Search in Google

Tuesday, July 23, 2019

आर्यांची दिनचर्या : जगण्याला दिशा देणारे पुस्तक - Book Review

या वर्षात मी अनेक पुस्तके वाचली. त्यातच 'आर्यांची दिनचर्या' हे पुस्तक हाती पडलं. एकदा हातात घेतलं आणि कधी वाचून संपलं समजलंही नाही आणि जवळ एक-दीड वर्षांनी मला एखाद्या पुस्तकाचं समीक्षण करावसं वाटलं. खरं तर हे पुस्तक नसून निरोगी आणि सुखी जीवन जगण्याचा मूलमंत्र आहे. आपले सर्वात मोठं धन म्हणजे 'आपले आरोग्य' होय. आरोग्य आहे तर सर्व काही आहे आणि हे आरोग्य जपण्यासाठी आपल्याला काही फार कष्ट घ्यावे लागत नाहीत. सर्व उपाय आपल्याजवळच असतात. अर्थात  निरामय आरोग्य व समृद्ध चौफेर जीवन जगण्यासाठी दिशा देणारे हा ग्रंथ आहे.

सामाजिक आरोग्याच्या सुदृढतेचा विचार करून या ग्रंथाची मांडणी झाली आहे. आरोग्य म्हणजे केवळ रोगांचा अभाव नसून ती एक शारीरिक, मानसिक, सामाजिक आणि अध्यात्मिक समतोलाची अवस्था आहे. पोषण, आहार, व्यायाम, स्वच्छता, इतरांशी व्यक्तिगत संबंध या गोष्टी आरोग्यावर परिणाम करतात. एखादा आजार होऊन बरा करण्यापेक्षा तो होवूच नये याची उपाययोजना यात सांगितली आहे.

आपल्या दिनचर्येबरोबर सामान्य औषधी उपचार, निसर्गोपचार, वनस्पती, गुणधर्म, मुळव्याध, अग्निमांद्य, दमा, सामान्य ज्वर, नेत्ररोग, त्वचारोग, कर्णरोग, दंतरोग व स्त्रीरोग यांची चिकित्सा ईत्यादी विषयांवर स्वनुभाविक व सुलभ औषधयोजनांची पुस्तकातील माहिती अतिशय उपयुक्त आहे. मी या पुस्तकाला केवळ  'घराचा वैद्य' अजिबात बोलणार नाही कारण हे पुस्तकात फक्त उपचार सांगितले नाहित तर जगण्याची सकारात्मकता दाखवत वाचकांना प्रोत्साहित करते. यात अनेक लोकांचे अनुभव आहेत. काही लोकांचे तर आजार बरे होणे शक्य नव्हते असेही अनेक आजार कीर्तनकार ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन यांनी बरे केले आहेत.

गरोदर असताना स्त्रियांनी काय काळजी घ्यावी, दुध येण्यासाठी काय काळजी घ्यावी. यात विद्यार्थी, वृद्ध, तरुण, स्त्रिया आशा सर्वच गटातील लोकांसाठी उपयुक्त माहिती आहे. शारीरिक व्याधीचे नैसर्गिक आणि साधेपणाने उपचार कसे करावेत याबाबतचे अनुभवजन्य विश्लेषण बुवांनी या पुस्तकाच्या माध्यमातून अत्यंत साध्या, सोप्या भाषेत केले आहे.

या पुस्तकातले अनेक आचार म्हणजे दिनचर्या. दैनंदिन व्यवहारात मनुष्याने वागावे कसे ? प्रत:काळी उठल्यापासून रात्री निद्रा घेईपर्यंतचे जीवन कसे घालवावे हे आचाराच्या धार्मिक चौकटीत बसवून दिलेले आहे परंतु हे आचार आपले जीवनसैख्य, आयुष्य, बल, तेज वाढविणार कसे आहेतयाचे तरुणांनी ज्ञान करून घेतले तर आपल्या जुन्या आचारासंबधी झालेले गैरसमज दूर होऊन त्याप्रमाणे वागणारा दीर्घायू, तेजस्वी आणि सुखी झाल्याशिवाय राहणार नाही. हे या पुस्तकात सांगितले आहे. 

वाई येथील आद्य राष्ट्रीय कीर्तनकार आणि लेखक ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन यांचे वाचनीय आणि अनुकरणीय पुस्तक. १९५६ नंतर या या पुस्तकाची गरज का पडते आहे हे चपराकने ओळखले आणि हे पुस्तक पुन्हा प्रकाशित केले आहे. सर्वांनी हे पुस्तक वाचून आपले जीवनशैली निरोगी आणि सकारात्मक उर्जेने भरून जगावे.

पुस्तक : आर्यांची दिनचर्या
लेखक : ह. भ. प. डॉ. दत्तोपंतबुवा पटवर्धन
प्रकाशक : चपराक प्रकाशन
संपादन : दिलीप कस्तुरे
किंमत : २०० रुपये.
या पुस्तकाच्या नोंदणीसाठी संपर्क: ‭7057292092
http://shop.chaprak.com/product/aryanchi-dincharya/

Saturday, July 6, 2019

5G इंटरनेटची दुसरी बाजू

इंटरनेटविषयीचे तंत्रज्ञान जोर घेत असताना, आता 4G नंतर 5G जीचा धुमाकूळ वाढणार आहे. 5G नेटवर्कमध्ये भरपूर युझर कनेक्टीविटी असूनही इंटरनेट सेवा फास्ट असणार आहे. वाहतूक, दळणवळण, खाजगी व्यवसाय, सरकारी कामे, स्मार्ट सिटी अशा सर्वच ठीकाणी सर्व कामे वेगाने होतील.    टरनेटला आता 5G मध्ये नेण्याची तयारी सुरू झाली आहे. या नवीन वायरलेस सेल्युलर तंत्रज्ञानामुळे आजच्या तुलनेत इंटरनेटचा वेग अनेकपटीने वाढणार आहे. कोणतेही इंटरनेटयुक्त उपकरण चालवणे अधिक सोपे होईल. थोडक्यात, स्मार्टफोनवर गेम कोणताही व्यत्यय न येता खेळू शकाल. ट्रॅफिकमध्ये बदल झाल्यास ऑटोनॉमस  व्हेइकल त्वरित प्रतिक्रिया देईल. यामुळे स्मार्ट होम जास्त स्मार्ट होईल. 

अमेरिकेत या २०१९ अखेरपर्यंत 5G फोन  बाजारात येतील. परंतु त्यासाठी सध्या 5G नेटवर्क कमी प्रमाणात आहे. सध्या जे 5G नेटवर्क आहे ते टेस्टिंग आहे. परंतु 5G च्या सेवा देवू पाहणाऱ्या दूरसंचार कंपन्यांना हाय फ्रिक्वेन्सी ट्रान्समिशनसाठी सेल्युलर उपकरण आणावे लागतील. त्यासाठी खर्च खूप असणार आहे. रेडीओ व अन्य तरंगांचे उपकरण सिग्नल इलेक्ट्रोमॅग्नेटिक स्पेक्ट्रमवर चालतात. परंतु 5G साठी कंपन्यांना आधीच्या तुलनेत अधिक जास्त स्पेक्ट्रमचा वापर करावा लागेल. दुसरीकडे अमेरिकन सुरक्षा अधिकाऱ्यांनी सांगितले की, 5G उपकरणाचे प्रमुख निर्माते चीनमधील हुवावे, जेडटीई कंपनी विदेशातील युजरला देखरेख करण्याची परवानगी देऊ शकतात. परंतु आजवर आपण पाहिलेले आहे की विज्ञानाच्या प्रत्येक संशोधनाला दोन बाजू आहेत. अमेरिकन फोन कंपन्यांना उपकरण देण्यास कंपन्यांना नुकतीच बंदी घातली आहे. बरोबरच 5G त्रुटींवर संशोधन सुरु आहे. 

जवळजवळ ४० देशांमधले १८० पेक्षा जास्त वैज्ञानिक आणि डॉक्टर 5G मुळे  पृथ्वीवरील जीव सृष्ठीला धोका असल्याचे सांगतात. या संबधीचा ठराव या शास्त्रज्ञांनी "रीझोलूशन १८१५ ऑफ दी कौंसील ऑफ युरोप" या युरोपच्या परिषदेत मांडला होता. या परिषदेत मानवी आरोग्यासाठी संभाव्य धोके आणि वैज्ञानिकांद्वारे पर्यावरणासाठी संपूर्णपणे स्वतंत्र तपासणी होईपर्यंत इंटरनेटच्या 5G सेवेवर एक अधिस्थगन करण्याची शिफारस मांडली होती. त्यामध्ये 5G रेडिओ फ्रीक्वेंसी इलेक्ट्रोमॅग्नेटिक फील्ड्स (RF-EMF)ची  लक्षणीय वाढ दिसून आली आणि ही फ्रीक्वेंसी मानवांसाठी आणि पर्यावरणास हानिकारक असल्याचे सिद्ध झाले होते. २०१८ मध्ये युरोपियन संसदेने सांगितले की, विद्युत व चुंबकीय क्षेत्रातील संभाव्यत: हानिकारक प्रभावापासून जनतेस संरक्षण देण्याची प्राथमिक जबाबदारी वय आणि आरोग्याच्या स्थितीनुसार अवलंबित करण्याच्या उपायांचा समावेश असलेल्या सदस्य कंपनी आणि राज्यावर राहील.

सध्याच्या 4G मध्ये आणि येणाऱ्या 5G मध्ये आपल्याला कमालीचा फरक जाणवेल. यात वैकल्पिक विद्युतप्रवाह (अल्टरनेट करंट) किंवा इलेक्ट्रोमॅग्नेटिक लहरींचा महत्त्वपूर्ण भाग असेल. सिग्नल्सचा विचार करता,  5G तंत्रज्ञान रेडिओ मिलिमीटर बॅन्ड ३० ते ३०० गीगाहर्ट्झ रेंजमध्ये, तर 4G  ६ गीगाहर्ट्झच्या आसपास आहे. जेव्हा इंटरनेटची अधिक गरज भासते उदा. व्हिडिओ, इंटरनेट वापरकर्त्यांची वाढ, डेटा वाहतुकीमध्ये वाढ यामध्ये विलंबता लागू होते, तेव्हा ते ६० ते १२० पट वेगाने वाढते. 5G बाबतीत सांगायचे झाले तर आपण एखादी गोष्ट पहिली कि ती प्रतिक्रिया मेंदूपर्यंत पोहचायला जितका वेळ लागतो अगदी तेवढ्या वेळेत उपकरनांतून इंटरनेट डेटा वाहिला जाईल. जेव्हा सिग्नल्सची फ्रीक्वेंसी जास्त असते, तेव्हा तिचे तांत्रिक फायदे तर असतातच परंतु पर्यावरणाच्या दृष्टीने ती धोक्याची असते. अशा फ्रीक्वेंसीसाठी अँटेना अगदी जवळजवळ लागतात.

मानव, प्राणी आणि पर्यावरणासाठी 2G, 3G आणि 4G  रेडिओ फ्रिक्वेंसी साधारण होती. 5Gच्या वायरलेस सिस्टीममध्ये नवीनवीन प्रगती होईल. 5G यंत्रणेत मोठे चॅनेल्स, उच्च गती, डेटाचे मोठे पॅकेट, घातांकीय प्रतिसाद आणि एकाच स्थानावरून होस्ट डिव्हाइसेस कनेक्ट करण्याची क्षमताही वाढली जाईल. यामध्ये सुरुवातीला काही अडथळे येतील नंतर जशी सिग्नल्सची तीव्रता वाढत जाईल तसे अडथळे दूर होतील.

सध्या 4G च्या तरंगलांबी आपल्या त्वचेभोवती  वावरतात, तर 5Gच्या तरंगलांबी त्वचेसाठी अधिक घातक असतात. या सिग्नल्समुळे मानवी त्वचेबरोबर मेंदूवरही परिणाम होईल असे सांगितले जाते आहे.   जेव्हा 5Gची  तरंगलांबी उत्सर्जित होते, तेव्हा आपली त्वचा स्वयंचलितपणे त्यांना शोषून घेते आणि तेव्हा नैसर्गिकरित्या त्वचेवर तापमानात वाढते. आपण सर्वांनी रोबोट २.० हा सिनेमा पाहिलाही असेल, अर्थात वरती दिलेले सिग्नल्स  पक्षांसाठी तर खूप घातक आहेत. 5G चे टेस्टिंग करते वेळी नेदरलँडमध्ये ३०० हून अधिक पक्षांनी आपले प्राण गमावले आहेत, ही वस्तुस्तीथी आहे.
 
मागच्या वर्षीच 5Gच्या संदर्भातील पृथ्वीच्या इतिहासातील पहिली ग्लोबल इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशन चाचणी झाली आहे. यापैकी बहुतेक शास्त्रज्ञांचा असा विश्वास आहे की हे सिग्नल्स म्युटेजेनिक आहेत, याचा अर्थ ते जीवनाच्या डीएनए संरचनेत बदल करतात. परंतु काही शास्त्रज्ञांचाही  असा विश्वास आहे की जीव  सृष्ठी धोक्यात आहेत आणि यासाठी अजून काही चाचण्यांची आवश्यकता आहे. या तीव्रतेच्या इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे कर्करोग होतो. २०२१ पर्यंत प्रत्येक शहरात 5G टॉवर्स आणि सेल स्टेशन असतील. हे डिव्हाइस जगभरातील लाखो इमारतींच्या वर किंवा आपल्या आजूबाजूला असतील. अंतरराष्ट्रीय कायद्याखाली 5G तंत्रज्ञानाची अंमलबजावणी करणे गुन्हा आहे असेही काही कंपन्यांवर आरोप झाले आहेत.

असे 5G  टॉवर्स आणि मिनी-स्टेशन अत्यंत धोकादायक आहेत. लहान मिलिमीटर सिग्नल्स अधिक धोकादायक नसतात, त्यास लक्षावधी अधिक छोट्या सेल टॉवर्सची आवश्यकता असते, संभाव्यत: २ ते ८ घरामागे एक टॉवर. याचा अर्थ असा आहे की मनुष्याच्या आरोग्याला इलेक्ट्रोमॅग्नेटिक रेडिएशनमुळे  धोका वाढणार आहे, ते मानवी शरीराच्याही पेशींवर परिणाम करून डीएनए नष्ट करतात, ज्यामुळे कर्करोग होऊ शकतो. अर्थातच हे टॉवर्स केवळ धोकादायक नाहीत; तर ते प्राणघातक आहेत.

शात्राज्ञांच्या मते यामुळे खालील आजार उदभवू शकतात.
  •     मळमळ
  •     सूज
  •     केसांचा तोटा
  •     कमी प्रमाणात भूक
  •     कमी ऊर्जा
  •     खराब झालेले अस्थिमज्जे
  •     दुखणेयुक्त अवयव
  •     खोल निराशा
  •     तणाव
  •     संक्रमण
  •     अशक्तपणा आणि मृत्यू

संभाव्य शक्यता तर खूप आहेत. अनेक धोके टाळण्यासाठी अनेक अमेरिकन, चीनी, कोरियन खाजगी कंपन्या 5G वर खूप संशोधन करत आहेत. 5G तंत्रज्ञानाला वेगवेगळ्या कंपन्या वेगवेगळ्या पध्दतीने वापरणार आहेत. महत्वाची गोष्ट ही आहे कि कोणती कंपनी पहिल्यांदा 5G तंत्रज्ञान  प्रत्येक्षात उतरवेल. होऊ शकते कि आपल्या पिढीवर 5Gचे वाईट परिणाम होणार नाहीत, परंतु येणाऱ्या पिढीला या परिणामाला तोंड द्यावे लागेल. आजच्या सर्वच प्रमुख तंत्रज्ञानामध्ये 5G एक लक्षणीय तंत्रज्ञान समजले जाते आहे आणि याचे भविष्य काय असेल हे आज सांगणे कठीण आहे.