Search in Google

Thursday, January 24, 2019

वेदांचा अट्टहास कशासाठी ?

आपल्या देशात अनेक शिक्षण चळवळी झाल्या, त्यासाठी अनेक महात्म्यांनी हातभार लावला. अगदी महात्मा फुले, सावित्रीबाई फुले, कर्मवीर भाऊराव पाटील, महर्षी कर्वे अशा अनेकांनी भारतीय शिक्षणव्यवस्थेसाठी मोलाचे योगदान आहे. त्या प्राथमिक शिक्षणासाठीच्या चळवळी जरी  असल्या तरीही आजच्या शिक्षणासाठी त्या मूलभूत आणि सार्थ ठरतात. खरं म्हणजे, तो आजच्या शिक्षण व्यवस्थेचा पाया होता. आपण काय शिकतो, कसे शिकतो हे वेळ आणि काळच ठरवत असतो. आजच्या शिक्षणातून जुना अभ्यासक्रम, जसे कि पावकी-निमकी तसेच अनेक पुरातन भाषाही बरखास्त झालेल्या आहेत, मानवी जीवनात होणाऱ्या प्रगतीमुळे अभ्यासक्रमात तसा बदल होत गेला आहे. जसे दिवस जातील तसे नवे शिक्षण येत गेले. 

विद्यार्थ्यांना पूर्वी शिक्षण गुरुकुलात मिळत होते. ऋषीमुनी आपल्या विद्यार्थ्यांना अनेकप्रकारच्या विद्या, युद्धकला शिकवत होते. याबरोबरच वैद्यकीय अभ्यासक्रमासाठी आयुर्वेद शिकवला जात होता किंबहुना तो आजही शिकवला जातो. आयुर्वेद हाही एक अनुभवातून आलेला अभ्यासक्रम आहे. परंतु चार वेद हे फक्त वैदिकांनाच वाचण्यास परवानगी होती. खरंतर  त्यात अभ्यासक्रम म्हणून आत्मसात करावं, असं काही नव्हतं किंबहुना याच वादांमुळे समाजात विषमता वाढत होती. जगाने स्वीकारावे असे त्यात काहीही नव्हते. पैसा, व्यापार, शिक्षण अशा अनेक विषयांना धरून जगाला त्यातून काही मिळालेही नाही.  अर्थात आजवर शिक्षणासाठी लढा देणाऱ्या महापुरुषांनी वेदांना विरोधच केला आहे. कारण वेदांमुळेच बराच समाज शिक्षणापासून वंचित होता. 

मग इथं प्रश्न पुढे येतो वेदांचा अट्टहास कशासाठी? आजवर जगात इतके संशोधन झाले, परंतु त्यात भारतीयांचे प्रमाण खूप कमी आहे किंबहुना ज्या संशोधनाने मानवी जीवन सोपे झाले, त्यात भारतीयांचे योगदान नगण्य आहे. बोटांवर मोजण्याइतके संशोधक भारताने जगाला दिले आहेत. इथं विमानाच्या संशोधनाचा आवर्जून उल्लेख करावा लागेल. शिवकर तळपदे यांनी वेदांचा अभ्यास करून विमानाची कल्पना मांडली असे सांगितले जाते, परंतु वैमानिक संशोधनाला धरून वेदांमध्ये काहीही नाही. त्यांनी वेगळ्या अनुषंगाने याबद्दलचे यांच्याकडून संशोधन झालेही असेल. परंतु खरे संशोधन हे राईट्स बंधू यांच्या कडूनच झाले म्हणावे लागेल, त्यांनीच जगाला विमान ही कल्पना सत्यात उतरून दाखवली. याबरोबरच शून्याच्या शोधाचा टेम्बा मिरवला जातो, अर्थात भारतात शून्याचा शोध लागला खरा, परंतु शून्याच्या शोधाअगोदर गणितशास्त्रात  दहाच्या पाटीतल्या सर्वच संख्या उपलब्ध होत्या. फक्त ती मांडण्याची संकल्पना भारतीयाने दिली.

आज अनेक कृत्रिम उपग्रह आकाशात सोडल्यानंतर इस्रो या भारतीय संस्थेमध्ये होणाऱ्या संशोधनामुळे सर्वांकडूनच भारतीय शास्त्रज्ञांचे तोंड भरून कौतुक होत आहे आणि या यशाचे जगालाही आश्चर्य वाटत आहे. नविन तंत्रज्ञान शिक्षणाला आपण स्वीकारले आहे म्हणूनच हे शक्य होत आहे. अमेरिकेतल्या नासा प्रयोगशाळेमध्येही भारतीय शास्त्रज्ञांची संख्या अग्रगण्य आहे. कृत्रिम उपग्रहांमुळे डिजिटल सिग्नल्स, कृत्रिम बुद्दीमत्ता असे अनेक तंत्रज्ञान जोर घेत आहे. यामागे कसलेही पुराण किंवा वेद नाहीत. त्यामुळे भविष्यातील प्रगतीसाठी जुने पुराण झुगारून नवनवीन तंत्रज्ञानाची कास धारावी लागेल, तरच भारतात अनेक संशोधक तयार होतील आणि दुनियाही त्यांना स्वीकारेल.    

त्यासाठी  वर्तमान युगात आपल्या शिक्षणपद्धतीने  इतिहासापासून धडा घेतला पाहिजे.  स्वतंत्र विचार करुन शकणारी, नवनिर्मितीची प्रेरणा केंद्रीभुत ठेवत आणखी तंत्रज्ञानाधारित आणि वैज्ञानिक आपली शिक्षणव्यवस्था असली पाहिजे.  आज भारताची आईटी सुपर पावर म्हणून ओळख वाढत आहे. याकरता असे सकारात्मक बदल करणारे सरकारही पाहिजे आहे. यासाठी देवांच्या जाती, मंदिरे, शाळेत विद्यार्थ्यांसाठी गीता ग्रंथ असे मुद्धे काय कामाचे? 

विमानाच्या शोधाबद्दल संशोधनातील वास्तव असताना व प्लास्टिक सर्जरी व जनुकीय शास्त्रांबद्दलची सरकारमधील प्रतिगामी नेत्यांची आजची विधाने सरळ सरळ हास्यास्पद असतात, हे विज्ञान म्हणून विद्यार्थ्यांना शिकवायचा नुसता विचार करणेही आपल्या शिक्षण पद्धतीला धोकादायक आहे हे वेगळे सांगायची गरज नाही. आजचे सारे आधुनिक विज्ञान वेदांमध्ये होते, इंटरनेट महाभारतात वापरले जात होते, माझ्याकडे दिव्य शक्ती आहे अशी अशास्त्रीय पण वैदिक अहंकार सुखावणारी विधाने भारत सरकारमधील मंत्र्यांनी करावे ही विज्ञानाची कास धरणाऱ्या भारतासाठी दुर्दैवी बाब आहे.

आज भारतातील एकही विद्यापीठ जागतिक दर्जाच्या दोनशे विद्यापीठांत नाही. हार्वर्ड युनिव्हर्सिटी, ऑक्सफर्ड युनिव्हर्सिटी यांच्या यादीत भारतीय विद्यापिठे गणली जात नाहीत. आपण जागतिक ज्ञानात, मग ते उपयुक्ततावादी असो की निखळ सैद्धांतिक पातळीवर, कोणतीही भर घातलेली नाही. आम्ही सॉफ्टवेअर निर्मितीमध्ये स्वत:ला अग्रेसर समजतो, पण आमच्या देशातील कोणीही आजतागायत एकही स्वतंत्र प्रणाली किंवा संगणकीय भाषा बनवू शकलेले नाही. कारण  आपल्या देशात शिक्षणव्यवस्थेच्या शेतात बेरोजगारीचे जे तण फोफावत आहे, त्याला पुराणपंथी विचारांचे खत-पाणी भेटत आहे. 

Published in Dainik Pandhari Bhushan, Pnadharpur on 17 May 2019.

इतर वाचनीय लेख

आपली शिक्षणपद्धती आणि आपण !

भारतीय आईटी विश्व..