Search in Google

Thursday, December 13, 2012

केवळ संघर्ष करायचाय!

                 
        संथ पाण्यात सहजच मारलेला एक दगड आणि त्यामुळे पाण्यावर उठलेले असंख्य तरंग. आपल्या जीवनातही असंच असतं, येणारे एखादे दु:ख किंवा संकट हे एकटे न येता सोबत अनेक दु:खे, संकट घेऊन येतात, ज्यामुळे कित्येकदा आयुष्य ढवळुन निघते. अर्थात हे त्या पाण्यावरच्या तरंगासारखेच कायम न रहाता काही वेळानंतर निवांत होतात. आयुष्य किती क्षणभंगुर आहे. सुख-दुखांचा चढ-उतार कुणाला मुकला आहे? असो... बस्स.. दोन क्षण जगायचे असते..., अन हसऱ्या दुनियेला हसवून जायचे असते. आयुष्याची रीत जरा न्यारीच असते ना, गड्या? चालत राहणं एकमात्र पर्याय आहे इथं! लढायचं असतं, हरलो तरी पुन्हा लढायचं असतं, न्यायासाठी धडपडायचं असतं! प्रयत्नाच्या परिघात यशाचे नंदनवन करता येतं इथं. जगात दुसऱ्याला हसणं जितक सोपं असतं, तितकंच अवघड दुसऱ्यासाठी रडणं असतं!

             प्रत्येकाच्या आयुष्याच्या वाटेवर नेहमीच चढ उतार येतात, कधी चढ चढताना दमछाक होते, तर कधी उतारला गाडी जोरादार धावते! मीही कधी भिंत चढणाऱ्या मुंगीसारखं ध्येयाच्या मार्गावरून पडतोय, असाच अट्टाहास ध्येय गाठण्याच्या प्रयत्नात करतोय! एकांत राती पापण्यांवर सुखमय स्वप्नांना पाहतोय! काही ध्येयवादी स्वप्न अशी कि ज्यामुळे झोपही टाळतोय! घरट्यातून भरारी घेणाऱ्या पाखराला पाहत, छातीत आणखी प्रेरणा भरतोय! या स्वार्थाच्या विश्वात मी समाधानासाठी धडपडतोय! कधी वास्तवात जगतोय तर कधी जाणूनही भासांच्या मागे धावतोय! दिवसाचा सूर्योदय अपेक्षांनी तर सूर्यास्त अनुभवाने पार पाडतोय! माझ्या बेसूर आवाजातच मी माझे जीवनगाणे गातोय! मनाचं दार वाजवणाऱ्या दु:खांना तिथच थांबवत आसवांना मी पापण्यातच आवरतोय! फुलांच्या वाटेकडे जाणाऱ्या.., काट्याच्या वाटेवरून, अलगद पाऊल टाकताना स्वतःला सावरतोय! आयुष्याच्या या खुळ्या खटाटोपालाच मी 'जगणं' म्हणतोय...

            या जगण्यात, मला दु:खांशी झुंज द्यायचीय. 'यश' कशाला म्हणतात, त्याला अलवार स्पर्श करायचायं, त्याला कवेत घेवून जगाला ओरडून सांगायचंय.! स्वप्नांना उराशी धरून चालायचंय! जीवनात आलेल्या संकटांशी मला केवळ संघर्ष करायचाय!!!




Thursday, October 18, 2012

दहशतवाद


        दहशतवादामुळे  जगासमोर आज जी चिंता आहे ती स्वाभाविक आहे. धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज या आपल्या समूह वर्गाला तरणाऱ्या गोष्टी असल्या तरी आज या आपल्या विनाषाच्या बनून बसल्या आहेत काय?   ज्ञान-विज्ञानांत आपल्या समाजव्यवस्थाच्या परीघामध्ये कतीही प्रगती केली असली, तरी हिसंक आणि वर्चस्ववादी भावना थांबवण्यात आधुनिक समाजाला मिळालेले अपयश, धर्म, राष्ट्र, संस्कृती, समाज बाबत आपली अयोग्य विचारधारा या सर्व कारणांमुळे दहशतवादाला मिळणारे खात-पाणी हे आजचे जगासामोरचे सर्वात मोठे संकट आहे. दहशतवादात फक्त हिंसा होत नसते, तर शक्य त्या मार्गाने लोकांच्या मनात एखाद्या गोष्टींबद्दल भीती निर्माण करणे, त्यांची विचारधारा स्वतःकडे गहाण ठेवणे, स्व:हीताच्या रूढी-परंपरामध्ये स्वतःचे वर्चस्व स्थापन करणे ई. रिक्षावाला ५० रुपयांऐवजी ७० रुपये बिल घेईन याची धास्ती मनात असणे हे दहशतवादाचेच उदाहरण आहे. भीती म्हणजेच दहशत!

       हिंसक दहशतवादाचा नाश प्रतिहिंसेने करावा अशी धारणा की सामाजिक घटकांवर पडत आहे, हि मानसिकता दहशतवादाचा नाश कधीही करू शकणार नाही, हे समीकरण बऱ्याच विचारवंतांनी मांडले आहे. तरीही काही सनातनी संघटना याच मार्गाने पुढे जाताना दिसतात, हि आपल्यासमोर चिंतेची गोष्ट आहे. एखादी हिंसक घटना झाली कि लोक जागे होतात, दहशतवाद्यांच्या धर्मावर तोंडसुख घेतले जाते. काही स्तरावर समाज ढवळून निघतो हे नैतिक आणि सामाजिक चूक भासते आहे. धर्मद्वेष, संस्कृतीद्वेष, राष्ट्रद्वेष, भाषाद्वेष, प्रांतद्वेष या बाबी  मानवी समूहाला कधी तारू शकत नाहीत. अर्थात समाजाला न तारणारी भावना, वर्चस्ववाद, दडपशाही या सर्वांपासून मानवी समाज जो अवहेलना सहन करतो त्याला दहशतवाद म्हणता येईल. 

       भारतात मानवी जीवनावर धार्मिक दहशतवाद खूप बिंबवला जातो, हा  दहशतवाद प्राचीन आहे तेव्हापासून, जेव्हा सिंधू संस्कृती, द्रविड कर्मकांड लयास गेले. शुद्र, क्षत्रिय, ब्राह्मण, वैश्य असे मानवी वर्गीकरण म्हणजे दहशत आहे हि सांगण्याची गरज नाही. याउपर आपल्या पुरोगामी इतिहासाला काही वळणांवर चुकीचे रूप देवून बहुजणांचे मेंदू, विचारधारा, संस्कृती व  प्रगतीवादी भावना आपल्याकडे गहाण ठेवली त्यासाठी अनेक काल्पनिक कथाही इतिहास म्हणून रंगवल्या गेल्या. शुद्रांनी सनातन्यांच्या भानगडीत पडू नये हा संदेश दहशतवादानेच दिला.

          इस्लाम दहशतवाद हा केवळ अमेरिकेच्या वर्चस्ववादी धारणेतून दिसून येतो. जगात मुस्लीम राष्ट्रे भरपूर आहेत, त्यांचे संघटीकीकरण अमेरिकी वर्चस्ववादाला धोक्याचे ठरू शकते. म्हणून  एका इस्लाम राष्ट्राला अंतरराष्ट्रीय स्तरावर मदत करणे, तर दुसऱ्या इस्लाम राष्ट्राशी दहशत माजवण्या इतपत द्वेष करणे हे अमेरिकेचे धोरण दिसते. पहिल्या वा दुसऱ्या महायुद्धातील अमेरिकेची वर्चस्ववादी भूमिका कोण विसरेल ? याबाबत हिरोशिमा आणि नागासाकी शहरांची अवहेलेनेचा इतिहास आपल्याला सर्व सांगून जातो.  अमेरिका हे सर्वात दहशतवादी राष्ट्र आहे असेही आरोप काही प्रख्यात विचारवंतांचे आहेत. मात्र ज्यू धर्म हा इस्लाम धर्माचा दाता आहे. इस्लाम धर्मचा मुळ शत्रू ज्यू वा ख्रिस्ती दिसतो. इस्लाम दहशतवादी हल्ल्यांमध्ये ख्रिस्ती किंवा ज्यू टारगेट केले आहेत. भारतात हल्ले करण्यामागचा यांचा उद्धेश म्हणजे भारताची अंतरराष्ट्रीय प्रतिमा मलीन व्हावी. काही ठिकाणी तर चक्क मुस्लीमहि मारले गेलेत. काश्मीर बाबत हा त्यांचा प्रांतिय दहशतवाद आहे. इस्लाम दहशतवाद भारताविरुद्ध म्हणता येईल, हिंदुविरोद्धी नव्हे. परंतु भारतातील हिंदू संघटना मात्र याचा अपप्रचार करतात आणि धार्मिक द्वेषाच्या दंगली आणि मुस्लीम राहणाऱ्या ठिकाणी दहशतवादी हल्ले घडवून आणतात.   उदा. अयोध्या मंदिर-मशीद दंगल, गुजरात गोध्रा हत्याकांड, समझोता एक्स्प्रेस बोम्बस्पोट, मालेगाव बोम्बस्पोट, हैद्राबाद, नांदेड बोम्बब्लास्ट ई. हा भारतासमोर मोठा प्रश्न आहे. या व्यतिरिक्त माववादी, शिखांकडूनहि दहशतवादी कारवाया घडता आहेत. माववादी हे आदिवाशी असून हक्कासाठी बंदूक हाच त्यांचा मार्ग दिसतो. त्यांना दहशतवादी म्हणता येईल का, हा प्रश्न आहे.

        या व्यतिरिक्त पंढरपुराच्या मंदिरात होणारा पंथीय दहशतवाद, राजकीय स्तरांवर पैशाच्या आधारे राजकीय दहशतवाद, भ्रष्टाचारातून आर्थिक दहशतवाद, राजकीय भाषणातून टिंगल वा नकला करणे वा भाषिक दहशतवाद, साहित्यातून जातीय दहशतवाद वा सांस्कृतिक दहशतवाद अशी काही राष्ट्रीय स्तरावर घडणाऱ्या दहशतवादाची उदाहरणे आहेत. दहशतवादाची बीजे प्राचीन काळात रुजली आहेत, त्याचे हे पडसात आहेत. जातीद्वेष, संस्कृतीद्वेष, जातीद्वेष, धर्मद्वेष, राष्ट्रद्वेष, प्रांतद्वेष, भाषाद्वेष व वर्चस्ववादी भावना जो पर्यंत नाश पावत नाही तो पर्यंत दहशतवाद नष्ट होणार नाही.

Tuesday, September 25, 2012

असुरवेद

        मी आवरजुन वाचलेली कादंबरी म्हणजे 'असुरवेद'! सं. दे. सोनवणी लिखित ही एक थरारक कादंबरी होय. कादंबरी वाचायला घेतली आणि स्वतःला हरवून बसलो, अशी थराररकता यात जाणवली. अर्थात, मी कोणी समीक्षक नाही, मी एक वाचक म्हणून इथे बोलत आहे. समाज्याच्या दृष्टीने पाहिले, तर सामजिक प्रश्नावर भूमिका मांडणारे लेखक फार असतात, परंतु याच समाजकारणी लेखाकातून निवडायचे झाले, तर कादंबरीकार फार कमी सापडतात. आजचे इतिहासाबद्दलचे वाद, एक उच्च वर्णीय समाज आणि एक हीन समजला जाणारा समाज अशी तफावत कशासाठी? हे या कथेतून स्पष्ट झालेले दिसते.

        इतिहास हा माणसांनीच घडवला आणि इतिहास लिहिणारादेखील माणूसच होता. इतिहासाचे झालेले लिखाण हे एका विशिष्ठ समाजाने स्व:हिताच्या दृष्टीकोनातून केले, इतिहासात झालेली घुसखोरी, आणि इतिहासाच्या संशोधनात आलेले वेगवेगळे प्रसंग हे या कादंबरीची थरारकता वाढवतात. ही थरारकता जशी पडद्यावर दिसते, तसेच चित्र आपल्या नजरेसमोर उभे राहू लागते. इतिहास संशोधनात झालेली पळवापळवी, आणि जणू इतिहासाचच जणू लिलाव वैदिक लोकानी कसा केला, हे लेखकांनी कथात्मक मांडले आहे. शैव धर्माचा ऱ्हास, हिंदू धर्म, ब्राह्मणी कल्पणा, सिंधू संस्कृती, मुर्तीपुजकांचा समाज या सर्व गोष्टींवर एका रहस्यमय नजरेतून प्रकाश टाकला आहे. यातून कादम्बरीतील पात्रे थाराररकतेची रंगत वाढवतात, दोन-तीन  प्रसंग तर इतक्या रमणीय टोकाला घेवून जातात, कि आपल्या स्व:तालाच कथेचे एक पत्र व्हावासे वाटून, कथेत झेप घेवून पुढील रहस्यांचे उलघढे काय आहेत, ते जाणून घ्यावेसे वाटते. अर्थात कथेत पुढे काय आहे? ही जाणून घेण्याची उत्कंठा शेवटपर्यंत ताणून धरली आहे.

         वेद फ़क्त चार नव्हेत, तर त्या काळी असुरवेद, पिशाच्चवेद, गन्धर्ववेद आणि सर्पवेद असे अजुनही वेद होते, असे आपल्याला गोपथ ब्राह्मणावरुन कळते. उपनिशदांपैकी मुख्य ५२ उपनिषदे अथर्ववेदांवर आधारीत आहेत आणि त्यात आत्म्याचे अजरामरत्व, त्यागाची महत्ता, योग आणि अद्वैताची महती गायली गेली आहे. हे इथे स्पष्ट होते. हे नमूद करताना लेखकाने संशोधनात कशी घुसखोरी होते, त्याचे थरारक नाट्य आपल्या डोळ्याच्या पडद्यासमोर उभा केले आहे आणि वाचकांना यावर चिंतनही करायले लावले आहे, हे कादंबरीचे सर्वात मोठे यश आहे.

Sunday, September 9, 2012

प्रतिसरकार - वेड स्वातंत्र्याचे!

       स्वातंत्र्यापूर्वी क्रांतिसिंह नाना पाटील याची प्रतिसरकार चळवळ जोरात चालू होती. शांततामय अहिंसात्मक चळवळ चीरुडून टाकण्यासाठी इंग्रज पोलिसी अत्याचार सुरु होते. 'जशाच तसे' या न्यायाने क्रांतिकारांनी ही सशस्त्र चळवळ सुरु केली होती. सर्वत्र धरपकड सत्र सुरु होते. भूतपूर्व मुख्यमंत्री कै. वसंतदादा पाटील यांच्या नेतृवाखाली क्रांतीकारांचा एक गट दक्षिण सातारा-सांगली भागात कार्यरत होता.   
                                                                                                
प्रतीसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह
 नाना पाटील
 
  सांगलीमधील फौजदार गल्लीत क्रांतीकारकांची एक खोली होती. क्रांतीकारकांना लागणारी शस्त्रे, पिस्तुले, काडतुसे, हैड्ग्रेनेटस, इतर शस्त्रास्त्रे तेथे ठेवली जात असत. त्याचा सुगावा पोलिसांना लागला. सातारचे डी. वाय. एस. पी. श्री. मोडक यांनी २१ जून १९४३ च्या रात्री १२/१ वाजता खोलीला वेढा घातला. खोलीला बाहेरून कड्या घालून आतील शस्त्रास्त्रे, स्फोटके बाहेर टाकण्यास सांगून खोलीत प्रवेश केला. नंतर वसंतदादा पाटील, येडे निपानीचे हिंदूराव पाटील, कोल्हापूरचे जयराम बेलवलकर, कागलचे वसंतराव सावंत, कुर्लीचे मारुतराव आगलावे आदी क्रांतीकारकांना सांगली जेलमध्ये अटक झाली. (हिंदुराव पाटील म्हणजे प्रसिद्ध कवी पी. सावळाराम यांचे बंडू होत.) सांगली जेलमध्ये जयराम कुष्टे, गणपतराव कोळी, बाबुराव जाधव, आण्णा पत्रावळे, जिनपाल खोत असा सोळा क्रांतिकारकांचा ग्रुप होता.

         सांगली तुरुंगु अभेद्य असा होता. जेलच्या तिन्ही बाजूंना मोठे तट व बुरुज होते. तटाभोवती पाण्याचा खोल खंदक होता. पश्चिमेला पोलीस ठाणे होते. दक्षिणेला घोड्यांचा रिसाला होता. पूर्वेला पोलिसांच्या क्वोटर्स होत्या. क्रांतिकारकांच्या खोलीत पिस्तुले, काडतुसे, हैड्ग्रेनेटस आणि रेल्वे गाड्या पाडण्याची साधनं होती. अधिक माहितीसाठी हे क्रांतिकारक पोलिसांच्या ताब्यात असणं गरजेच होतं.  साताऱ्याचे डी.एस. पी. गिल्बर्ट होते. ते क्रांतिकारकांचे कर्दनकाळच होते.

     त्यांच्या हाती लागण्यापूर्वी जेल फोडून पलायन करायचा बेत वसंतदादांनी निश्चित केला. शनिवारी हा सांगली येथील बाजाराचा वार होता. त्या दिवशी सर्वजण बाजाराच्या गडबडीत असतात. अगदी पोलीससुद्धा बाजाराच्या गडबडीत असतात. वसंतदादांचा खटला त्याच दिवसी सुरु होणार होता. त्यांनी वकिलामार्फत तारीख बदलून पुढे घेतली होती. पोलिसांना दुपारी बाजाराला जायचं होतं. त्यामुळं वसंतदादांनी हिंदुराव पाटील यांना त्यापूर्वी बाथरूमला नेलं. पत्रावळेही बाथरूमला आले. दुपारी अडीच तीनच्या तुरुंग फोडून पाळायचा निश्चय त्यांनी केला. बाजाराची वेळ असल्यामुळं किल्ल्या हवालदाराकडे देवून पोलीस निघून गेले. पहारयातील एकच पोलीस तिथ होता. दुसऱ्या बराकीतील क्रांतीकारकांना पोलिसाने बाथरूमहून आणले ही संधी साधून वसंतदादांनी पहारेकऱ्याला जोरात मिठी मारली व हिंदूरावांनी त्याच्या खिशातील काडतुसे काढून घेतली. बंदूक हिसकावून त्यात काडतुसे भरली. काडतुसे भरलेली बंदूक घेवून हिंदुरावांनी पळत जावून गेटवरच्या बेसावध पोलिसांवर रोखली. पत्रावळे आणि वसंतदादाही गेटकडे गेले. तेथील एका पाहरेकरयाची बंदूक हिसकावून घेतली. गेटवरील १६ पोलिसांना 'जैसे थे' उभे राहायला सांगितले, नाही तर गोळ्या घालायची धमकी दिली. वसंतदादा व इतर चौदा स्वातंत्र्य-सैनिकांनी बंदुकासह तटावरून खंदकात उड्या मारल्या व भर बाजारातून बंदुका घेवून पळू लागले. हिंदुराव पाटील यांची चुकून दगडावर पडली. त्यात त्यांचे दोन्ही पाय दुखावले. अधू झाले.

     जेलमधील पोलिसांनी शिट्ट्या वाजवून धोक्याचा इशारा दिला. घोडेस्वार पोलिसांनी क्रांतिकारकांचा पाठलाग सुरु केला. पाऊस पडल्यामुळ रस्ता निसरडा झालेला होता. त्यामुळे क्रांतीकारकांना बंदुका घेवून पळणे अवघड होते. तरी ते पुलाकडे पळत होते. कृष्णा नदीला महापूर आलेला होता. बाबूराव जाधवांनी 'वंदे मातरम' अशी घोषणा देवून चाळीस फुटावरून कृष्णेच्या पुरात उडी मारली. पुलावरूनच पोलिसानी जाधवांचा बंदुकीन अचूक भेद घेतला. बाबुराव जाधव हुतात्मा झाले. पत्रावळे सांगालवाडीच्या हरीपुरकडे पळत असताना पोलिसांनी चिखलामध्ये एकाकी गाठून त्यांना गोळी घातली. 'भारत माता कि जय' म्हणून तेही शहीद झाले.

      आता सर्व कृष्णा-वारणा संगमावरील झाडांआडून बचावाची भूमिका घेऊन पोलिसांशी लढत होते. वसंतदादांनी उंबराच्या झाडाच्या आश्रयाने पोलिसांशी बंदुकीनं सामना चालू ठेवला. झटापटीत वसंतदादांचा खांदा झाडाबाहेर आलेला पाहून एका पोलिसाने त्यांचा अचूक भेद घेतला. खांदा विदीर्ण होताच दादा बेशुद्ध पडले. तिसरा क्रांतिकारक बळी पडला असे समजून पोलिसांनी पुरात होड्या सोडल्या. जखमी वसंतदादा आणि हिंदुराव पाटील यांना उपचाराकरिता  दवाखान्यात पोहचवले. गणपत कोळी, मारुती आगलावे, सातलिंग शेते, जयराम कुष्टे, महादेव बुटाले, विठ्ठल शिंदे यांना बेड्या ठोकून जेलबंद केले. त्यांवरील खटले कोर्टात न चालवता जेलमध्ये चालवले. सर्वांना सक्तमजुरीची शिक्षा ठोठवण्यात आली. १९४६ साली त्यांची सुटका झाली. बाबुराव जाधव आणि पत्रावळे हे दोघेही क्रांतिकारक मातृभूमीसाठी शहीद झाले. 

कर्मवीर भाऊराव पाटील व
क्रांतिसिंह नाना पाटील
       अशा क्रांतीवीरांची अनेक नावे सांगता येतील. नागनाथ आण्णा नायकवडी अतिशय धाडशी वृत्तीचे आणि धडाडीचे क्रांतिकारक होते. त्यांना 'प्रतीसरकारचा ढाण्या वाघ' असे संबोधले जायचे. नायकवडी आण्णा अत्यंत जहाल आणि कृतीशील होते. कामिरीचे एस. बी. पाटील, वाटेगावचे बेर्डे गुरुजी हे आण्णांचे मुख्य साथीदार होते. बांगर गुरुजी, बलदेवसिंग, पांडू मास्तर, भाई विभूते, कोम्रेडे छन्नुसिंह चंदेले, किसान वीर, जी. डी. उर्फ बापूसाहेब लाड, बाबुराव जगताप, उंडाळकर पाटील, दिनकर आबा, आप्पासाहेब लाड, घोरपडे मास्तर (किती नावे घ्यावी?) यांनीही प्रतिसरकार चळवळीतून स्वातंत्र्यासाठी स्वतःला झोकून दिले होते. या सर्वांना कर्मवीर भाऊराव पाटील व प्रतीसरकारचे संस्थापक क्रांतिसिंह नाना पाटील यांचं योग्य मार्गदर्शन होतं. दिवस-रात्र न पाहता हे सर्व क्रांतिकारक सह्याद्रीच्या दऱ्याखोऱ्यात इंग्रजांना शह देत धावले. काहींनी आपल्या प्राणाचे बलिदान दिले, काही अर्धेमेले झाले तर काहींना वेढ लागलं. हो, स्वातंत्र्याचं वे!   
  
      विशेष म्हणजे, हा लोकलढा, 'प्रतीसरकार'चं उभं करणारे सगळे मातीचे अस्सल भूमिपुत्र होते. सामान्य शेतकरी होते. हे सच्चे देशभक्त होते. आतून बाहेरून मायभूमीशी एकनिष्ठ होते. आजही हे सर्वजण अमर आहेत!

आभार:- जिजाऊ प्रकाशन, पुणे.

Saturday, July 21, 2012

एक पत्र...

       प्रत्येक वडिलांना वाटते, आपल्या पाल्याने चांगले शिक्षण घ्यावे आणि  इतरांना आदर्श वाटावे, असे स्वतःचे वेगळे आपले अस्तित्व निर्माण करावे. फक्त शालेय शिक्षणा-व्यतिरिक्त आपल्या पाल्याने सामाजिक,  व्यावहारिक ज्ञानही आत्मसात करावे. हे विश्व जितके सुंदर आहे तितका त्याचा आनंद घ्यावा, याला अनुसरून तशी प्रेरणा स्वतःमध्ये भरून घ्यावी. आयुष्यातील चढ-उतरांशी तोंड सर्वांनाच द्यावे लागते, याची जान करून देणारे आणि मला आवडणारे एक पत्र... हे पत्र अब्राहम लिंकन यांनी आपल्या मुलाच्या प्रगतीसाठी हेड-मास्तरांना लिहिले होते...

प्रिय गुरूजी,

सगळीच माणसे न्यायप्रिय नसतात;  नसतात सगळीच सत्यनिष्ठ!
हे शिकेलच माझा मुलगा कधी ना कधी!
मात्र त्याला हे देखील शिकवा -
जगात प्रत्येक बदमाशागणिक , असतो एक साधुचरित पुरूषोत्तमही!
स्वार्थी राजकारणी असतात जगात ,
तसे असतात अवघं आयष्य समर्पित करणारे नेतेही!
असतात टपलेले वैरी तसे जपणारे मित्रही!

मला माहीत आहे;
सगळ्या गोष्टी झटपट नाही शिकवता येत…
तरीही जमलं तर त्याच्या मनावर ठसवा ,
घाम गाळून कमावलेला एकच छदाम
आयत्या मिळालेल्या घबाडापेक्षा मौल्यवान आहे.

हार कशी स्वीकारावी ते त्याला शिकवा
आणि शिकवा विजयाचा आनंद संयमाने घ्यायला!
तुमच्यात शक्ती असली तर
त्याला द्वेष-मत्सरा-पासून दूर रहायला शिकवा.
शिकवा त्याला आपला हर्ष संयमानं व्यक्त करायला.
गुंडांना भीत जाऊ नको म्हणावं ,
त्यांना नमवणं सर्वात सोपं असतं !

जमेल तेवढं दाखवीत चला त्याला ग्रंथभांडाराचं अदभुत वैभव
मात्र त्याबरोबरच मिळू दे त्याच्या मनाला निवांतपणा.
सॄष्टीचं शाश्वत सौंदर्य अनुभवायला,
पाहू दे त्याला पक्ष्याची अस्मानभरारी…..
सोनेरी उन्हात भिरभिरणारे भ्रमर…
आणि हिरव्यागार डोंगर उतारावर
डुलणारी चिमुकली फुलं,

शाळेत त्याला हा धडा मिळू दे.
फसवून मिळालेल्या यशापेक्षा सरळ आलेलं अपयश श्रेयस्कर आहे.
आपल्या कल्पना, आपले विचार
यांच्यावर दॄढ विश्वास ठेवायला हवा.
त्यानं बेहेत्तर आहे सर्वांनी त्याला चूक ठरवलं तरी
त्याला सांगा, त्यानं भल्यांशी भलाईनं वागावं
आणि टग्यांना अद्द्ल घडवावी.

माझ्या मुलाला हे पटवता आलं तर पहा -
जिकडे सरशी तिकडे धावत सुटणा-या भाऊगर्दीत
सामील न होण्याची ताकद त्यानं कमवायला हवी .
पुढे हे ही सांगा त्याला,
ऎकावं जनांचं, अगदी सर्वांचं….
पण गाळून घ्यावं ते सत्याच्या चाळणीतून ,
आणि फोलपटं टाकून,
निकष सत्व तेवढं स्वीकारावं.
जमलं तर त्याच्य मनावर बिंबवा-
हसत राहावं उरातलं दुःख दाबून
पण म्हणावं त्याला.
आसू ढाळायची लाज वाटू देऊ नकोस!
त्याला शिकवा,
तुच्छवाद्यांना तुच्छ मानायला
अन चाटुगिरीपासून सावध रहायला.

त्याला हे पुरेपुर समजावा, की
करावी कमाल कमाई त्याने
ताकद आणि अक्कल विकून ….
पण कधीही विक्रय करू नये
हॄदयाचा आणि आत्म्याचा!

धिक्कार करणा-यांच्या झुंडी आल्या तर
काणाडोळा करायला शिकवा त्याला, आणि ठसवा त्याच्या मनावर
जे सत्य आणि न्याय्य वाटते
त्याच्यासाठी पाय रोवून लढत रहा.

त्याला ममतेने वागवा पण
लाडावून ठेवू नका .
आगीत तावून सुलाखून निघाल्याशिवाय
लोखंडाचं कणखर पोलाद होत नसतं.
त्याच्या अंगी बाणवा अधीर व्हायचं धैर्य
पण धरला पाहीजे धीर त्यानं
जर गाजवायचं असेल शौर्य!
आणखीही एक सांगत रहा त्याला,
आपला दॄढ विश्वास पाहीजे आपल्यावर
तरच जडेल उदात्त श्रध्दा मानवजातीवर.

माफ करा, गुरुजी! मी फार लिहितो आहे
खूप काही मागतो आहे….
पण पहा…… जमेल तेवढं अवश्य करा!
माझा मुलगा-
भलतंच गोड लेकरु आहे हो!
----अब्राहम लिंकन                            

(हे मुळ पत्र इंग्लीश आहे, त्याचे प्रथम मराठी भाषांतर वसंत बापट यांनी केले.)

Thursday, July 5, 2012

साहित्याचा महामेरू: अण्णाभाऊ साठे

        आजवर भरपूर कादंबऱ्या वाचल्या. पण इतर पाठ्यपुस्तके, माहिती पुस्तके, आत्मचरित्रे याबरोबर आपण कादंबऱ्याही का वाचव्या?  कारण, कादंबऱ्यातच लेखकाची सर्व शक्ती पणाला लागते ! कादंबरीतच लेखकाच्या पूर्ण विचारशक्ती आणि कल्पनाशक्तीची जाण होते. लेखकाला हे सर्व कथात्मक कसे  सुचत असावे, स्वतःस असा प्रश्न पडल्याशिवाय राहत नाही! लेखकाचीच विचारशक्ती पडद्याबिगर आपल्या डोळ्यासमोर कादंबरीतील घटनाचीत्र दाखवत असते. कथेतील चुरस जाणून घेण्यात आपण कादंबरी वाचनाच्या ओढीला लागतो. हे लेखकाला सुचलेल्या कथेमुळे, प्रसंगामुळे, पात्रांमुळे शक्य होते. यात आज आम्हाला आण्णाभाऊ साठेंची आठवण आल्याशिवाय राहणार नाही, त्या काळात जातीवादामुळे आण्णाभाऊ साठे शिक्षणापासून वंचित राहिले. त्यावेळी मातंग समाजातील मुलगा म्हणून ब्राह्मण मास्तरांनी अण्णाभाऊ साठेंना शाळेतून बाहेर काढले. परंतु आज आण्णाभाऊ साठेंची लौकिकता सांगावी लागत नाही. दीड दिवस शाळेत गेलेले आण्णाभाऊ साठे यांची 'फकिरा' नावाची कादंबरी  काही विद्यापीठांच्या अभ्यासक्रमात आहे. आण्णाभाऊ साठेंनी तब्बल ३५ कादंबऱ्या लिहिल्या. फकिरा, वैजयंता, चिखलातील कमळ, वारणेचा वाघ, अलगूज,  कवड्याचे कणीस, पाझर, वैर, डोळे मोडीत राधा चाले, गुलाम, चित्रा, धुंद रानफुलाचा, रानगंगा, मास्तर, मंगला, जीवंत काडतूस, तास, संघर्ष, रूपा, रानबोका, फुलपाखरू अशा त्यांच्या काही कादंबऱ्या. 'फकिरा'सारख्या  काही सातासमुद्रापलीकडे पोहचल्या. ३५ पैकी ७ कादंबऱ्यावर चित्रपट बनवण्यात आले.

      अण्णाभाऊ साठेंचा कथासंग्रह खूप मोठा होता. बरबाद्या कंजारी, फरारी, लाडी, भानामती, पिसाळलेला माणूस, चिरानगरची भुतं, निखारा, नवती, आबी, गजाआड, कृष्णा काठच्या कथा, खुळंवाडी अशी तब्बल तेरा कथा संग्रह आण्णाभाउंनी प्रसिद्ध केली. सुलतान , पेंग्याच लगीन, इनामदार यांचाही या यादीत समावेश आहे. याबरोबर साठेंनी शिवरायांचा स्वराज्य संदेश ही पोवाड्यातून लोकांपर्यंत पोहचवला, म्हणून लोकांनी त्यांना लोकशाहीर ही पदवी बहाल केली. याचबरोबर यांनी नेसरीच्या खिंडीत मृत पावलेल्या प्रतापराव गुजर अशा पराक्रमी मावळ्यांवर 'अग्निशिखा' ही ऐतिहासिक कादंबरी लिहिली.  अकलेची गोष्ट, खापऱ्या चोर,  कलंत्री, बिलंदर बुडवे, बेकायदेशीर, शेटजीचं इलेक्शन, पुढारी मिळाला, मूक मिरवणूक्, माझी मुंबई, देशभक्त घोटाळे, दुष्काळात तेरावा असे अनेक तमाशेही साठेंनी प्रसिद्ध केले. 'माझा रशियातील प्रवास' हे साठेंचे प्रवास वर्णन ही रशियात प्रसिद्ध झाले. याच बरोबर नानकीन नगरापुढे, स्टलिनग्राडचा पोवाडा, बर्लिनचा पोवाडा, बंगालची हाक, पंजाब-दिल्लीचा दंगा, तेलंगणाचा संग्राम, महाराष्ट्राची परंपरा, अमरनेरचे अमर हुतात्मे, मुंबईचा कामगार, काळ्याबाजाराचा पोवाडा असे त्यांचे सु-प्रसिद्ध पोवाडे. अकलेची गोष्ट, शेटजींचे इलेक्षन, बेकायदेशीर, माझी मुंबई अर्थात मुंबई कोणाची?, मूक मिरवणूक, लोकमंत्र्यांचा दौरा, खापर्‍या चोर, बिलंदर बडवे यांसारखी वगनाटये अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या आंदोलनाची पायाभरणी करण्यासाठी लिहिली. त्यांतील गरूडाला पंख, वाघाला नखं तशी ही (मुंबई) मराठी मुलुखाला हे कवन संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत विलक्षण गाजले.

     सांगली जिल्ह्यातील खेडेगावात एका गरीब कुटुंबात जन्माला आलेले अण्णाभाऊ साठे फक्त साहित्य सम्राटच नव्हे तर समाजसुधारकही होते. अण्णाभाऊंनी संयुक्त महाराष्ट्राच्या चळवळीत लोकनाट्यांद्वारे जनजागृतीसाठी प्रयत्न केले. वर्गविग्रहाचे तत्त्वज्ञान सर्वसामान्य जनांपर्यंत पोहोचविणारा, महाराष्ट्राच्या ग्रामीण मातीतील बोली आणि कलांचा संस्कार घेऊन आलेला सिद्धहस्त कादंबरीकार, लोकनाट्यकार म्हणून त्यांची प्रमुख भूमिका आहे. अण्णाभाऊ लावण्या, शाहिरी, पोवाडा या लोककलांमध्ये तरबेज होते. मराठीभाषिक स्वतंत्र महाराष्ट्र राज्याच्या निर्मितीकरता इ.स. १९५० च्या दशकात चाललेल्या संयुक्त महाराष्ट्र चळवळीत त्यांनी लोककलेच्या माध्यमातून लोकप्रबोधन घडवून आणले. यातून अण्णाभाऊ साठेंची कारकीर्द आजही चालू आहे. आपल्यासारख्या नवख्यांना याच्यामुळेच प्रेरणा मिळते म्हणून आज आम्ही अण्णाभाऊ साठेंना स्मरूनच लेखणी उचलतो! ३६५ दिवसापैकी १ दिवस मराठी दिन साजरा केला जातो, उरलेले ३६४ दिवस अण्णाभाऊ साठेंच्या नावे मराठी दिन साजरा करूयात. 
 
Published in Dainik Pandhari Varta Pandharpur and Dainik Surajya, Solapur. (1 Aug 2018 - on the occasion of birth anniversary of Annabhau Sathe.  )

Monday, January 30, 2012

गीता ग्रंथ आणि गांधी


             कालच गांधीचे आत्मचरित्र वाचून झाले, गांधीनी आपल्या आत्मकथनामध्ये  सत्याचे प्रयोग आणि विवध  धर्मांच्या विचारांची उत्तम रित्या सांगड घालत आपली जीवन शैली रेखाटली आहे. प्रथमतः त्यांनी ख्रिस्ती धर्माबद्दल जरा द्वेष दर्शवला असून हिंदू धर्माचे गोडवे गायले आहे, अर्थात तेव्हा गांधी इतर धर्माच्या जास्त परिचयात नसत. 'धर्माचे मंथन' या प्रकरणावरूनच त्यांनी विविध धर्म ग्रंथ वाचलेले सांगितले आहे. त्यात गांधींनी येशू ख्रिस्तांचे उत्तम उदाहरण दिले असून, अहिंसा आणि सहनशीलता या दोन गुणांना धरूनच त्यांनी 'एका गालात मारली तर दुसरा गाल पुढे करावा ' हे सूत्र जोपासले असावे, हेच  त्यांनी 'अहिन्सादेवीचा साक्षात्कार' या  प्रकरणात सांगितले आहे. ते विलायतेत असतानाहि ख्रिस्ती मित्रांशी बुद्ध चरित्र आणि जैन ग्रंथ जगाने का स्वीकारले हे त्यांनी पटवून दिले नाही. अर्थात हे ग्रंथ विश्वशांतीचा संदेश देतात. दया, क्षमा, शांती, अहिंसा, प्रेम, सत्य, विश्वास हेच गुण म्हणजे परमेश्वर असे सांगणाऱ्या गोतम बुद्धांचे विचार लोकांना इतके पटले कि परमेश्वराच्याहि पलीकडे बुद्धांनी बुद्धीष्टांच्या मनात घरे केली.

    ज्याप्रमाणे प्रसिद्ध अर्थशास्त्रज्ञ लार्ड यांनी अहिंसावादी गांधींनी हिंसा दर्शवणारी गीता या ग्रंथाचे कौतुक कसे केले असा प्रश्न उपस्थित केला आहे,याच वादावरून रशियामध्ये या ग्रंथावर बंदी आली आहे, तर याचे उत्तर देता येईल कि ज्ञान आणि आत्मा हे गुणधर्म  सांगण्यासाठी केवळ हिंदू धर्म ग्रंथचे वर्णन केले असावे, अर्थात त्यांनी अहिंसेचे गीता हे प्रतिक नाही असे नमूद केले नाही.  आणि अहिंसेसाठी ख्रिस्ती धर्म ग्रंथ आत्मसात करायला सागितले आहे.यावरून असे दिसून येते कि कोणत्याही धर्मियांचे मन दुखावले जाणार नाही, याची गांधीजींनी  दखल घेतली असावी. दुसरी बाजू पाहिली असता गीता हा धर्म ग्रंथ होऊ शकत नाही असेहि काही विचारवंत म्हणतात, याला भारतीय युद्धाची पार्श्वभूमी दिल्याने एक भावनिक स्वरूप मिळाले आहे.

Sunday, January 22, 2012

कर्मवीर

              दिवस कासराभर वर आला होता. तांदूळवाडीत सगळ्यांची सकाळची तयारी होऊन चहा- पाणी चालू होते. कोण शेतात तर कोण दुधाच्या डेअरीवर जात असताना दिसत होते. आबा हाताची घडी चालून अंगणात ये-जा करत होते, कदाचित त्यांना कसलीतरी चिंता असावी. शेजारचा गणपा हौदावर अंघोळ करत होता.   अंगावर साबणाचा कापसागत फेस करत लावणी गुणगुणत होता, हौदाच्या पलीकडून कोंबड्या ओरडलेला आवाज चालू होता. आबांच्या घरातून लसणाच्या फोडणीचा वास सुरु झाला. आबांना घराशेजारून जाणऱ्या रस्त्यारून हरिदास दुधाच्या दोन किटल्या घेऊन जाताना दिसला, दोघांची नजर भिडताच एकमेकांना  राssम-राम...!  असा आवाज दिला. आबांच्या दारात दावणीला बांदलेली बैलं शिंगाड हलवत होती, अधून-मधून त्यांच्या गळ्यातल्या घुंगराचा आवाज कानी पडायचा. आबांच्या चेहऱ्यावर मात्र रात्रीपासून बरीच चिंता दिसत होती. आबा ये-जा करत कोणता तरी मोठा विचार करत असल्यागत दिसत होते, मध्येच एका बैलान बारीकसा हंबरडा फोडला, आबांनी कडब्याच्या दोन पेंड्या बैलापुढ टाकल्या. पुन्हा आबांची ये- जा सुरु झाली, मधून आबांची नजर गावाकडून येणाऱ्या रस्त्यावर पडायची. आबा रात्री पासून बेचैन होते, लवकर झोप लागली नव्हती, या अंगावरून त्या अंगावर करत होते, दोन-तीनदा अन्थूरनातून उठून त्यांनी भिंतीवरचा कर्मवीर भाऊराव पाटलांचा फोटो पाहिला होता.

              मागच्याच महिन्यात त्यांनी आपल्या मुलीच लग्न उरकून तिला हसत सासरी पाठवलं. आबा तसे कठोर काळजाचे आणि धीराचे. त्यांचा मुलगा लक्ष्मण उजाडायच्या आत गावात गेला होता. तसा लक्ष्मणची हा वेळ नेहमीप्रमानं  वर्तमानपत्र आणून वाचत बसण्याची, पण आज तो कुठ गेला होता याची त्याच्या आईला कल्पना नव्हती. दोन महिन्याच्या सुट्टीत लक्ष्मणने शेत्तीतील कामात बराच हातभार लावला, लक्ष्मणाने नुकतीच बारावीची परिक्षा दिली होती.
                 आबा मात्र पुनःपुन्हा गावाकडून येणाऱ्या वाटेवर नजर टाकत होते. आता त्यांच्या कपाळावर आट्या पडलेल्या दिसत होत्या, मध्येच बैलाकड नजर तर कधी घड्याळाच्या काट्याकड! 
"आता रानात गेलं पाईजी...." ते स्वतःशी पुटपुटले.
त्यांनी पुन्हा बैलाच्या दावणीतील वैरण आहे का? बघीतली. खोऱ्या घेऊन ते थोड्या अंतरावर असलेल्या रानाकड गेले, मोटार चालू करून ते पाण्याकड कमी लक्ष्य आणि वाटेकड जास्त लक्ष्य देऊ लागले. ऊस चांगला कंबरेला आला होता.

            दोन वाफे भरत आले, आता दिवस डोक्यावर आला होता. न्याहारी करण्याची वेळ आली. त्यांच्या कपाळावर घाम काढत आबा मध्येच मोठ्या श्वासाचा व्हुसकारा टाकत.. वाफ्याचे एक-एक दार मोडायचे त्यांचे काम चालू होते... आबांना तेवढ्यात लक्षमण गावाहून पळत येताना दिसला, ऊसाच्या रानात त्याला आबा दिसले.

आबा उसातून बांधावर आले. आबा आणि लक्ष्मण एकमेकांच्या जवळ आले. लक्षमण थोड्या अंतरावर असताना तो आबांना म्हणाला
"आबा, मी जिल्ह्यात पहिला आलू..."
आबांचा चेहरा पटकन मोठा झाला, कपाळावरच्या आट्या दूर झाल्या, किती हसावं कळेना, चेहऱ्यावरची चिंता दूर झाली. आनंद पोटात मावेना. त्यांनी लक्ष्मणच्या चेहऱ्यावरून चिखलाचा हात फिरवला आणि घट्ट
मीठी मारत... 
"लै शिकं पोरा... लै मोठा हो...  भाऊराव पाटलांच्या वडायेवढा मोठा हो!"
टपकन आबांच्या डोळ्यातून अश्रू  ओघळले. आबांच्या तोंडात साखर घालून, लक्षमणाने त्यांचे चरण स्पर्श करत बोलला... "व्हय, आबा व्हय..!" आणि त्यान त्याच्या आईसाठी घराकड धाव घेतली.. त्याच्या फिरलेल्या पाठीकड बघत, आबा पुटपुटले "तू काय बी काळजी करू नगसं.. फकस्त लै शिकं.! "
  

Published in Dainik Pandhari Bhushan, Pandharpur. on the occasion of birth anniversary of Karmveer Bhaurao Patil (22 Sept. 2018).