच्या युगात इंटरनेट ही काळाची गरज बनली असून अमेरिकेत शोध लागलेल्या  इंटरनेटने दुनिया बदलली म्हणायला हरकत नाही. परंतु आज आमच्या देशात मात्र राजकारणासाठी महाभारतात इंटरनेटचा शोध लावणारे मंत्री होतात  ही आमची शोकांतिका आहे. 

Published in Masik Chaprak, July 18.
Published in Dainik Pudhari (Bahaar Supplement ) on 19 August.

Saturday, June 30, 2018

अच्छे दिन के चार साल?

         २०१४ साली देशात आणि राज्यात सत्तांतर झाले. सरकारकडून अनेक योजनांची घोषणा झाली. नवनवे उपक्रम चालू केले. आता अच्छे दीन येणार याची सामान्य नागरिकांना आस लागली. महागाई जाणार, भ्रष्टाचार जाणार, विदेशातला काळा पैसा येणार, नोकरीचे प्रश्न सुटणार, शेतकऱ्यांना मालाला भाव येणार या गोष्टींच्या आशेवर चार वर्षात अच्छे दिनचा 'अ' सुद्धा  आम्हाला दिसला नाही. ६०-७० वर्षात कॉंग्रेसने काय केले हे आम्हाला सांगता येणार नाही परंतु आमच्या बापजाद्यांनी या सरकारला सत्तेपासून का दूर ठेवले होते, हे आज आम्हाला समजत आहे. खोटं बोलण्याची प्रथा एका विशिष्ठ पक्षातच आहे, हा आमचा गैरसमज आज दूर झाला. या चार वर्षात व्यवस्था बदलणारे बरेच मोठे निर्णय घेण्यात आले किंबहुना ते भारतीयांवर लादले गेले असे म्हणावे लागेल. 

         शाळा, कॉलेजांमधल्या विद्यार्थ्यांना 'मन की बात' ऐकणं सक्तीच केलं गेल होत. आजचा विद्यार्थी उद्याचा मतदार आहे आणि तो आपल्या विचारांकडे अकर्षिला पाहिजे असेच चित्र 'मन की बात'बद्दलचे दिसते किंबहुना आजवर होवून गेलेल्या पंतप्रधानांचे कोणतेच भाषण विद्यार्थ्यांसाठी सक्तीचे होते असे आम्ही अजुन तरी ऐकले नाही. गोमाता, हिंदुत्व, राम मंदिर आणि अनेक समोर आलेले जातीय मुद्दे यातून सामाजिक तेढ वाढत आहे. विज्ञानाची कास धरलेल्याचे चित्र भासवनाऱ्या सरकारच्या गोठामध्ये काय शिजते याचा अंदाज यावरून लागू शकतो. काही सरकारी पदांसाठी युपीएससीची परीक्षाही स्थगीत करण्याचा धक्कादायक निर्णय घेण्यात आला आहे, आपल्याच विचारधारेच्या लोकांची नियुक्ती करण्यासाठी तर सरकारकडून असा बदल करण्यात आला असेल का ? हाही प्रश्न आहे. 

             स्वच्छ भारत हा उपक्रम 'संत गाडगे बाबा ग्राम स्वछता अभियान' या नावाखाली चालत होता. त्याला व्यापक रूप देवून, त्याचा तितकाच प्रसार आणि प्रचार करता आला असता, परंतु 'स्वच्छ भारत' योजनेच्या नावाखाली सामान्यांनाच टॅक्स भरावा लागतो आहे. त्यातून हवे तसे परिणामही दिसत नाहीत. पुणे, औरंगाबाद या सारख्या शहरांचे कचऱ्याचे प्रश्न अजूनही प्रलंबित आहेत. गंगा नदी स्वच्छ करण्याचा प्रकल्प कसा पुढे सरकतो आहे ? हेही कळायला मार्ग नाही. पुण्याच्या मुळा-मुठा याही नद्या स्वच्छ करण्याचे काम हाती घ्यावे लागेल. डिजिटल इंडिया, मेक इन इंडिया, स्किल इंडिया यासारख्या योजनांचाही पाहिजे तेवढा प्रसार झाल्याचे चित्र आपल्याला आज कुठे दिसते? भारत हा कृषिप्रधान देश आहे. गांधी-नेहरूंनी सांगीतले होते खेड्यांकडे चला, परंतु सरकारने स्मार्ट सिटीचे स्वप्न दाखवून सर्वांनाच आश्चर्याचा धक्का दिला. अनेक देशांबरोबर करारांसाठी पंतप्रधानांच्या परदेशी वाऱ्या खूप असतात, त्यामुळे औद्योगिक क्षेत्राला चालना मिळते. परंतु जेवढ्यावेळा पंतप्रधान परदेशात गेले, किमान तेवढ्यावेळा तरी ते भारतातील शेतकऱ्यांमध्ये आले का ? असाही प्रश्न पुढे उभा राहतो. ते शेतकऱ्यांमध्ये आले जरी असले तरी अगदी अलीकडच्या दिवसातच! आगामी लोकसभा आणि विधानसभा निवडणुकाची चाहूल पाहून असे म्हणण्यास वावगे ठरणार नाही. पंतप्रधान स्वतःची 'मन की बात' सांगतात, परंतु शेतकऱ्यांमध्ये जावून, त्यांच रडणं किती ऐकतात? शेतकऱ्यांची मन की बात त्यांनी किती वेळा ऐकली ? देशाला शत्रुराष्ट्राची साखर आयात करावी लागेल अशी दैयनीय परिस्तीथी नसतानाही सरकारने पकिस्तानची साखर आयात केली आणि साखरेचे भाव पाडले. भारताला कृषिमंत्री तरी आहे की नाही आणि त्यांनी कधी शेतकऱ्यांशी संवाद साधला काय? हेही कळायला मार्ग नाही. आता जसे निवडणुकांचे पडघम वाजु लागतील तसे पुन्हा आरक्षणाच, हमीभावाच आणि कर्जमाफीच गाजर दाखवलं जाईल. खर म्हणजे शेतकरी पूर्णतः सरकारवर विसंबून रहावा आणि त्यावर सरकारने सतत आपली राजकीय पोळी भाजत रहावी असेच हे चित्र आहे. सरकार जरी शेतकऱ्यांना धरुन बोलत असले तरी कृतीत मात्र शेतकरी विघातक दिसत आहे.  नोटबंदीच्या काळात सामान्य लोकांना खूप त्रास सहन करावा लागला. देश एका विकासाच्या क्रांतीने वाटचाल करत आहे, असा बऱ्याच जणांचा समज होता, परंतु नोटबंदीतून जे निष्पन्न झाले त्याची माहितीही अत्यंत गोपनीय ठेवली गेली. बऱ्याच उद्योजकांनी बुडवलेल्या प्रचंड कर्जाचे ओझे सामन्यांच्या डोक्यावर आले. मयताच्या सामानावरही  जीएसटी लावणाऱ्या सरकारकडून नोटबंदीचा निर्णय निष्फळ ठरला. काळा पैसा भारतात परत येण्याऐवजी स्विजबँकेत भारतीयांच्या आणखी ठेवी वाढल्या आहेत.

            एका बाजूला मेक इन इंडिया, डिजिटल इंडियासारख्या घोषणा करायच्या आणि दुसऱ्या बाजूला देशात धार्मिक तेढ वाढवायचा, भीमा कोरेगावसारखे जातीय मुद्दे भडकवायचे, असेच आजच्या या सत्तेच्या राजकारणात दिसत आहे. अर्थात औद्योगिक आणि विज्ञानाचा दृष्टिकोण धरुन ज्या योजना सुरु केल्या आहेत त्याचे स्वागत तर आपण केलच पाहिजे, त्याबरोबर बाकीच्याही घटकांवर लक्ष केंद्रित केले पाहिजे. बुलेट ट्रेनसारखे आमिष दाखवून महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडपडणाऱ्या भारताची ही वाटचाल मुख्यत्वे शेती, शैक्षणिक, सामाजिक अशा क्षेत्रावरदेखील आधारित आहे.  शेती, शिक्षण हा सर्वच क्षेत्राचा पाया आहे. शेतकरी आणि शिक्षण विकासाचा केंद्रबिंदू धरला पाहिजे. राज्याचा आणि केंद्राचा विचार करताना आम्हाला आपल्या प्रभागामध्येही किती आणि कशाप्रकारचा विकास झाला याचा विचार करण्याची ही वेळ आहे,  कारण २०१९च्या निवडणुकांचे वारे आत्तापासूनच वाहू लागले आहे.

Published in Dainik Surajya, Solapur.
Published in Dainik Dhyas Prgaticha, Nashik.
Published in Saptahik Chaprak, Pune.

Saturday, June 23, 2018

आर्टिफिशियल इंटीलिजन्स

आजच्या तंत्रज्ञानाच्या दुनियेत आर्टिफिशियल इंटीलिजन्सने ज्याप्रकारे जोर धरला आहे तो विलक्षण आहे. विज्ञानामुळे दिवसेंदिवस दैनंदिन जीवनामध्ये मशीनचा वापर पूर्वीपेक्षाही जास्त होत गेला आणि दिवसेंदिवस मशीनमधेही सुधारणा होत गेल्या आणि आज आर्टिफिशियल इंटीलिजन्सयुक्त संगणकाचा, मोबाईलचा वापर वाढत आहे.

१ आर्टिफिशियल इंटीलिजन्स म्हणजे काय ?
'आर्टिफिशियल इंटीलिजन्स' म्हणजेच अर्थात कृत्रिम बुद्धीमत्ता.  अर्थात कसलाही मानवी हस्तक्षेप न करता संगणकालाच स्वत:चेच नियोजन आणि समोर आलेल्या प्रश्नांची उकल करण्याची क्षमता उपलब्ध करून देणे म्हणजेच आर्टिफिशियल इंटिलिजन्स होय. कृत्रिम बुद्धिमत्ता ही संकल्पना विज्ञानकथांमध्ये जास्त आढळत जरी असली तरी, सध्या ही संगणक अभ्यासक्रमामधील एक महत्त्वाची शाखा बनली आहे. १९५६ मध्ये  अमेरिकेतील डार्ट-माऊथ कॉलेजमधील एका प्रोजेक्टमध्ये आर्टिफिशियल इंटीलिजन्स या संकल्पनेचा शोध लागला गेला. पुढे लेनिन आणि त्याच्या संशोधक सहकाऱ्यांच्या मदतीने कम्प्युटरचे एक विशिष्ठ नेटवर्क उभारण्याचे प्रयत्न केले होते. मानवी मेंदूमध्ये असणाऱ्या न्यूरॉनप्रमाणे नेटवर्क बनवण्याचा त्यांनी प्रयत्न केला होता. केवळ आवाज, प्रतिमेची ओळख, भाषांतर यांद्वारे हे नेटवर्क हाताळले जाते. मनुष्य जसा विचार करतो, विचार करून असंख्य संभावनेतून कोणती कृती करायची? याचा जसा तर्क लावतो आणि नंतर कृती करतो किंवा एखाद्या क्रियेला प्रतिक्रिया देतो, अगदी अशीच कामे एखाद्या यंत्रांकडून करून घेणे त्यावेळी तसे आव्हानात्मक होते. आता ही सर्व कामे संगणकाकडून करून घेणे शक्य झाले आहे. हे सर्व शक्य होत आहे आर्टिफिशियल इंटीलिजन्सच्या सहायाने! कृत्रिम बुद्धिमत्ता मुख्यत: आटोमेशन म्हणजेच स्वयंचलित कार्य करण्यासाठी आवश्यक असलेली बुद्धिमान वर्तणूक करू शकतील अशा कामांसाठी वापरली जाते. आर्टिफिशियल इंटीलिजन्सचे मुख्यत्वे दोन प्रकार पडतात. रूढ (कन्वेन्शनल ए. आय.) आणि संगणकीय (कंपुटेशनल ए. आय.) कृत्रिम बुद्धिमत्ता. रुढ कृत्रिम बुद्धिमत्ता ही यंत्रांचे शिक्षण व संख्याशास्त्र यांमध्ये विभागली जाते. ही बुध्दिमत्ता चिन्हांवर आधारित, तर्काधारित, सुयोजित असते. याला एक्स्पर्ट सिस्टीम असेही म्हणतात. या प्रोग्रामिंगला प्रचंड प्रमाणातील माहितीचे विश्लेषण करून उद्दिष्टांपर्यंत पोहोचवावे लागते, रूढ (कन्वेन्शनल ए. आय.) मध्ये उदाहरणावरून तर्क करणे, वर्तनावरून तर्क करणे याचाही समावेश होतो. रोबोट जरी आकृतीने माणूस दिसत नसला तरीही माणसाप्रमाणेच वागत असतो, माणसाप्रमाणेच काम करत असतो. तर संगणकीय (कंपुटेशनल ए. आय.) कृत्रिम बुद्धिमत्तेचे न्यूरल नेटवर्क, फझी सिस्टिम्स, इव्होलुशनरी कंपुटेशनल असे प्रकार पडतात. एखादा पॅटर्न तपासणे किंवा औद्योगिक व ग्राहकोपयोगी वस्तूंच्या निर्मितीमध्ये नियंत्रण करण्यासाठी किंवा जीवशास्त्रीय संकल्पनांचा उपयोग करून दरवेळी अचूक उत्तर शोधण्यासाठी कंपुटेशनल एआयचा उपयोग होतो.

२ आर्टिफिशियल इंटीलिजन्समुळे मानवी जीवन सोपे कसे होणार?
प्रत्येक क्षेत्रात अटोमेशन होत आहे परंतु त्याच वेगाने अटोमेशनच्या प्रक्रियेतही दिवसेंदिवस बदलही होत आहे. इमेज रेकग्निशन, फेस रेकग्निशन, व्हाईस रेकग्निशन या कामांमुळे बऱ्याच गोष्टी सोप्या झाल्या आहेत. यामुळे इंटरनेट विश्वातली सुरक्षितता वाढली आहे. फेसबुक, गुगल, मायक्रोसॉफ्ट यासारख्या मोठ्या कंपन्यांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्ससारखं शस्त्र हाती घेवून  दैनंदिन जीवण  सोपे करण्यास सुरवातही केलेली आहे.  बँकेमध्ये सुपर इंटीलिजन्सचा उपयोग व्यवहार सांभाळण्यासाठी, शेअर्समध्ये गुंतवणूक करण्यासाठी तसेच मालमत्ता सांभाळण्यासाठी केला जातो. रुग्णालयांमध्ये कृत्रिम बुद्धिमत्ता असलेल्या प्रणाली या बिछान्यांचे वेळापत्रक तयार करणे, कर्मचाऱ्यांच्या कामाच्या वेळा बदलत्या ठेवणे, वैद्यकीय माहिती देणे यासारख्या कामांकरिता वापरात आहेत, रोगाचे निदान करणे, शस्त्रक्रिया करणे यामध्ये रोबोट वापरले जाऊ लागले आहेत. आणि महत्वाचे म्हणजे सैन्य दलात आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर करून रोबोट आर्मी बनवली जात आहे. शिक्षण देण्यासाठीही आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर होऊ शकतो. अमेरिका, जपान, रशिया यासारख्या देशांमध्ये या मोहिमेला सुरुवातदेखील झाली आहे. इतर क्षेत्रात, मार्केटमध्येही खरेदी विक्रीसाठी आर्टिफिशियल इंटीलिजन्सचा वापर वाढत आहे.  भविष्यात रोबोटिक्स आणि आर्टिफिशियल इंटीलिजन्स वापरून बनवलेल्या  स्वयंचलीत वाहनामुळे ट्रॅफिकसाखा कठीण प्रश्न सुटला जाईल. अर्थात या सर्व संकल्पना प्रलंबित होत आहेत सध्याच्या नेटवर्क आणि इंटरनेट स्पीड यासारख्या अनेक येणाऱ्या अडचणींमुळे! आपल्या मोबाईलमधे एप्पल, मायक्रोसॉफ्ट आणि गुगल सारख्या मोबाईल कंपन्यांनी दिलेले सिरी , गुगल असिस्टंट, कॉर्टेना यासारखे रोबोट आपण अनुभवत आहोत. 

३  आर्टिफिशियल इंटीलिजन्सपुढील आव्हाने काय आहेत?
अटोमेशनमुळे निर्माण झालेल्या बेरोजगारांना नोकऱ्या देणे किंवा त्याच बेरोजगारांना शिक्षणाने तंत्रज्ञानात सक्षम करणे, जेणे करून तंत्रज्ञानात अजून काही नवीन संकल्पना प्रत्यक्षात आणून उद्योगधंदे उभा राहीतील अशी तंत्रज्ञान शिक्षित पिढी तयार करणं, हे रोबोटिक्समुळे समोर आलेले  सर्वात मोठे आव्हान असणार आहे.  अर्थातच आज महासत्ता होण्याचे स्वप्न वास्तवात आणण्यासाठी धडपडणाऱ्या भारतारख्या देशाला आर्टिफिशियल इंटीलिजन्स आणि रोबोट या संकल्पना प्रत्येक्षात उतरण्यात जे मनुष्यबळ लागते आहे, असे मनुष्यबळ तयार करणे हे सर्वात मोठे आव्हान असणार आहे. अर्थात याचा खर्च सर्वसामान्यांना परवडणारा नसेल. अटोमेशनला धरून प्रत्येक क्षेत्रात प्रोसेस स्टॅन्डरडाईज करावी लागणे हेही एक आव्हान असणार आहे.

४ आर्टिफिशियल इंटीलिजन्समुळे काय नुकसान झेलावे लागेल?
आज बेरोजगारीचा प्रश्न सोडवत असताना त्यात आणखी भर पडण्याची भीती अनेक तज्ञांना आहे. स्पेसेक्स या कंपनीचे मुख्याधिकारी एलन मस्क यांनी आर्टिफिशियल इंटीलिजन्स ही संकल्पना मानव जातीला धोक्याची असल्याचे मत काही दिवसाखालीच देले होते. यांच्या मतानुसार एआयच्या माध्यमातून आपण धोक्याचा मार्ग पत्करत असल्याचे सांगितले होते. काही दहशतवादी आपली सायबर आर्मी बनवत असल्याची माहिती पुढे येते आहे. त्यात रोबोटिक्ससारखे धारदारी हत्यार दहशतवाद्यांच्या हाती पडले तर आणखी  दहशतवाद वाढायला वेळ लागणार नाही. अशा गोष्टीला सामोरे जाणे हेही मोठे आव्हान असेल. काही सिनेमांमध्ये आपण हे चित्र पाहिले आहे, एक रोबोट खलनायक कसा बनतो आणि माणसाविरोधी कसे काम करतो. अर्थात स्वतः शिक्षण घेणारे रोबोट मनुष्यापेक्षाही हुशार होतील अशीही भीती आज तज्ञांना आहे. 

          या उलट काही शात्रज्ञांकडून हे मुद्दे खोडलेही जात आहेत, त्यांच्या मते, जेव्हा कंपन्यांमध्ये, कारखान्यांमध्ये एका-एका साध्या  मशीनचा वापर होत चालला होता  तेव्हाही बेरोजगारीचा प्रश्न आला होता, परंतु मनुष्याने त्यावरही मात केलेली आहे.   आणि एआयमधे अजून ज्या काही सुरक्षतेच्या बाबींवर प्रभुत्व मिळाले नाही, काही दिवसांनी ते शक्य होईल. त्यामुळे जग आज आर्टिफिशियल इंटीलिजन्सला घेवून सकारात्मक वाटचाल करत असताना दिसत आहे आणि तंत्रज्ञानात घडून येणारी एक नवी क्रांती असेल. 

Pubished in Dainik Surajya. Solapur.