Search in Google

Thursday, December 12, 2019

युवादिन विशेष

अब्दुल कलाम म्हणाले होते, २०२० सालात भारत महासत्ता बनलेला असेल आणि आजचे तरुणच असा भारत घडवतील, परंतु आज तशी परस्थिती दिसत नाही. किंबहुना याउलटच आजचे चित्र आहे. रस्त्याने चालताना आपण जेव्हा एखाद्या तरुणाला श्रद्धांजली वाहील्याचा बॅनर पाहतो तेव्हा आपल्याही काळजाचा ठोका चुकतो. आज भारताची युवाशक्ती भरकटलेली दिसत आहे. अनेक तरुण दारू, गुटखा, सिगारेट  अशा अनेक व्यसनाच्या आहारी गेलेले आपणाला दिसतील. ढाब्यावर किंवा मोठमोठ्या हॉटेलमध्ये जाऊन दारू पिणे प्रतिष्ठीत असते, असा गैरसमज तरुणांमध्ये सध्या रूढ होताना दिसत आहे. रस्त्याने गाडी चालवतानाही तरुणांचे रक्त जाम सळसळत असतं. आज अनेक अपघात होत असतानाही यातून बोध घेतला जात नाही.

क्रीडा, कला, साहित्य, व्यवसाय या क्षेत्रांत रुजू असलेल्या अनेक युवकांकडून अशा भरकटलेल्या तरुणांनी उर्जा प्रेरणा घ्यावी. क्रीडा क्षेत्रातून आपल्याला अशी बरीच नावे घेता येतील. नेहमीच क्रिकेटमध्ये अव्वल राहणारा धडाकेबाज फलंदाज आणि भारतीय संघाचा कर्णधार विराट कोहली, २०१८ मध्ये फिनलँडमध्ये वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियनशिपसाठी झालेल्या स्पर्धेत तिने सुवर्णपदक मिळवणारी हेमा दास, २०१९ अशियन एथेटिक्स चॅम्पियनशिप मिळवणारी गोमती मारीमुथू.

विराट कोहली. या युवकाला कोण ओळखत नाही? याने आपला डंका जगभर वाजवला आहे? विराट कोहलीचा जन्म ५ नोव्हेंबर, १९८८ रोजी दिल्लीतील उत्तम नगर मध्ये राहणाऱ्या एका पंजाबी कुटुंबात झाला. त्याचे वडील प्रेम कोहली व्यवसायाने एक वकील होते व आई सरोज कोहली ही गृहिणी आहेत. मेंदूच्या झटक्यामुळे एक महिना बिछान्यावर असलेल्या कोहलीच्या वडीलांचे १८ डिसेंबर २००६ रोजी निधन झाले. त्याच्या पूर्वायुष्याबद्दल बोलत असताना विराट सांगतो, "मी माझ्या आयुष्यात खूप काही पाहिलं आहे. लहान वयात माझ्या वडिलांचे निधन झाले, कौटुंबिक व्यापारही व्यवस्थित चालत नव्हता, आम्ही भाड्याच्या घरात राहत होतो. कुटुंबावर कठीण वेळा आल्या... हे सर्व मनावर खोल रुतून बसलं होतं." विराटने सांगितल्यानुसार त्याच्या लहानपणी त्याच्या वडिलांनी त्याच्या क्रिकेट प्रशिक्षणाला खूप पाठिंबा दिला होता. तो म्हणतो "माझे वडील हा माझा सर्वात मोठा आधार होता. ते नेहमी मला सरावासाठी घेऊन जात असत. अजूनही कधी कधी मला त्यांच्या सहवासाची आठवण येते." स्वतःला सावरत विराटने आपली जिद्द कायम ठेवली आहे. गल्ली क्रिकेटमध्ये वेळ वाया घालवण्यापेक्षा प्रशिक्षणासाठी  त्याने क्रिकेट क्लबमध्ये प्रवेश घेतला होता. क्रिकेट अकादमीमध्ये विराटने राजकुमार शर्मा यांच्याकडून प्रशिक्षण घेतले. त्यावेळी नोयडा जवळच्या सुमित डोग्रा अकादमीकडूनही तो सामने खेळला. नववीमध्ये असताना क्रिकेट सरावासाठी मदत म्हणून त्याने दिल्लीतील पश्चिम विहार नावाच्या वसाहातीमधील सेव्हियर कॉन्व्हेंटमध्ये प्रवेश घेतला.  खेळाशिवाय कोहली अभ्यासातही हुशार होता. त्याचे शिक्षक त्याला 'एक तेजस्वी आणि हुशार मुलगा' समजत. आज विराटची लौकिकता कुणाला सांगायची गरज नाही. विराट जगभरात गाजलेल्या सर्वच क्रिकेटपटुंचे रेकॉर्ड तोडत चालला आहे. आजच्या युवकांना क्रिकेटबरोबर प्रो-कब्बडी, कुस्ती लीग, ॲथलेटिक्सचे अनेक खुले पर्याय आहेत.

विराटबरोबर हिमा दासची प्रेरणादायी कहाणी आहे. हिमा दासचा जन्म आसाम राज्यातील नागाव जिल्ह्यातील धिंगजवळील कंधुलिमारी गावात झाला. तिचे वडील रणजित आणि आई जोनाली हे भातशेती करतात. ती चार भावंडांमध्ये सर्वांत लहान आहे. तिने धिंग पब्लिक स्कूलमध्ये शिक्षण घेतले. आणि लहान वयात फुटबॉल खेळायला सुरुवात केली. ती आपल्या शाळेत मुलांबरोबर फुटबॉल खेळत असे. तिला फुटबॉलमध्ये कारकीर्द घडवायची होती. पुढे, जवाहर नवोदय विद्यालयाचे शारीरिक शिक्षण देणारे प्रशिक्षक श्यामशुल हक यांच्या सूचनेवरून हिमा दासने खेळ बदलला आणि धावपटू म्हणून प्रशिक्षण घेण्यास सुरुवात केली. ती कमी व मध्यम अंतराच्या शर्यतींमध्येच भाग घेत असे. श्यामशुल हक यांनी तिचा नागाव स्पोर्ट्‌स असोसिएशनच्या गौरीशंकर रॉय यांच्याशी परिचय करून दिला. हिमा दास नंतर आंतर-जिल्हा स्पर्धेसाठी पात्र ठरली आणि तिने या क्रीडा स्पर्धांत दोन सुवर्ण पदके जिंकली.  पुढे जुलै २०१८ मध्ये फिनलंड येथे झालेल्या २० वर्षांखालील जागतिक ॲथलेटिक्स स्पर्धेत हिमा दासने ४०० मीटर धावण्याच्या स्पर्धेत सुवर्णपदक मिळवले. अशी कामगिरी करणारी ती पहिली भारतीय महिला ठरली. ४०० मीटर धावण्यासाठी तिने केवळ ५१.४६ सेकंदांची वेळ घेतली. या कामगिरीमुळे ती अनेक अंतरराष्ट्रीय स्पर्धांमध्ये भारताचं प्रतिनिधीत्व करू लागली.   तिच्या यशामुळे २०१८ मध्ये हिमाला भारत सरकारने अर्जुन पुरस्कार दिला. 

व्यवसायामध्ये जगभर लौकिकता मिळवणारे आजचे भारतीय तरुण संख्येने कमी असणे ही आपली शोकांतिका आहे. फ्लिपकार्ट चालू करणारे सचिन बनसल आणि बिन्नी बनसल, ओयो हॉटेल्सचा संस्थापक राजेश अग्रवाल, येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले अशी काही नावे घेता येतील.
फ्लिपकार्ट कंपनीची स्थापना सचिन बनसल आणि बिन्नी बनसल या सॉफ्टवेअर इंजिनीअर असणाऱ्या दोघांनी सन २००७ मध्ये केली. फ्लिपकार्ट ही भारतातली एक अग्रणीय इ-कॉमर्स अथवा इलेक्ट्रॉनिक वाणिज्य कंपनी असून तिचे मुख्यालय बंगळूरू येथे आहे. वाचनाचं वेड असणाऱ्या या दोघांनी सुरुवातीच्या काळात आपले लक्ष विविध पुस्तके विकण्यात केंद्रित केले होते, परंतु आता फ्लिपकार्ट वेगवेगळी इलेक्ट्रॉनिक वस्तू व इतर दैनदिन वापरातल्या वस्तूंची विक्री करते. काही दिवसापूर्वीच फ्लिपकार्टचा वालमार्ट या कंपनीशी एकत्रित व्यवसाय करण्याचा करार झाला आहे. 

रितेश अग्रवाल. २०१२ मध्ये वयाच्या २१ व्या वर्षी याने ओयो हॉटेल्सची स्थापना केली. ज्याला ओयो होम्स आणि हॉटेल्स म्हणून देखील ओळखले जाते, ही एक भारतीय हॉटेल साखळी आहे. ही जगातील तिसर्‍या क्रमांकाची आणि भाड्याने घेतल्या जाणाऱ्या फ्रेंचाइज्ड हॉटेल्स, घरे किंवा  राहण्याच्या जागेची वेगवान वाढणारी आतिथ्य साखळी आहे.  सुरुवातीला भांडवलाची तडजोड करून ‘ऑरवेल स्टे’ उलाढाल वाढल्यानंतर ‘ओयो रूम्स अँड हॉटेल्स’ अशी नामांतरित करण्यात आली. आज कंपनीची किंमत १० अब्ज अमेरिकन डॉलर्स इतकी आहे. विविध देशात कंपनीची अनेक कार्यालये आहेत. हॉटेल व्यवस्थापन क्षेत्रातील अनेक अनेक कंपन्यांशी ‘ओयो’ करार करत आहे. असे १८ ते ३५ वयोगटातले अनेक नावाजलेले युवक आजच्या युवकांना खूप काही शिकवून जातात. ३२ वेगवेगळे व्यवसायाचे प्रयोग करून ३३ व्या प्रयोगात यशस्वी झालेले येवले अमृततुल्यचे नवनाथ येवले यांनीही आपला व्यावसाय विश्वव्यावी करण्याचे ध्येय ठेवले आहे. त्यांच्या आजच्या यशाचे कारण त्यांची मेहनत, चिकाटी इतर व्यवसाय यशस्वी का होतात हे पाहण्याची निरीक्षण क्षमता! बरिस्ता, सी.सी.डी. , डॉमिनोज पिझा, मॅकडोनाल्ड बर्गर  हे परदेशी व्यवसाय भारतात यशस्वी का झाले हेही आजच्या तरुणांना विचार करायला लावणारी गोष्ट आहे आणि आपली जिद्द कायम ठेवत युवकांनी वेगवेगळ्या क्षेत्रात आपला ठसा उमटवावा. 

 

विराट कोहली (कर्णधार- भारतीय क्रिकेट संघ, वय ३१ )

 












हिमा दास (वर्ल्ड ज्युनियर ॲथलेटिक्स चॅम्पियन वय २० )


 










सचिन बनसल आणि बिन्नी बनसल ( संस्थापक - फ्लिपकार्ट)



 









रितेश अग्रवाल ( संस्थापक - ओयो रूम्स अँड हॉटेल्सचे,  वय २५)