Search in Google

Monday, August 13, 2018

केवळ स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देवून कसं चालेल ?

               देश स्वातंत्र्य होऊन ७१ वर्षे पूर्ण झाली आहेत. नेहमीप्रामणे याही वर्षी स्वातंत्र्यदिन उत्साहात साजरा झाला, राष्ट्रगान झाले, सर्वांनी एकमेकांना शुभेच्छा दिल्या. आपल्या राष्ट्रध्वजाचे स्टीकर आपल्या खिश्याला लावले. आणि भाषणे देवून तीन रंगाचे फुगेही आकाशात सोडले. होय, आनंद आहे! भारताचा प्रत्येक स्वातंत्र्य दिन साजरा करताना आपण 'चिरायु होवो' म्हणत आपल्या स्वार्थापोटी आपण आपल्या स्वातंत्र्यचा, लोकशाहीचा घात तर करत नाही ना हेसुद्धा तपासण्याची गरज आहे. स्वातंत्र्य मिळाले, राज्यघटना आली त्यानुसार ७१ वर्षे प्रशासनही चालले. तरीही आपल्यासमोर स्वातंत्र्याच्या निगडीत बरीच संकटं आहेत, म्हणजेच आपण राज्यघटना स्वत:हून अर्पण करतो याचाच अर्थ असा असतो की आम्ही एक नागरिक म्हणून घटनात्मक मुल्यांना जोपासण्याचे जबाबदारी घेत आहोत. जी जबाबदारी खूप मोठी असते, जी आम्ही देवावर किंवा कोणा अचिंत्य शक्तीवर सोपवत नाही आहोत. त्यात जे नमूद असेल त्या घटकांनाच धरून आम्ही आपण आपले स्वातंत्र्य आत्मसात करत असतो आणि जगत असतो. आज आपण पाहत आहोत  स्वातंत्र्यदिनी फक्त शुभेच्छांचा वर्षाव होतो आणि एक सुट्टीचा दिवस म्हणून साजरा होत असतो. स्वातंत्र्य होवून जी वर्षे सरली आहेत त्याचा आपण स्वतःहून मागोवा घेतो का? आपली घटना आपल्याला समता, बंधुता देते किंबहुना या समतेच्या तत्वाचे सरकारलाही भान असते काय? याचेही उत्तर नकारार्थी येते. भलेही आज आपण महासत्ता होण्याची स्वप्ने पाहत असलो तरी या स्थितीतल्या शिखविरोधी हिंसक दंगली असोत अथवा गुजरातमधील मुस्लिमांचा संहार असो, कारण काहीही असले तरीही, ते शासकीय प्रेरणांनी केल्या जावेत, हे कोणत्या स्वातंत्र्याचे किंवा प्रजासत्ताकचे लक्षण आहे? दलित गोहत्या करतात म्हणून त्यांना अमानुष मारहाण झाली, मूलं पळवण्याच्या टोळी समजून लोकांचा जीव घेण्यात आला? कोरेगांव-भीमा मध्ये झालेली दगडफेक? हेच आपल्या घटनेनं आपल्याला दिलेलं स्वातंत्र्य आहे का? आंबेडकर म्हणाले होते, जातीभेद नष्ट झाल्याशिवाय देशाचा सांस्कृतिक, आर्थिक आणि सामाजिक विकास शक्य नाही, परंतु आजचे चित्र स्वातंत्र्यपूर्व जसे होते त्यापेक्षाही विचित्र दिसत आहे. जातिभेद नष्ट होण्याऐवजी आणखी घट्ट होताना दिसत आहे. आपण या महापुरुषांच्या जयंत्या-पुण्यतिथ्या जेवढ्या नाचत-वाजत साजऱ्या करतो त्याऐवजी त्यांचे विचार अमलात आणले तर तेच खऱ्या जयंत्या-पुण्यतिथ्याच साजरीकरण ठरेल. आपल्या महापुरुषांना आपण डोक्यावर घेतो परंतु आपण त्यांना कितपत डोक्यात घेतो ? ७१ वर्षानंतरही अनेक जातीसमुहाला  आरक्षण, कर्जमाफी मागण्याची वेळ येते. शेतकऱ्यांना पिकाच्या  हमीभावासाठी भांडावं लागतं, या सगळ्या कारणासाठी वेळोवेळी मूक किंवा हिंसक आंदोलनेही होतात. खरचं आपण महासत्तेच्याच वाटेवर चालत आहोत  कि विनाशाच्या असा प्रश्न मनात येणे स्वाभाविक आहे.  
             "यह आझादी झुठी है, देश कि जनता भुकी है!" १६ ऑगस्ट १९४७ ला मुंबईतील मोर्चात आण्णाभाऊ साठे गर्जले होते, हे आपल्याला आजही तितकेच सत्य विधान दिसेल. कारण एकविसावे शतक आणि भारत जे सामतोलात्मक चित्र दिसायला पाहिजे होते, आज ते चित्र दिसत नाही. ७१ वर्षानंतरही आमच्या देशासमोर स्त्री-भ्रुण हत्या, भ्रष्टाचार, आर्थिक विषमता, स्त्री अत्याचार, जातीवाद, दहशतवाद, प्रांतवाद, भाषावाद असे भले भले प्रश्न तोंड आ असून उभे आहेत. आज हा भारतीय भारतीयत्वाचीच व्याख्या विसरला आहे,  यासाठी आज शिवराय-शाहू-फुले-आंबेडकर पुन्हा येणार नाहीत, आमच्या खांद्यावरचा भार हलका करायला याचेही भान आम्हा असले पाहिजे.
                आम्ही क्रिकेट नेहमीच जिंकत असतो खरे, परंतु ओलम्पिकमध्ये भारताचे स्थान काय?  काश्मीरचा प्रश्न कसा सुटणार? सैनिक शहीद होण्याचे कधी थांबणार? शेतकऱ्यांच्या आत्महत्या कशा थांबणार? आपल्या देशाला विज्ञानवादी लोकांनी ग्रासायला हवे होते, तिथे आज धर्मवादी लोकांनी ग्रासले आहे. यातूनच कट्टरता वाढत जात आहे. अमेरिका, रशिया, जपान या देशांच्या तुलनेत विज्ञान क्षेत्रातील संशोधनात किती भारतीय आहेत? यावरही विचार करून हे प्रमाण आपण ७१ वर्षात वाढवलं काय? असे अनेक प्रश्न आजही आहेत. देशाचा जितका पैसा भ्रष्टाचाराखाली गुंतला आहे, तितकाच पैसा दैववादाखालीही गुंतला आहे. धार्मिक द्वेष  आणि इतर भरकटलेल्या मार्गावरच आपले तरुण मनुष्यबळ आपण आज वाया घालवत आहोत. आम्ही गुलामगिरीतून बाहेर  पडलेल्या, भारतासारख्या बलाढ्य आणि स्वतंत्र देशाचे नागरिक म्हणून प्रतिनिधित्व करत आहोत. खालच्या पातळीपासून ते अगदी अंतरराष्ट्रीय पातळीपर्यंत आपली दखल घेण्याइतपत आपण स्वतः देशासाठी सकारात्मक धडपडत राहिलं पाहिजे, त्यासाठी आपण कायमच झपाटून गेलेलं असलं पाहिजे. जसे कि भगतसिंग, सुखदेव, राजगुरू चंद्रशेखर आझाद यांना वेड लागले होते स्वातंत्र्याचे, तसेच आपणही वेडे होवूयात या स्वातंत्र्यला सार्थी करण्यासाठी. यातूनच खऱ्या अर्थाने भारताच्या स्वातंत्र्याचे सार्थक होईल. स्वातंत्र्यदिनाच्या शुभेच्छा देत-घेत असता प्रत्येक नागरिकाने स्वत:प्रत अर्पण केलेल्या संविधानाबाबत जागरुक रहायला हवे. आपल्या आचरणात तसेच राष्ट्रीयत्व आणायल हवे! अन्यथा आभासी स्वातंत्र्याचा आरोप आम्हीच सिद्ध करु आणि मग आमच्या राष्ट्रप्रेमालाही केवळ भावनिक सोडला तर वास्तवातही काहीच अर्थ राहणार नाही. स्वतःच्या समाधानास्तव आजून किती दिवस तीच खोटी गाणी रेटून गाणार? कारण सारे जहाँ से अच्छा, हिन्दोस्ताँ हमारा!' म्हणण्याऐवजी 'सारे जहाँ से सच्चा हिन्दोस्ताँ हमारा!' असे म्हणणे मला योग्य वाटते!