Search in Google

Monday, April 29, 2019

महाराष्ट्र देशा!

जेव्हा कधी महाराष्ट्राबद्दल थोडेफार माहित असलेल्या अमराठी माणसाला सांगितले कि मी महाराष्ट्रातून आहोत, तेव्हा पटकन त्याच्या डोक्यात विचार येतो 'शिवरायांचा महाराष्ट्र'! याबरोबरच आज महाराष्ट्रात मुख्यत्वे हिंदू, बौद्ध, जैन, इस्लाम या धर्माचा वारसा घेत वाहणाऱ्या मराठी संस्कृतींचा ठसा आहे. महाराष्ट्र म्हंटलं कि संतांची भूमी,  शेतकऱ्यांची-वारकऱ्यांची भूमी, खेड्यांची भूमी, चळवळीची भूमी... महाराष्ट्र म्हंटलं कि मुंबई, पुणे... उद्योगांची भूमी...! महाराष्ट्र म्हंटलं कि खेळांची भूमी कब्बडी, कुस्ती, खो-खो!!  महाराष्ट्र म्हंटलं कि शिवराय, शाहू, फुले आंबेडकरांची भूमी! पुरोगामी इतिहासाची भूमी! संयुक्त महाराष्ट्राचे शिल्पकार असलेल्या आचार्य अत्रे यांनी 'माझ्या महाराष्ट्राला इतिहास आहे, बाकीच्या राज्यांना फक्त भूगोल आहे', असे उद्गार काढले होते. 

पर्यटनाच्या बाबतीत महाराष्ट्र अग्रेसर आहेच, महाराष्ट्रात अनेक उद्योग येत आहेत त्यामुळे मराठी माणसाचे उद्योगातही योगदान वाढत आहे. देशाला एकूण उत्पन्नापैकी २० ते २२ टक्के उत्पन्न केवळ महाराष्ट्र देतो.  आता आपण थोडं महाराष्ट्राबद्दलच्या कमी चर्चेत असणाऱ्या गोष्टींवर बोलूयात. देशाला जसे देश स्वतंत्र होताच राष्ट्रीय प्राणी, पक्षी, गीत, फुल या गोष्टी ठरवल्या जातात तशा या गोष्टी राज्यासाठीही लागू होतात, हे आपल्यापैकी खूप कमी जणांना माहिती असेल. 

राज्य गीत- जय जय महाराष्ट्र माझा
राज्य नृत्य-    लावणी
राज्य प्राणी    - शेकरु  ( मोठी खार: भीमाशंकरच्या जंगलात आढळते.)
राज्य पक्षी- हरियाल
राज्य फुल- ताम्हण (हिरव्या रंगाचा कबुतरासारखा दिसणारा पक्षी )
राज्य वनस्पती- आंबा
राज्य खेळ- कबड्डी
राज्य भाषा - मराठी
ताम्हण (हिरव्या रंगाचा कबुतरासारखा दिसणारा पक्षी )
       शेकरु  ( मोठी खार: भीमाशंकरच्या जंगलात आढळते.)
महाराष्ट्राबद्दलची आणखी काही माहिती-

सुमद्रकिनारा – ७२० किमी
नगरपालिका – २३०
महानगरपालिका – २६
शहरी भाग – ४०%
ग्रामीण भाग – ६०%
लोकसंख्येच्या बाबतीत २ रा क्रमांक
क्षेत्रफळात ३ रा क्रमांक
संपुर्ण साक्षर पहिला जिल्हा – सिंधुदुर्ग
सर्वात कमी साक्षर जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक लोकसंख्या – मुंबई उपनगर
महाराष्ट्रातील सर्वात कमी लोकसंख्या जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील सर्वाधिक जंगले असलेला जिल्हा – गडचिरोली
महाराष्ट्रातील कमी जंगल असेलला जिल्हा – बीड
महाराष्ट्रातील सर्वाधिक आदिवासी असलेला जिल्हा – नंदूरबार
महाराष्ट्रातील अधिक तलावांचा जिल्हा – गोंदिया
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात मोठा जिल्हा – अहमदनगर
महाराष्ट्रातील क्षेत्रफळाने सर्वात लहान जिल्हा – मुंबई शहर
महाराष्ट्रातील उंच शिखर – कळसूबाई (१६४६ मी) कल्याण जवळ
महाराष्ट्रातील सर्वात लांब नदी – गोदावरी
महाराष्ट्रातील सर्वात लहान राष्ट्रीय महामार्ग – न्हावाशेवा पळस्पे २७ किमी
पहिले मातीचे धरण – गंगापूर, गोदावरी नदीवर
महाराष्ट्रात सर्वात जास्त समुद्र किनारा असलेले शहर – मुंबई
जगातील पहिले जैव तंत्रज्ञान विद्यापीठ – नागपूर
भारतातील सर्वात मोठे नैसर्गिक बंदर मुंबई

गुढी पाडवा, होळी, हरतालिका, गणेश चतुर्थी, दिवाळी, मकर संक्रांत हे महाराष्ट्राचे खास सण आहेत. या सणांसाठी खालील विशेष पदार्थ करतात:

गुढी पाडवा: कडूलिंब व गूळ व वाटली डाळ व मोड आलेल्या हरभर्यारची उसळ
होळी: पुरणपोळी
गणेश चतुर्थी: उकडीचे मोदक
दिवाळी: करंजी, चकली, शंकरपाळे, अनारसा
मकर संक्रांत : तिळगूळ, तीळवडी, पांढरा शुभ्र काटेरी हलवा.

महाराष्ट्राबद्दल आश्चर्यकारक वैशिष्ठ्ये

१. जगातील सर्वात मोठा कांदा बाजार महाराष्ट्रातील नाशिक जिल्ह्यामध्ये आहे आणि जवळजवळ प्रत्येक वर्षी जगभरातील अर्ध्या कांद्याचे उत्पादन एकटा नाशिक जिल्हा करतो.
२. महाराष्ट्रातील बुलढाणा जिल्ह्यातील लोणार लेक हे उल्का जमिनीवर पडल्यामुळे निर्माण झालेले खाऱ्या पाण्याचे भारतातील एकमेव तलाव आहे.
३. महाराष्ट्र हे भारतातील सर्वात मोठे सुसंस्कृत राज्य आहे, जिथे ५० % लोक केवळ शहरात राहतात आणि त्यापैकी ३०% मुंबई आणि पुणे या शहरात राहतात.
४. भारतातील सगळ्यात जास्त पाण्याचे धरण हे महाराष्ट्रा मध्ये आहेत पण दुखद गोष्ट अशी कि बहुतेक धरण हे कोरडे पडलेले आहेत.
५. भारतातील सगळ्यात जास्त किल्ले हे महाराष्ट्रामध्येच आहेत, ज्यासाठी आम्ही शिवाजी महाराजांचे आभारी आहोत कारण त्यांनी ३०० हून अधिक किल्ले महाराष्ट्रात बांधले आहेत.
६. मुंबईमध्ये दररोज  बसने आणि रेल्वेने ७५ लाख लोक प्रवास करतात म्हणजे जवळजवळ स्विट्झर्लँड देशाची जेवढी लोकसंख्या आहे तितके लोक रोज प्रवास करतात.
७. महाराष्ट्राला हिंदी चित्रपटांचा केंद्र म्हणतात. बहुतेक चित्रपट तारे मुंबई मध्येच राहतात.
८. शिवाजी महाराजांनीच महाराष्ट्रातील पहिल्या नेव्ही पथकाची सुरवात केली होती.
९. भारतात सगळ्यात पहिला चित्रपट नाशिक जिल्ह्यातील दादासाहेब फाळके यांनी बनविला होता.
१०. पुणे शहरातील पिंपरी-चिंचवड महानगरपालिका ही आशिया खंडातील सर्वात श्रीमंत महानगरपालिका आहे.
११. महाराष्ट्रातील नवापुर रेल्वे स्थानक अर्धा गुजरातमध्ये आहे आणि अर्धा महाराष्ट्रात आहे.
१२. महाराष्ट्रची सीमा भूतान, स्लोव्हेनिया, स्लोव्हाकिया, मंगोलिया, पनामा, कुवेत, आयर्लंड, ओमान, फिजी, लक्झेंबर्ग अशा अनेक देशांपेक्षा मोठी आहे.
१३. आशियातील सगळ्यात पहिली रेल्वे महाराष्ट्रमध्ये धावली होती, ही रेल्वे १६ एप्रिल १८५३  रोजी मुंबई आणि ठाणे दरम्यान धावली गेली होती.
१४. भारतातील सर्वात मोठे औद्योगिक उत्पादन महाराष्ट्रात आहे, भारतातील एकूण औद्योगिक उत्पादनापैकी २५% एकट्या महाराष्ट्रात होते.
१५. मुंबईमध्ये शेकडो मोठ्या कंपन्या आहेत, जे महाराष्ट्रातील सर्वात मोठे शहर आणि जगातील पाचव्या क्रमांकाचे मोठे शहर आहे.

Published in Dainik Pandhari Bhushan, Solapur. on the occasion of Maharashtra Day. 
(1 May 2019)

Saturday, April 13, 2019

कॉम्प्युटर व्हायरस आणि घातक सॉफ्टवेअर्स..

व्हायरस हा शब्द वैद्यकीय क्षेत्रातून संगणक क्षेत्रात आला आहे. व्हायरस म्हणजे विषाणू. अर्थात व्हायरस हा शब्द आजारापुरता मर्यादित राहिलेला नाही. मग हा व्हायरस मोबाईल किंवा संगणकाला लागतो म्हणजे नेमकं काय होतं ? बऱ्याचवेळा असाही प्रश्न आपल्याला पडतो. एखाद्या मोबाईलला किंवा कॉम्पुटरला किंवा किंवा कॉम्प्युटर नेटवर्कला हानी पोहचवणाऱ्या प्रोग्रामला किंवा सॉफ्टवेअरला व्हायरस म्हणतात. व्हायरस बनवण्याचे काम मूळतः हॅकर्स करत असतात. ज्या उपकरणांमधून मोबाईल, कॉम्पुटरमधल्या माहितीची देवाणघेवाण होते अशा उपकरणामधून व्हायरस आपल्या मोबाईल, कॉम्पुटरमध्ये उतरतात, सध्या व्हायरस इंटरनेटवरूनच लोकांच्या कॉम्पुटरमध्ये प्रवेश करतात. आपली यंत्रणा बंद पाडणे, आपली वित्तीय माहिती, इतर खाजगी माहिती चोरणे हे त्यांचे मुख्य काम असते.


कॉम्प्युटर क्षेत्रात व्हायरसची सुरुवात १९७० च्या आसपास झाल्याचं मानलं जातं. त्यावेळी  क्रिपर या नावाचा व्हायरस होऊन गेला . त्यानंतर १९८२ साली एल्क क्लोनर रिचर्ड क्रेंटा या तज्ज्ञाने ऍप्पल या कंपनीच्या कॉम्पुटरसाठी लिहिला. १९८३ साली अशा प्रकारची हानी पोहचवणाऱ्या प्रोग्रॅमला फेडरिक कोहनीन या प्रॉग्रॅमरने व्हायरस हे नाव दिले. टेनेक्स ऑपरेटिंग सिस्टमला बंद पडायचा. त्यांनंतर काही दिवसातच रॉथर जे नावाचा एक बलाढ्य व्हायरस


व्हायरसचे काही प्रकार

१)  वर्म  (Worm)
या मालवेअरचा प्रकार म्हणून ओळखला जातो.  कॉम्प्युटर वर्म एक स्टँडअलोन मालवेअर कॉम्प्युटर प्रोग्राम आहे जो इतर कॉम्प्युटरमध्ये पसरण्यासाठी स्वत: ची पुनरावृत्ती करतो. बऱ्याचदा, ते स्वत: चा प्रसार करण्यासाठी कॉम्प्युटरचे नेटवर्क वापरतात, अर्थात त्यात प्रवेश करण्यासाठी लक्ष्यकेंद्रित कॉम्प्युटरवर सुरक्षितता अयशस्वीतेवर अवलंबून असतात. याचा जास्तकरून परिणाम कॉम्प्युटर चालू करतेवेळी (OS booting) जाणवतो.

 २) ट्रॉजन हॉर्स ( Trojan Horse)
हा एक धोकादायक सॉफ्टवेअर आहे जो हॅकर्सद्वारे बनवले जाते ज्यामुळे कायदेशीर सॉफ्टवेअरसारखेच कॉम्पुटर वापरकर्त्यांच्या सिस्टममध्ये प्रवेश मिळविण्यास भाग पाडतात.  ट्रॉजन हॉर्स हा फसव्या सॉफ्टवेअरचा प्रकार असून आपल्या कॉम्प्युटरवरील माहिती चोरण्याचा हॅकरचा या मागचा हेतू असतो. कॉम्पुटर वापरकर्त्यांना विशेषत: काही आकर्षक सोशल मीडियाद्वारे फसविले जाते किंबहुना जे नंतर दुर्भावनापूर्ण काही वेबसाइटवरूनही डाऊनलोड होतात ज्यामुळे ट्रोजन त्यांच्या सिस्टमवर लोड होऊन आणि ते स्वतःला आपोआप अंमलात आणतात आणि त्यामुळे सिस्टीमला धोका होतो.


३) बॅकडोअर (Backdoor )
हा एक मालवेअरचा प्रकार आहे. हा दुरून एखाद्या सर्वरचा, कॉम्प्युटरचा ताबा मिळण्यासाठीचा  हॅकरचा उद्देश असतो. अर्थात हॅकर ह्याचा उपयोग युझर आयडी, पासवर्ड चोरण्यासाठी करतात. हा  व्हायरस ओळखणे सहसा कठीण काम असते.

 ४) स्पायवेअर (Spyware)
हा एक घातक सॉफ्टवेअरचा प्रकार आहे. हे सॉफ्टवेअर न कळत आपल्या कॉम्प्युटरमध्ये प्रवेश करते आणि आपण करत असलेल्या सर्व क्रियावर ते लक्ष्य ठेवूंन हॅकरला माहिती पुरवते.

 ५) रुटकीट  (Rootkit )
रूटकिटला कॉम्प्युटरच्या आत लपविलेल्या दुर्भावनायुक्त संगणक सॉफ्टवेअरच्या रूपात परिभाषित केले जाते आणि मुख्यतः  पासवर्ड चोरण्यासाठी ते कार्यक्षमही राहते. हाच या घातक सॉफ्टवेअरचा मुख्य उद्देश असतो.

६) एक्सप्लॉईट (Exploite)
हेही एक माहिती चोरण्यासाठी बनवण्यात आलेले एक फसवे सॉफ्टवेअर आहे.

 ७) की लॉकर (Key Locker)
हा व्हायरस असून आपण दाबत असलेल्या प्रत्येक बटणाची नोंद  हॅकरकडे पाठवण्यासाठी हॅकरकडून  याचा उपयोग होतो

८ ) डायलर (Dialer )
हा मोबाईलमध्ये आढळतो, फसवे कॉल करून आर्थिक व्यवहार करण्यासाठी पाठवण्यासाठी हॅकरकडून  याचा उपयोग होतो.

९ ) हायजॅकर (Hijacker)
ब्राउझरवरून कोणतेही काम करता येवू नये म्हणून याचा वापर केला जातो.

अर्थात आपली माहिती सुरक्षित राहावी म्हणून सर्व कॉम्प्युटर आणि मोबाईलधारकांनी  स्वतःकडे व्हायरस वापराने गरजेचे आहे.

Monday, April 8, 2019

एथिकल हॅकिंग म्हणजे काय ?

बदलत्या दिवासंबरोबर नवनवीन तंत्रज्ञान समोर येत आहे आणि ते तंत्रज्ञान सुरक्षित हाताळणे आज गरजेचे आहे. हॅकिंग हा शब्द आपण खूप वेळा ऐकला असेल. कुणाचंतरी ईमेल खातं, फेसबूक खातं, बँक खातं हॅक झालेलंही ऐकलं असेल. सॉफ्टवेअर क्षेत्रातल्या अलीकडच्या काही तरुणांना हॅकिंगचे कोर्सेस करण्याची भुरळ पडलेली आहे. अर्थात त्यांना एथिकल हॅकर म्हणून आपले करिअर घडवायचे असते. हॅकिंग जर गुन्हा असेल, तर मग एथिकल हॅकिंग का नाही? आपल्याला असा प्रश्न पडणे साहजिक आहे. अलीकडच्या काळामध्ये इंटरनेट, संगणक आणि मोबाईल वापराचे प्रमाण वाढले असल्याने आपणास एथिकल हॅकिंगबद्दलची माहिती असणे गरजेचे आहे.

खरं तर, एखादा व्यक्ती इंटरनेटवरील एखादं खातं हॅक करतो म्हणजे गुन्हा करतो का ? काही प्रमाणात याचं उत्तर होकारार्थी आहे. परंतु, हॅकर कोणत्या कारणासाठी किंवा कोणत्या परिस्थितीत हे काम करत आहे, यावरून तो गुन्हेगार ठरतो. अशा प्रकारचं कृत्य करण्यासाठी हॅकरची भावना काय असते. जर हॅकरने एखाद्या बँकेची वेबसाईट हॅक करून एखाद्याची खाजगी माहिती चोरणे, त्यांच्या खात्यातील पैसे काढून घेणे, क्रेडिट कार्डचे तपशील चोरणे, इमेल, फेसबुक, ट्वीटर खाती हॅक करून बदनामीकारक मेसेज पाठवणे, अशा सर्व प्रकारच्या हॅकिंगकडे गुन्ह्याच्या दृष्टीने पाहिले जाते. हॅकिंगमध्ये जर असे वाईट प्रकार मोडत असतील तर हॅकिंगमुळे कोणाचं भलं कसं होऊ शकतं ? असाही प्रश्न पुढे उभा राहतो. अर्थात असे प्रकार थांबवण्यासाठी, आपली सर्व माहिती सुरक्षित ठेवण्यासाठी अशा प्रकारचे हल्ले होऊच नये आणि ते झाले, तर त्या हल्ल्यामधून सावरण्यासाठी म्हणून योग्य उपाय योजना करता येतात यालाच 'एथिकल हॅकिंग' म्हणतात, अर्थात ही एक नैतिक प्रक्रिया आहे. सुरक्षितता भेद्यता शोधण्यासाठी किंवा त्या निराकरण करण्याच्या हेतूने नेटवर्क आणि संगणकामध्ये, इंटरनेट खात्यामध्ये प्रवेश करण्यासाठी संस्थाद्वारे नैतिक हॅकर्स नियुक्त केले जातात. अर्थात  'एथिकल हॅकिंग'  हा एक कायदा म्हणूनही पुढे आला आहे. 

समजा, एखाद्या बँकेचं सॉफ्टवेअर ग्राहकांसाठी इंटरनेटवर खुलं करण्यासाठी, सॉफ्टवेअरला बऱ्याच चाचण्या पार पाडणे गरजेचं असतं. बँक या तपासण्यांचे काम एथिकल हॅकर्सला देत असते. अर्थात, बँक आपलेच सॉफ्टवेअर हॅक होत नाही ना? याची पडताळणी करत असते.  त्यातूनच आपले सॉफ्टवेअर इंटरनेटवरून सर्वांना उपलब्ध करून देण्यापूर्वीच बँक त्यामधले धोके काढून टाकण्यासाठीच्या आणि माहिती सुरक्षित राहील याची खात्री बाळगण्यासाठीच्या अनेक उपाययोजना करू शकते. एथिकल हॅकर्स हे गुन्हेगार पकडण्याच्या कामात मोलाचे काम करतात. सरकारी आणि खाजगी कंपन्यांकडे असे अनेक एथिकल हॅकर्स कार्यरत असतात. इंटरनेटवरून ग्राहकांची फसवणूक होऊ नये, सरकारची बदनामी होऊ नये, इंटरनेटवरील सरकारी किंवा कंपन्यांच्या माहितीवर सायबर हल्ले होऊ नयेत यासाठीची पूर्वतयारी एथिकल हॅकर करत असतो.  इंटरनेटवरून माहिती चोरणारा किंवा गुन्हा करणारा हॅकर पकडण्यासाठीचे काम देखील एथिकल हॅकर्स करत असतात. 

एथिकल हॅकिंग क्षेत्रातला आणखी एक महत्वाचा मुद्दा म्हणजे एथिकल हॅकर्सला हॅकिंगकेंद्रित खाजगी स्वरूपाच्या गोष्टींमध्ये किंवा त्यातील महत्वाच्या बाबींबद्दल माहिती असणे गरजेचे असते, जसे की, बँकिंगची माहिती, काहीप्रमाणात गुन्हेगाराची माहिती, इ. कायदेशीर हॅकिंग करत असताना चुकूनही आपल्या हातून गुन्ह्याअंतर्गत नोंदला जाणारा प्रकार घडू नये याचीही काळजी एथिकल हॅकर्सला घेणे गरजेचे असते अर्थातच एथिकल हॅकिंग हा विषय सायबर सिक्युरिटीअंतर्गत येतो.

अर्थात डिजिटल इंडिया साकारत असताना सर्व सरकारी उपाययोजनांचे काम इंटरनेटवरून उपलब्ध करण्यासाठी सरकार कार्यरत आहे. म्हणूनच भविष्यात एथिकल हॅकर्सची मागणी आणखी वाढणार आहे. ज्यांना या विषयामध्ये करिअर घडवायचे आहे, त्यांनी आधी कॉम्पुटर नेटवर्क, सॉफ्टवेअर प्रोग्रामिंगमध्ये कौशल्यधारक असणे गरजेचे आहे. ज्या लोकांना अशा प्रकारची आव्हानं आवडतात आणि वेगवेगळी सॉफ्टवेअर टूल्स वापरून, शक्कल लढवून, कल्पना करून सायबर गुन्हे उघडकीस आणण्याचे किंवा गुन्हे घडू नये यासाठीचे असे तंत्र जमेल असे वाटते त्यांना एथिकल हॅकिंगसारखे क्षेत्र निवडायला हरकत नाही. यासाठी CEH (Certified Ethical Hacker) नावाचा कोर्स आहे.  या क्षेत्रात पदवीधारक होण्यासाठी याचे कोर्सेस इंटरनेटवर उपलब्ध आहेत.  याचे शुल्क ऑनलाईनच भरावे लागते. CEH पदवी धारकांना  बहुराष्ट्रीय कंपन्यामध्ये तसेच सरकारी क्षेत्रात नोकरीच्या अनेक संधी आहेत. सरकारी नोकरीत आणि खाजगी कंपनीत त्यासाठी चांगले वार्षिक पॅकेजही आहे.

Friday, April 5, 2019

काय आहे 'ऑगमेंटेड रिऍलिटी' ?

आपल्याला भास होतो म्हणजे नेमके काय होते, तर एखादी गोष्ट नसूनही वास्तवात असल्यासारखी वाटती, याच कल्पनेला तंत्रज्ञानापासून साध्य करणे म्हणजे 'ऑगमेंटेड रिऍलिटी' अर्थात 'वाढीव वास्तविकता'. आभासी वास्तविकतेचे पुढचे रूप. वाढीव वास्तविकता वास्तविकजगाच्या वातावरणाचा परस्पर संवादाचा अनुभव आहे , जेथे वास्तविक जगात असणाऱ्या वस्तू संगणकीय व्युत्पन्न माहितीद्वारे "संवर्धित" असतात. कधीकधी अनेक संवेदनात्मक पद्धतींमध्ये दृश्य, आवाज, स्पर्श, संवेदनता यामुळे अधिक वास्तववादी वाटतात.

आच्छादित संवेदनात्मक माहिती रचनात्मक (उदा. नैसर्गिक वातावरणात जोडणी) किंवा विनाशकारी असू शकते आणि भौतिक जगाशी निर्बाधपणे जोडलेली असू शकते जसे की यास आज वास्तविक वातावरणाचा एक मोहक दृष्टीकोन मानला जातो. एक प्रकारचा गॉगल घातल्यानंतर खर्‍या घरामध्ये अचानक खोटे जंगल दिसू लागतं, जंगलात प्राणी असल्याचं भासू लागत आणि आपण त्याच्यात रमू लागतो किंवा एखाद्या खऱ्या रस्त्यावर गेलो आणि तिथून त्या गॉगलमधून पाहिल्यावर तिथं खोट्या गाड्या धावताना दिसतात म्हणजेच ऑगमेंटेड रिअ‍ॅलिटी.

प्रगत ए. आर. तंत्रज्ञानाच्या मदतीने वापरकर्त्याच्या आसपासच्या वास्तविक जगाची माहिती परस्परसंवादी आणि डिजिटलरित्या हाताळण्यायोग्य बनवणे हे केवळ मनोरंजनासाठीचे उद्दिष्ठ होते. १९९२च्या सुरुवातीच्या काळात अमेरिकेत वायुसेनाच्या आर्मस्ट्रांग प्रयोगशाळेत विकसित 'व्हर्च्युअल फिक्स्चर सिस्टम' (आभासी गुणधर्मीय यंत्रणा)च्या अनुषंगाने संशोधन झाले. प्रथम १९९० साली ही संकल्पना मांडली गेली.

आज आपण अशी अनेक उदाहरणे पाहू शकतो जसे की AR सिनेमा, AR गेम. २०१६ मध्ये पोकेमॉन गो या गेम खूप धुमाकूळ घातला. ऑप्टिकल प्रोजेक्शन सिस्टम, मॉनिटर्स, आधुनिक कॅमेरे , इतर वास्तविकतेची भर घालणारी इतर उपकरणे आणि मानवी शरीरावर असलेल्या दृश्य यंत्रणेसह, वाढीव वास्तविकता प्रस्तुतीकरता विविध तंत्रज्ञानांचा वापर केला जातो. वाढीव वास्तविकतेचा प्राथमिक मूल्य हा आहे, की डिजिटल जगाच्या घटकांना वास्तविक जगाच्या एखाद्या व्यक्तीच्या संकल्पनेत आणणे  आणि डेटाचे साधे प्रदर्शन करणे. अर्थात हे तंत्रज्ञान आता मोबाईल फोनही वापरून शक्य होत आहे.

करिअर म्हणूनसुद्धा हा एक नवा पर्याय पुढं आला आहे. ऍनिमेशनच्या कोर्सेसप्रमाणेच यामध्ये अनेक पर्याय आहेत. थ्री-डी प्रोफेशनल, ऑगमेंटेड रिऍलिटी डेव्हलपर, युनिटी डेव्हलपर, टेक्निकल आर्किटेक्ट ए. आर. , ए. आर. डिझाईनर अशा जागांसाठी अनेक बहुराष्ट्रीय कंपन्यांसाठी नोकऱ्या उपलब्ध आहेत. याचे ट्रेनींग ऍनिमेशन उपलब्ध असणाऱ्या अनेक खाजगी इनस्टीट्युटमध्ये तसेच ऑनलाईनसुद्धा उपलब्ध आहे. अनेक मोठ्या कंपन्यांमध्ये ऑगमेंटेड रिऍलिटीच्या कौशल्यधारकांना चांगले पॅकेज मिळते. 

Monday, April 1, 2019

भारतीय ई-व्यापारातील शोकांतिका!

ई-व्यापार आणि त्याशी संलग्न असलेल्या व्यवसायांतील इतर कंपंन्यापैकी अ‍ॅमॅझॉन ही अमेरिकेमधील अवाढव्य कंपनी. जवळपास युरोप, आशिया, अमेरिकेतील सर्वच देशांत या कंपनीचे जाळे पसरले असुन स्थापनेपासुन केवळ २३ वर्षांत या कंपनीने केलेला प्रवास अद्भुतच म्हणावा लागेल. आज जी ऑनलाईन शॉपिंगमधली क्रांती दिसत आहे ती केवळ अशा इ-व्यापारामध्ये काम करणाऱ्या या कंपन्यांमुळेच! फ्लिपकार्ट, स्नॅपडील यापेक्षाही अमेझॉनकडे बघण्याचा लोकांचा दृष्टिकोन हा सकारात्मक आहे. पूर्वी लोक ऑनलाईन शॉपिंग करायायला कमालीचे घाबरत होते, किंबहुना ते आजही घाबरतात. भारतातील या भीतीचे  प्रमाण अमेझॉनने कमी केले असे म्हणतात येईल. लोक विश्वास ठेवतील अशी सेवा अमेझॉन पुरवत आली आहे. फ्लिपकार्ट, स्नॅपडील या ई-व्यापारातील भारतीय कंपन्या आहेत. याही खूप कमी वेळेत वाढल्या.  इ-व्यापारामध्ये काम करणारी अलीबाबा ही एक चीनची कम्पनी आहे. जगभरात याही कपंनीचं अमेझॉनपेक्षा जास्त जाळं पसरलं आहे.  खरं तर,  भारतातील इ-व्यापाराचा प्रवास म्हणजे खूप कठीण अडथळ्यांची शर्यत ठरला आहे. भारत हा लोकसंख्येत दुस-या क्रमांकाचा असूनही भारतातील ई-व्यापार चीनच्या तुलनेत अगदी नगण्य असाच म्हणावा लागेल.

जागतीक पातळीवर पाहिले असता अमेझॉन आणि अलीबाबात जागतिक बाजारपेठा काबीज करायची एक प्रकारची स्पर्धा लागलेली आपल्याला दिसेल. ई-व्यापाराबाबत भारतातील चित्र अगदीच केविलवाणं आहे. भारतात ई-व्यापार करणाऱ्या अवाढव्य कंपन्या उभ्या राहिल्या नाहीत, ही भारतीय व्यवसायिंकाची शोकांतिका आहे. काही दिवसापूर्वीच (४ मे २०१८ रोजी ) फिल्पकार्ट ही भारतीय कपंनी अमेरिकेच्या 'वॉलमार्ट' या कपंनीने विकत घेतली. वॉलमार्ट ही सुपर मार्केट अर्थात ई-व्यापारातील जगातील सर्वात मोठी कंपनी आहे. १९६२ साली स्थापन झालेली ही कंपनी खाद्यपदार्थ, कपडे, प्रसाधने इत्यादी अनेक प्रकारची ग्राहकोपयोगी उत्पादने इंटरनेटसारख्या मध्यमामधून विकते. ही कंपनी कंपनीदेखील अमेरिकेमधूनच चालते. आज भारतासारख्या मोठ्या बाजारपेठेकडे जगभरच्या कंपन्यांचे लक्ष आहे. भारत आजही व्यवसाय वाढण्यासाठी उपयुक्त नसलेले विकट कायदे, पायाभुत सुविधांचा अभाव, कायदेशीर अडचणी आणि पाहिजे तेवढी ई-साक्षरता नसल्याने किंवा भारताचा इ-व्यापारावर तितकासा विश्वास बसलेला नसल्याने या अत्याधुनिक क्षेत्रात जेवढी प्रगती करायला हवी होती तेवढी प्रगती भारताला साधता आलेली नाही. आजही ऑनलाईन शॉपिंगवर इ-साक्षर नसलेल्या लोकांचा पाहिजे तेवढा विश्वास दिसत नाही. खरे तर, ई-व्यापाराला बळ देणा-या 'कॅश ऑन डिलिव्हरी' पद्धतीला बेकायदेशीर ठरवण्यात येत असल्याने ई-व्यापारच संकटात सापडेल की काय अशी शक्यता निर्माण झाली आहे. चीनसारख्या साम्यवादी देशात मात्र धाडस आणि कल्पकतेच्या जीवावर अलीबाबासारखी बहुराष्ट्रीय कंपनी निर्माण होऊ शकते, अर्थात, ई -व्यापारात भारत चीनच्या आसपाससुद्धा नाही.  ई-व्यापाराबद्दलचे  असे भारतात का नाही यावर आपण विचार केला पाहिजे.

अलीबाबा या कंपनीचे संस्थापक असणाऱ्या 'जॅक मा' या अवलियाने सर्वप्रथम काही मित्रांकडून पैसे घेऊन ई-व्यापारातील व्यवसायाला सुरुवात केली. प्रोग्रामिंगचे अजिबात ज्ञान नसताना, व्यवसायाचा आणि विक्रीचा काहीही अनुभव पाठीशी नसतांना आणि मुख्य म्हणजे इंटरनेट वापरणारा पुरेसा ग्राहकवर्ग नसतानाही जॅकने अलिबाबा ही ई-कॉमर्स कंपनी सुरु केली. ऑनलाईन खरेदी करणे हे सोयीचे आणि सुरक्षीत आहे हे ग्राहकाना पटवून देण्यात अलिबाबाने बराच वेळ खर्ची घातला. पण हळूहळू जॅकला यश येऊ लागले. पुढे जसजसा इंटरनेटचा प्रसार वाढत गेला तसा अलिबाबाचा पसारा देखील वाढत गेला आणि बघता बघता अलिबाबा डॉट कॉम ही चीनमधील सर्वात मोठी ई-कॉमर्स कंपनी बनली.

अलिबाबाचा पसारा केवळ चीन पुरताच मर्यादित न ठेवता जॅकने जगात इतर देशातही पाय रोवायला सुरुवात केली. ईतकी की आता जगभरात सर्वाधिक विक्री असणाऱ्या कंपन्यांमध्ये अलिबाबा दुसऱ्या क्रमांकावर आहे. अगदी एक-दोन वर्षापूर्वीच पेटीएम, स्नैपडील सारक्या कंपन्यांच्या मार्फत भागीदारी प्रवेश केला असला तरी धोरणात्मक दृष्ट्या सर्वशक्तीनिशी अलीबाबा हीसुद्धा कंपनी भारतात उतरलेली नव्हती. काही ई-व्यापार कंपन्यांत अलीबाबाने आर्थिक गुंतवणुकी करण्याचे काम मात्र सुरु केले होते. ही गुंतवणुक आतापर्यंत १२८०० कोटी रुपयांपेक्षा जास्त आहे . किंबहुना अमेरिका विरुद्ध चीन हे ई-व्यापाराचे युद्ध भारतीय भूमीवर लढले जात आहे असे म्हणायला हरकत नाही. आता अलीबाबा 'क्लाउड काम्पुटिंग'बरोबर 'आर्टिफिशिअल इंटीलिजन्स'मध्येही उतरली आहे. इतर चिनी कंपंन्यासह 'याहू'सारखी बलाढ्य कंपनीसुद्धा आपला पैसा अलीबाबामध्ये गुंतवत आहे

पुस्तकांची आवड असणारा अमेझॉनचा संस्थापक 'जेफ बेझॉस' या अवलियालामध्ये पुस्तकांसाठीच काहीतरी
नावीन्यपूर्ण करण्याची भूक होती.  त्यानं इंटनेटवर पुस्तकांची विक्री चालू केली.  त्यानं सुरू केलेल्या ‘अ‍ॅमॅझॉन डॉट कॉम’ या वेब साईटनं सुरुवातीला पुस्तकांचं वितरण, पुस्तकांची खरेदी या गोष्टींच्या संदर्भात कमी काळात प्रचंड धुमाकूळ घातला. आज अमेझॉन कपंनीचा ई-व्यापारातील वाढलेला जोर आपण पाहत आहोत.  ई-व्यापाराबरोबरच या कंपनीने सॉफ्टवेअर निर्मितीचे अनेक तंत्रज्ञान पुढे आणले आहे.  

सध्या भारताची ई-व्यापार मार्केट ३५ बिलियन अमेरिकेन डॉलर इतकी आहे आणि भारताची आर्थिक व्यवस्था व जिडीपी दर पाहता, येत्या काही वर्षात अनेकपटीनी वाढणार आहे.यात आपला व्यवसाय वाढण्यासाठी अनेक कंपंन्या पुढे सरसावणार हे निश्चित आहे. यात अनेक छोटे छोटे उद्योगही पुढे येतील हेही नक्की आहे, ई-साक्षरतेच्या वाढीबरोबर फ्लिपकार्ट, स्नॅपडील अशा भारतीय  कंपन्या विकल्या जाऊ नये अशी सरकारी धोरणेही पुढे यायला हवी. तेव्हाच कुठे जागतिक ई-व्यापारात डिजिटल भारताची ओळख बनेल.

Published in Dainik Surajya, Solapur.
15 Apr 19.