Search in Google

Tuesday, February 22, 2022

हेच खरे जगज्जेते !


 खाशाबा जाधवने भारताला पहिले ऑलंपिक पदक मिळवून दिले. तसेच भारतीय हॉकी संघाने १९६० -७० दशकात जी कामगिरी केली होती ती विलक्षण आहे. तेव्हापासून भारतामध्ये तसे खेळाडू घडवण्याची परंपरा आजपर्यंत चालू आहे. भारतीय खेळाडूंच्या जिद्दी आणि मेहनिती आप-बीतीची कहाणी म्हणजे "हेच खरे जगज्जेते." एखाद्या प्रेरणादायी व्यक्तीचं चरित्र लिहिण्यासाठी त्याबद्दल खूप अभ्यास असावा लागतो तसेच त्यांचे सवांद टिपणे, त्यांनी जीवनातील स्वप्न पूर्ण करण्यासाठी केलेली धडपड या सर्व गोष्टींची पार्श्वभमी, या सर्व गोष्टी अतिशय बारकाईने टीपाव्या लागतात. ही कलाकृती घडवताना लेखक विनोद पंचभाई यांनी हे शिवधनुष्य सर्वतोपरी पेललेलं आहे आपल्याला पुस्तकाच्या पानापानावर जाणवतं. अशी पुस्तकं, सिनेमे येणं इथल्या समाजाची, परिस्थितीची, व्यवस्थेची अतिशय गरज आहे. आपल्या मातीतल्या खेळाकडे आजवर दुर्लक्ष करणाऱ्यांनी ही भूमिका एकदा मुळातून समजून घ्यावी म्हणून विनोद पंचभाई यांच लेखनसामर्थ्य इथं महत्वाचं ठरत आहे. 

हालाकीच्या परिस्थितीत अनेक खेळाडूंनी केलेली मेहनत, शिक्षण सावरत आपल्या घरची आर्थिक स्थिती सांभाळत आई-बापांनी दिलेला आधार असे खेळाडूंच्या जीवनातील अनेक प्रसंग वाचताना अंगावर शहारे नक्कीच येतात. दररोज दोन किलोमीटर अंतराहून जळाऊ लाकडाची मोळी डोक्यावर उचलून आणणारी मीराबाई चानू हे इथल्या व्यवस्थेचं प्रतिक आहे. मोळी आणण्यास पैसे जमवण्यासाठी मीराबाई चानूची जिद्द आणि आत्मविश्वास पाहून आईनेच तिला पदक ऑलंपिक पदक मिळवण्यास प्रोत्साहित केलं. "तू तर मुलांपेक्षाही जास्त वजन उचलतेस, तू तर सोन्याचे मेडलसुद्धा जिंकू शकतेस... मग बैलगाडी विकत घेणे अवघड नाही. " एका ग्रामस्ताच्या या वाक्याने तिच्या अशा पल्लवित झाल्या. जिगरबाज मीराबाई चानू वाचताना अमेरीकेच्या राष्ट्राध्याक्षांबरोबर जेवण करताना आपला भात खाताना तिने दिलेलं उत्तर वाचताना डोळे निश्चितच पाणावतात. या सर्व प्रसंगावरून तिने जपलेली आपली संस्कृती अनुभवताना मीराबाईची वेगळीच उंची जाणवते. 


पी. व्ही. सिंधू वाचताना पंचभाई तिच्या यशाच्या बातमीचे दाखले देत अनेक प्रसंगाचा अचूक वेध घेतला आहे. पी. व्ही. सिंधूने वयाच्या आठव्या वर्षापासून बॅडमिंटन खेळायला सुरुवात केली. सिकंदराबाद येथील इंडियन रेल्वे इन्स्टिट्यूट ऑफ सिग्नल इंजिनीअरिंग अँड टेलिकम्युनिकेशन्सच्या बॅडमिंटन कोर्टमध्ये मेहबूब अली यांच्या मार्गदर्शनाखाली तिने या खेळातील मूलभूत गोष्टी शिकल्या. ती पुलेला गोपीचंद यांच्या गोपीचंद बॅडमिंटन अकादमीमध्ये सामील झाली. तिच्या कारकिर्दीची माहिती देताना, द हिंदूच्या बातमीदाराने एक मार्मिक लेख लिहिला. 


"तिच्या घरापासून ५६ किमी अंतराचा प्रवास करून ती दररोज कोचिंग कॅम्पमध्ये वेळेवर हजर होते, हे सर्व पाहून तिचं खेळ आणि देशाप्रती समर्पण आणि प्रेम दिसून येतं. तिचं हे सातत्य पाहून ती एक दिवस खुप मोठी खेळाडू होणार हे निश्चित आहे." तिचा सराव चालू असतानाच राष्ट्रभक्ती आणि जिद्द या गोष्टी दिसून आलेल्या अनेक पैलूंनी मांडलेल्या पुस्तकात दिसून येतात. अशाच वृत्तपत्रातील बातम्यांपासून प्रेरणा घेणारी लवलिना बोर्गोहेनबद्दल वाचताना वाचकालासुद्धा प्रेरणा मिळते. 


अव्वल कुस्तीपट्टू बजरंग पुनिया हा तर गमंत म्हणून सहज आखाड्यात उतरतो. होळीनिमित्त कुस्त्या भरवलेल्या असतात. तेव्हा तो आपल्यापेक्षा दीडपट वजन असणाऱ्या पैलवानाला सहज हरवतो. त्याचबरोबर "माझ्या आयुष्याच उद्धिष्ठ केवळ ऑलंपिक पदक जिंकणे आहे" असं ठणकावून सांगणारा धडाकेबाज रविकुमार दहियाची कहाणीही बरीच रोमहर्षक आहे. या सर्वांचा ऑलंपिक पदापर्यंतचा प्रवास नक्कीच प्रेरणादायी आहे.  प्रत्येक भारतीयाला आपलासा वाटणारा आणि ज्याच्या भाल्यावर तिरंगा डौलाने फडकला असा नीरज चोप्रा प्रत्येकाचा सुवर्णवेध घेतो. अशा अनेकांच्या खिलाडूवृत्तीचा, राष्ट्रप्रेमाचा आणि जिद्दीचा वेध घेणारे हे पुस्तक ठरले आहे. 


याचबरोबर ऑलंपिकपासून वंचित राहिलेले खेळाडू, ऑलंपिकमध्ये खुपणारा चौथा क्रमांक अशा ऑलंपिकसंबधी गोष्टींचा माहितीपूर्ण आशय पुस्तकात टिपलेला आहे.  टोकोयो पॅरा-ऑलंपिक विजेत्यांवरही प्रकाश टाकला आहे. भारतीय हॉकी संघाने ऑलंपिक पदके जिंकण्याची बीजे अनेक खेळांमध्ये रोवली हेही इथे अधोरीखीत होते. अमेरिका, चीन किंवा रशिया यांच्याइतके पदके आपण जिंकत नसलो, तरी हे पुस्तक ती भूक नक्कीच जागी करतेय. आणि आजच्या युवकांमध्ये ही भूक सदासर्वदा राहावी याची भूक लेखकामध्ये जाणवते. 


वाचकाला 'हेच खरे जगज्जेते' हे पुस्तक आपली महत्वकांक्षा, जिद्द, राष्ट्रप्रेम, खिलाडूवृत्ती सोबतच यश-अपयाशाला पेलण्याची ताकद देतेय. प्रत्येक शाळेत, ग्रंथालयात असे पुस्तक निश्चितच असावे. प्रत्येक पालकांनी, शिक्षकांनी, विद्यार्थ्यांनी नक्की वाचायला हवे.  आजपर्यंतचे क्रांती घडवणारे लोक सामान्यच होते. वेडगळ लोकच क्रांती घडवतात. काहीतरी करून दाखवायाच असेल तर केवळ धनशक्तीच असावी लागते ही रीत हे पुस्तक मोडून काढते.  या पुस्तकाची पाने चाळणारा पाल्य नक्कीच उद्याचा जगज्जेता असेल इतकी ताकद या पुस्तकात दडली आहे. वाचक पालकाला-शिक्षकाला आपल्या पाल्याबद्दल-विद्यार्थ्याबद्द्ल चिंतन करायला लावणारे हे पुस्तक वेगळ्याच उंचीवर गेले आहे.


पुस्तक : हेच खरे जगज्जेते 

लेखक : विनोद श्रा. पंचभाई 

प्रकाशक : चपराक प्रकाशन 

पुस्तक मिळवण्यासाठी संपर्क : ७०५७२९२०९२ 


- गणेश बाळकृष्ण आटकळे. 

  पंढरपूर.